Breking News

गुरुवार, २८ मे, २०२६

तळोदा तालुका मराठी पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी सुधाकर मराठे

तळोदा : तालुका मराठी पत्रकार संघाची वार्षिक सर्वसाधारण सभा दि. २७ मे २०२६ रोजी तळोदा येथील शासकीय विश्रामगृहात उत्साहात पार पडली. या सभेत सन २०२६-२७ या वर्षासाठी संघाच्या नूतन कार्यकारिणीची सर्वानुमते निवड करण्यात आली. अध्यक्षपदी सुधाकर मराठे, उपाध्यक्षपदी भरत भामरे, सचिवपदी सम्राट महाजन तर कोषाध्यक्षपदी महेंद्र सूर्यवंशी यांची निवड करण्यात आली.
          माजी अध्यक्ष सम्राट महाजन यांच्या मार्गदर्शनाखाली ही बैठक पार पडली. बैठकीला संघाचे मार्गदर्शक भरत भामरे, ईश्वर मराठे, दत्तात्रय सूर्यवंशी, संस्थापक अध्यक्ष सुनिल सूर्यवंशी, किरण पाटील, नरेश चौधरी, वसंत मराठे, हंसराज महाले, दीपक मराठे, नारायण जाधव, वैभव कर्णकार, हेमंत मराठे आदी पत्रकार उपस्थित होते. सभेच्या सुरुवातीला मावळत्या पदाधिकाऱ्यांचे राजीनामे स्वीकारण्यात आले. त्यानंतर मागील वर्षाचा हिशोब व इतिवृत्त वाचून दाखविण्यात आले. विविध विषयांवर सकारात्मक चर्चा झाल्यानंतर नवीन कार्यकारिणीची निवड जाहीर करण्यात आली. नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.
         तळोदा तालुका मराठी पत्रकार संघ सामाजिक व सांस्कृतिक उपक्रमांत नेहमीच अग्रेसर राहिला आहे. संघाच्या माध्यमातून गणेश आरास स्पर्धा, दिवाळी स्नेह मिलन, वार्तांकन स्पर्धा, महिला दिनानिमित्त महिलांचा सन्मान, पत्रकार दिनी ज्येष्ठ पत्रकारांचा गौरव तसेच पेपर विक्रेते व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार असे विविध उपक्रम राबविले जातात. नवीन कार्यकारिणीने आगामी काळात संघटन अधिक मजबूत करून पत्रकार हिताचे कार्य अधिक जोमाने करण्याचा निर्धार व्यक्त केला. नूतन पदाधिकाऱ्यांवर विविध क्षेत्रांतून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे....

सोमवार, १८ मे, २०२६

MiSS U...

पडत उठत शिकलेली सायकल : बालपणातील सायकलची आठवण

           यथार्थ दुसरीत असताना त्याने सायकल शिकायला सुरुवात केली. वय लहान होते, पण सायकल चालवण्याची त्याला खूप उत्सुकता होती. नवीन सायकल घेण्याऐवजी आम्ही घरात असलेली जुनी सायकलच दुरुस्त करून तयार केली. ती सायकल यथार्थच्या उंचीपेक्षा थोडी मोठी आणि उंच होती.         
त्या सायकलला साईड सपोर्टर लावण्याचा प्रयत्न केला. पण ते नीट बसत नव्हते. कसेबसे लावले तरी यथार्थ चालवताना ते लगेच तुटत होते. त्यामुळे एक दिवसातच आम्ही ते काढून टाकले. मग ठरवले की, त्याला साईड सपोर्टरशिवायच सायकल शिकवायची.
                दररोज संध्याकाळी मी त्याला सायकल घेऊन अमरविद्या कॉलनी आणि अक्कलकुवा रस्त्यावर सरावासाठी घेऊन जात होतो. जवळपास एक तास तो सायकल चालवण्याचा प्रयत्न करत असे. सुरुवातीला त्याला संतुलन राखणे कठीण जात होते. सायकल कधी डगमगायची, कधी थांबायची. कधी पाय पटकन खाली ठेवावा लागायचा. तरीही तो हार मानत नव्हता.
            हळूहळू त्याचा आत्मविश्वास वाढत गेला. फक्त चार दिवसांतच त्याने बऱ्यापैकी अंतर स्वतः सायकल चालवत पार केले. यानंतर मी त्याला रात्री बसस्टँडवर घेऊन जाऊ लागलो. तिथे त्याला वाहतुकीचा अनुभव मिळत होता. वळण कसे घ्यायचे, पुढे-मागे येणाऱ्या वाहनांकडे कसे लक्ष ठेवायचे, हे तो हळूहळू शिकू लागला. त्यानंतर सुट्टीचा दिवशी तो कॉलेज ग्राऊंडवर येऊ लागला व सायकल चालवू लागला.
              या सगळ्या सरावात तो अनेकदा पडला देखील. कधी गुडघ्याला खरचटले, कधी हाताला थोडी जखम झाली. पण तो लगेच उठून पुन्हा सायकलवर बसायचा. पडल्यामुळे तो घाबरला नाही. आज यथार्थ आत्मविश्वासाने सायकल चालवतो तेव्हा त्या दिवसांची आठवण छान वाटते. त्या काही दिवसांच्या सरावातून त्याने केवळ सायकल चालवायला नाही, तर धैर्य आणि प्रयत्न करण्याची सवयही शिकली. आमच्यासाठी ही एक सुंदर आणि जपून ठेवण्यासारखी आठवण आहे....

गुरुवार, ३० एप्रिल, २०२६

शाळेच्या संस्कारांचा पहारेकरी ; चार दशकांचा निष्ठावंत सेवक : शिपाई भटू भाऊ

           काही व्यक्ती पदाने लहान असतात, पण त्यांच्या सेवेतून त्या संस्थेचे मूल्य मोठे करतात. असेच येथील पी. सोसायटी संचलित न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर कॉलेज, अक्कलकुवा येथे दि. 16 डिसेंबर 1985 रोजी भटू त्रंबक मराठे, हे शिपाई या पदावर रुजू झाले. त्या काळात संस्थेचे मुख्याध्यापक म्हणून कै. व्ही. एन. तिवारी (चाचा) यांचे मार्गदर्शन लाभत होते. शिक्षणाला सर्वोच्च महत्त्व दिले जात असलेला तो सुवर्णकाळ होता. शाळा व ज्युनिअर कॉलेजमध्ये अत्यंत प्रफुल्लित, शिस्तबद्ध व प्रेरणादायी वातावरण होते. विद्यार्थ्यांची मोठी गर्दी असायची, वर्ग अक्षरशः फुललेले असायचे आणि शिक्षणासोबत संस्कारांची जोपासना होत होती.
        अशा सकारात्मक आणि जबाबदार वातावरणात भटू भाऊंनी आपल्या सेवेला सुरुवात केली. शिपाई पदावर असूनही त्यांनी केवळ कामगार म्हणून नव्हे, तर शाळेचा एक अविभाज्य घटक म्हणून आपली ओळख निर्माण केली. शाळेची स्वच्छता, सुव्यवस्था आणि शिस्त राखण्याची जबाबदारी त्यांनी सुरुवातीपासून अत्यंत प्रामाणिकपणे स्वीकारली आणि ती जबाबदारी त्यांनी तब्बल 2026 पर्यंत अखंडपणे निभावली.
        दररोज सकाळी लवकर शाळेत येणे, सर्वप्रथम शाळेची स्वच्छता करणे, पटांगण झाडणे, वर्गखोल्या स्वच्छ करणे, बाके पुसणे- ही सर्व कामे त्यांनी नित्यनेमाने आणि मनापासून केली. मात्र, त्यांच्या कार्याला वेगळी उंची देणारी बाब म्हणजे त्यांची धार्मिक व संस्कारशील वृत्ती.

       शाळा परिसरातील पिंपळ, वड व औदुंबर अशा वृक्षांची पूजा करणे, त्यांना फेऱ्या घालणे, तसेच शाळेत असलेल्या देवतांच्या फोटोंना रोज अगरबत्ती लावणे—हे सर्व त्यांच्या दैनंदिन दिनचर्येचा अविभाज्य भाग होते. या कृतींमुळे शाळा परिसरात एक वेगळीच प्रसन्न, पवित्र आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असे. विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी यांनाही त्या वातावरणाचा लाभ होत असे.
            भटू भाऊंची सेवा ही केवळ कर्तव्यापुरती मर्यादित नव्हती; ती समर्पण, निष्ठा आणि आत्मीयतेने भरलेली होती. शाळेप्रती असलेली आपुलकी, संस्थेच्या प्रतिष्ठेची जाणीव आणि विद्यार्थ्यांप्रती असलेला आदर त्यांच्या वागणुकीतून सातत्याने दिसून येत होता.
         दि. 1 मे 2026 रोजी ते सेवानिवृत्त होणार आहेत. त्या दिवशी ते शाळेचा निरोप घेतील, पण त्यांच्या पावलांच्या खुणा, त्यांच्या प्रार्थनेचा गंध आणि त्यांच्या सेवेतून रुजलेले संस्कार या शाळेच्या भिंतींमध्ये, वृक्षांमध्ये आणि विद्यार्थ्यांच्या आठवणींमध्ये कायम जिवंत राहतील. दि. 31 मे 2026 रोजी भटू त्रंबक मराठे हे आपल्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त होणार आहेत. त्या दिवशी ते शाळेला निरोप देतील, पण त्यांनी दिलेली सेवा, रुजवलेले संस्कार आणि निर्माण केलेली सकारात्मक परंपरा ही कायम स्मरणात राहील.
             भटू भाऊंची सेवा ही निश्चितच प्रशंसनीय, अनुकरणीय आणि गौरवास्पद आहे. अशा निष्ठावंत सेवकांमुळेच शैक्षणिक संस्था केवळ ज्ञानाचे केंद्र न राहता संस्कारांची देवभूमी बनते....

सोमवार, ९ फेब्रुवारी, २०२६

वचननिष्ठेचा जिवंत आदर्श : आप्पासाहेब लक्ष्मणराव बबनराव माळी

              आमचे आधारवड आप्पा साहेब लक्ष्मणराव बबनराव माळी हे अत्यंत उदार, दिलदार, मातीशी जोडलेले रांगडे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या स्वभावातील माणुसकी, साधेपणा आणि प्रेमळपणा यामुळे ते प्रत्येकाच्या मनात आदराचे आणि आपुलकीचे स्थान मिळवून आहेत. त्यांची आध्यात्मिक वृत्ती म्हणजे देवावर अढळ श्रद्धा, मनःशांती, संयम, सेवा, नम्रता आणि जीवनाला दिशा देणारी सकारात्मक ऊर्जा आहे. ते नियमित देवपूजा करतात आणि देवावर त्यांची अढळ श्रद्धा आहे. देवावरचे त्यांचे निस्सीम प्रेम त्यांच्या जीवनाला योग्य दिशा देत आले असल्याचे ते नेहमी म्हणतात. 
          नेतृत्वगुण असलेले आप्पा साहेब पी. ई. सोसायटीचे अध्यक्ष म्हणून प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करत आहेत. संस्था चालक म्हणून त्यांनी दिलेले योगदान खरोखरच मोलाचे आहे. त्यांच्या मेहनतीमुळे अनेक लोक घडले, अनेकांचे जीवन बदलले आणि संस्था अधिक सक्षम झाली. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्हाला आज पुढे जाण्याची संधी मिळाली आहे.
           औपचारिक शिक्षणाच्या कागदी पदव्या कमी असल्या तरी जीवनातील अनुभव, व्यवहारज्ञान आणि शहाणपण यामुळे ते खऱ्या अर्थाने आमचे मार्गदर्शक आहेत. संयम, सातत्य, कुटुंबावरचे प्रेम आणि कुटुंबप्रमुख म्हणून निभावलेली जबाबदारी ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची खास ओळख आहे.
         ते कुटुंबावर, समाजावर आणि तरुण पिढीवर मनापासून प्रेम करतात. कठीण परिस्थितीतही त्यांनी कधी हार मानली नाही. असंख्य संकटांना सामोरे जात त्यांनी नेहमीच योग्य मार्ग शोधला.
             माझ्यासारख्या अनेकांना त्यांनी आधार दिला आणि तरुणांची साथ कधीही सोडली नाही. समाजाला चांगली दिशा देणारे आप्पा साहेब हे खरोखरच आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्यासारखा मार्गदर्शक आणि आधार मिळणे हे आमच्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे. 
            खरे आप्पा ओळखायचे असतील तर आप्पा साहेबांचा सहवास आवश्यक आहे. सहवासात मिळते अनुभवाची शिदोरी, जी कित्येक पुस्तके वाचूनही सापडणार नाही. असंख्य माणसे वाचलेला माणूस, आमची आभाळमाया - कधीमधी चिडणारे, पण लगेच विसरून त्याहीपेक्षा अधिक प्रेम करणारे, साधे, भोळे, दिलदार आणि मनाचा राजा असलेले आप्पासाहेबाना वाढदिवसाच्या सप्तरंगी शुभेच्छा.

आप्पा साहेब, तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार!

सोमवार, २ फेब्रुवारी, २०२६

पहिला विदेश टूर थायलंड : अनुभव, मैत्री आणि आठवणींचा सुवर्णप्रवास

दि.02 फेब्रुवारी 2026
                आयुष्यातील पहिला विदेश दौरा करण्याचा योग माझ्या आयुष्यात थायलंड टूरच्या माध्यमातून आला. हा प्रवास केवळ पर्यटनाचा नव्हता, तर तो माझ्या आयुष्यातील एक महत्त्वाचा टप्पा, शिकवण देणारा अनुभव आणि आयुष्यभर जपण्यासारखी आठवण ठरला.
                   सुरुवातीला या टूरसाठी मी आणि सुनील सूर्यवंशी (कालू भाऊ) असे दोघे जाणार होतो. मात्र कालू भाऊ यांचे पासपोर्ट वेळेवर न आल्यामुळे त्यांचा जाण्याचा बेत रद्द झाला. त्यांच्या जागी माझा वर्गमित्र असलेला विशाल सूर्यवंशी माझ्यासोबत सहभागी झाला. हा बदल अचानक झाला, पण पुढे जाऊन विशाल हा या प्रवासातील एक महत्त्वाचा सहप्रवासी ठरला.                या संपूर्ण टूरमध्ये सहभागी होण्यामागे रांझनी येथील डॉ.नारायण जाधव यांचा मोठा वाटा होता. त्यांचा हा दुसऱ्यांदा परदेश दौरा असल्यामुळे त्यांना आधीच अनुभव होता. त्यांच्या आग्रहामुळे, प्रोत्साहनामुळे आणि विश्वासामुळेच मी खऱ्या अर्थाने या टूरमध्ये सहभागी होण्याचा निर्णय घेतला.

 तळोदा ते पुणे- ओळखींचा आणि नव्या मैत्रीचा प्रवास
              तळोदा येथून निघताना मी केवळ डॉ. नारायण जाधव यांनाच चांगल्या प्रकारे ओळखत होतो. इतरांशी फक्त तोंडओळख होती, तर काहीजण अगदीच नवखे होते. पोपट पाटील, डॉ.गोकुळ (आबा) बोरसे, डॉ. मेघराज पाटील, मी आणि विशाल सूर्यवंशी असे आम्ही सर्व 28 तारखेला तळोदा येथून पुण्याकडे रवाना झालो. पुढे नंदुरबार येथून टूरचे प्रमुख पंकज भावसार आणि महेश राजपूत यांनी ट्रॅव्हल्स बुक केली होती. त्यांच्याशी माझी ही पहिलीच भेट होती.
प्रवासादरम्यान डॉ. सुधीर पाटील, डॉ.माधव पाटील आणि डॉ. गिरासे हेही आमच्यासोबत जोडले गेले.             
              सर्वजण वेगवेगळ्या पार्श्वभूमीचे असतानाही, आमच्यात लवकरच एक मैत्रीपूर्ण, आपुलकीचे आणि आनंदी वातावरण तयार झाले. गप्पा, हशा, चेष्टा आणि अनुभवांची देवाणघेवाण करत आम्ही ट्रॅव्हल्सने पुण्यातील डॉ. सुधीर पाटील यांच्या साडूकडे पोहोचलो. ते पुण्यात बांधकाम विभागात कार्यकारी अभियंता म्हणून आहेत. त्यांच्या फर्म हाऊसवर आम्ही खुप धमाल केली. निसर्गरम्य वातावरण, स्विमिंग पूल, मोकळी जागा आणि खेळाची साधने पाहून सगळ्यांचाच उत्साह वाढला. त्या ठिकाणी काही क्षणांतच आमच्यातील अंतर कमी झाले आणि आम्ही एका कुटुंबासारखे वाटू लागलो. आम्ही पोहलो, खेळलो, गप्पा मारल्या गाणे म्हटले नाचलो आणि एकत्र धमाल केली. 
                   मात्र याच आनंदाच्या क्षणांत अजित पवार यांच्या निधनाची बातमी आम्हाला कळली. ही बातमी मनाला चटका लावणारी होती. सर्वांनी काही क्षण शोक व्यक्त केला, आणि त्या दु:खद घटनेची छाया आमच्या मनावर उमटली.

पुणे एअरपोर्ट पहिल्या विमानप्रवासाची धडधड
                    रात्री आम्ही पुणे येथील  एअरपोर्टकडे रवाना झालो. माझ्यासह विशाल सूर्यवंशी आणि इतर काही जणांचा हा पहिलाच विमानप्रवास होता. विमानतळावर पोहोचल्यावर भव्य इमारत, सुरक्षा तपासणी, चेक-इन काऊंटर, बोर्डिंग पास, इमिग्रेशन प्रक्रिया, कागदपत्रांची तपासणी आणि चलन बदल या सर्व गोष्टी आमच्यासाठी नवीन होत्या. येथे पोहचल्यानंतर आम्हाला आणखी 17 मित्र भेटले. त्यावेळी नरेंद्र भाई सिंधी हे आयोजक असल्याचे समजले त्यांच्या सोबतच असलेले त्यांचे जवळचे मित्र संदीप लूला व अन्य ठिकठिकाणाहून आलेले सर्व जण एकत्र जमले.. संदीप लूला यांनी मला स्थलांतर प्रक्रिये दरम्यान मदत केली.          
       प्रत्येक टप्प्यावर आम्ही शिकत होतो, एकमेकांना मदत करत होतो आणि नव्या अनुभवांचा आनंद घेत होतो. सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर आम्ही रात्री 12 वाजता पुण्याहून फ्लाइटने उड्डाण केले..

 विमानप्रवास            
   आकाशातील स्वप्नवत क्षण विमानात बसण्याचा माझा पहिलाच अनुभव अविस्मरणीय होता. टेकऑफच्या वेळी जाणवणारी धडधड, खिडकीतून दिसणारे शहराचे लहान होत जाणारे दिवे, ढगांचे शुभ्र समुद्र आणि आकाशातील शांतता, हे सर्व मनात खोलवर कोरले गेले. प्रवासादरम्यान सर्व मित्र एकमेकांशी अनुभव शेअर करत होते. काहीजण उत्साहात होते, काहीजण थोडे भावूक, तर काहीजण स्वप्न पाहत होते..

पहाटे 5 वाजता-बँकॉकमध्ये आगमन     
               पहाटे 5 वाजता आम्ही थायलंड देशाची राजधानी बँकॉक (Bangkok) येथे पोहोचलो. विमानतळावर पाऊल ठेवताच परदेशी वातावरण, शिस्तबद्ध व्यवस्था आणि आधुनिकता लगेच जाणवली. थायलंड- ठिकाणांचे महत्व आणि आकर्षण थायलंडमधील बौद्ध मंदिरे, ऐतिहासिक स्थळे, समुद्रकिनारे, शॉपिंग मॉल्स, आणि सांस्कृतिक कार्यक्रम पाहून मी भारावून गेलो.
प्रत्येक ठिकाणाचा स्वतःचा इतिहास, महत्व आणि सौंदर्य आहे. येथील संस्कृती, कला, खाद्यपदार्थ आणि जीवनशैली अनुभवणे म्हणजे एक वेगळ्याच जगात प्रवेश केल्यासारखे वाटत होते.
रात्रीची लाईफ    
                थायलंडची ओळख थायलंडची रात्रीची लाईफ अत्यंत प्रसिद्ध आहे. रात्री शहर अधिकच उजळते-रंगीबेरंगी दिवे, संगीत, स्ट्रीट फूड, मार्केट मार्केटस, पार्ट्या आणि उत्साही वातावरणामुळे शहर जिवंत भासते. पार्ट्या, डिस्को, पब ही येथील संस्कृती आहे..  
कोरल आयलंड       
              कोरल आयलंड येथील अनुभव माझ्यासाठी अत्यंत रोमांचक आणि अविस्मरणीय ठरला. येथे आम्हाला अंडर सी (समुद्राखालील) जग पाहण्याची अनोखी संधी मिळाली. रंगीबेरंगी मासे, प्रवाळ (कोरल) आणि समुद्रातील जिवंत सृष्टी पाहून मन थक्क झाले. त्यानंतर पॅराग्लायडिंग करताना आकाशातून समुद्राचे विहंगम दृश्य पाहण्याचा आनंद वेगळाच होता.         
   बनाना राईड आणि बाईक राईड करताना वेग, थरार आणि हास्य यांचा सुंदर संगम अनुभवायला मिळाला. कोरल आयलंडवरील प्रत्येक क्षण साहस, आनंद आणि आठवणींनी भरलेला होता.
वाहतूक व्यवस्था
              शिस्त आणि सोय येथील वाहतूक व्यवस्था अत्यंत उत्कृष्ट आहे. मेट्रो, स्कायट्रेन, बस, टॅक्सी, व वर्दळ असतानाही एकही हॉर्न आम्ही ऐकला नाही हे नवलच, सर्व काही वेळेवर, स्वच्छ आणि शिस्तबद्ध. परदेशातील शिस्त पाहून आपणही बरेच काही शिकतो..  
मैत्री, अनुभव आणि आठवणी
             हा दौरा 3 रात्र 4 दिवसांचा होता, पण या थोड्या दिवसांत आम्ही आयुष्यभर पुरतील इतक्या आठवणी कमावल्या. या प्रवासात मला डॉ. नारायण जाधव, पंकज भावसार, जयेश राजपूत, डॉ.सुधीर पाटील, डॉ. माधव पाटील, डॉ. गिरासे, डॉ. मेघराज पाटील, पोपट पाटील, आबा पाटील, विशाल सूर्यवंशी आणि इतर सर्व मित्रांसोबत घालवलेले क्षण आयुष्यभर स्मरणात राहतील.   
              माझ्यासाठी पहिला विदेश टूर थायलंड हा केवळ प्रवास नव्हता, तर तो स्वप्नपूर्ती, आत्मविश्वास, नव्या नात्यांची सुरुवात आणि आयुष्य समृद्ध करणारा अनुभव ठरला. डॉ. नारायण जाधव यांच्या प्रेरणेमुळे सुरू झालेला, पंकज भावसार, नरेंद्र भाई, संदीप लूला, यांच्या नियोजनामुळे यशस्वी झालेला,                            
               थायलंडमधील सुंदर क्षण मनात साठवत आम्ही परतीच्या तयारीला लागलो. परतीपूर्वी आम्ही इंदिरा मार्केट येथे खरेदीसाठी गेलो. तेथील रंगीबेरंगी बाजारपेठ, स्मृतिचिन्हे, कपडे, शोभेच्या वस्तू आणि स्थानिक वस्तूंनी मन वेधून घेतले.
                 त्यानंतर आम्ही स्वर्णभूमी (Suvarnabhumi) विमानतळावर पोहोचलो. हा भव्य, आधुनिक आणि अत्यंत शिस्तबद्ध विमानतळ पाहून थक्क व्हायला झाले. परतीचे उड्डाण घेताना मनात आनंद, समाधान आणि आयुष्यभरासाठी जपण्यासारख्या आठवणी होत्या. याठिकाणी विष्णू यांचे समुद्र मंथनचा देखावा डोळ्याचे पारणे फेडणारा आहे.
         या सहलीत नवीन भेटलेल्या मित्रांमध्ये शिक्षण कमी झालेले असले तरी अनुभवातून शिकलेला, स्वभावाने गोड व दुसऱ्याला हसवण्यासाठी जगणारा, चिनोदा येथील पोपट पाटील, एक अनुभवी व शिस्तीत गोठलेले डॉ.आबा पाटील, उत्सवाची गोफ असलेले सर्वांच्या मदतीला धावून येणारे डॉ.मेघराज पाटील, अनुभवी शांत संयमी असलेले डॉ.सुधीर पाटील, सूक्ष्म निरीक्षक अभ्यासक मातीशी जोडलेले डॉ.माधव पाटील, आपल्या व्यावसायिक जीवनात कमी वयात अनेक भाषा अवगत केलेले दिलदार मित्र महेश राजपूत, कमी वयात अनेक देशांच्या भ्रमंती केलेले उदार मतवादी असलेले आपल्या जवळच्यानीही जग फिरावे अशी इच्छा असलेले पंकज भावसार आणि अशा सर्व अष्टपैलूंना एका दौऱ्यात गुंफण्याची कला असलेले डॉ.नारायण जाधव यांच्या सहवास लाभला आणि सर्व मित्रांच्या मैत्रीमुळे संस्मरणीय ठरलेला हा प्रवास माझ्या आयुष्यातील एक सुवर्ण अध्याय बनून राहील......

सुधाकर मराठे तळोदा
     09595008844