Breking News

बुधवार, १८ ऑक्टोबर, २०१७

नियतीच्या फेऱ्यानंतर वयाची पन्नाशी गाठणाऱ्या दाम्पत्याने दिला जुळ्यांना जन्म

मनी इच्छीले; सुपुत्र पुन्हा उदरी जन्मले! 
ऐन तारुण्यात पदार्पण केलेल्या दोन्ही मुलांना नियतीने हिरावून नेल्यानंतर नैराश्यात जीवन व्यतीत करीत असलेल्या माता-पित्यांनी वयाची पन्नाशी उलटल्यानंतर पुन्हा बाळाला जन्मास घालण्याचा निर्णय घेतला. पण २५ वर्षांपूर्वी केलेल्या कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रियेचा अडसर असल्याने तळोद्यातील या दाम्पत्याने वैद्यकीय सल्ला घेऊन शस्त्रक्रिया करून घेतली. त्यानंतर दैवाने दिलेले वरदान म्हणा किंवा आणखी काही, पण या दाम्पत्यास दोन जुळी मुले झाली. राजेंद्र पाटील (५५) आणि उषाबाई पाटील (५०) अशी या दाम्पत्याची नावे आहेत.. धडगाव तालुक्यातील अतिदुर्गम भागात असलेल्या बिलगाव येथे बारामुखी धबधबा पाहण्यासाठी २५ जुलै २०१६ रोजी तळोद्यातील सात मित्र गेले होते. तेव्हा धबधब्याखाली आंघोळ करण्याचा मोह त्यांना आवरता आला नाही. पण, धबधब्याच्या पाण्यात उतरतांना त्यांना पाण्याच्या खोलीचा अंदाज आला नाही. परिणामी, पाण्यात बुडून नुकत्यात वयात आलेल्या दोन्ही तरुणांचा दुर्दैवी अंत झाला. या घटनेत तळोदा येथील बँक कर्मचारी राजेंद्र पाटील यांची दोन्ही मुले राहुल (वय २८) व विशाल (वय २५) हे दोन्ही भाऊ एकाच दिवशी आपल्या आई-वडिलांना मागे सोडून गेले. या घटनेचा राजेंद्र पाटील आणि उषाबाई पाटील या दाम्पत्यास मोठा धक्का बसला. . नियतीने या कुटुंबाच्या वंशवेलीवर उमललेली दोन्ही फुले खुडून टाकली आणि कुटुंबात वंशाला
दिवाच राहिला नाही. नियतीने काळजावर घातलेल्या घावाच्या वेदना सोसत असताना या पाटील दाम्पत्याने वयाची पन्नाशी उलटल्यानंतरही बाळाला जन्मास घालण्याचा निर्णय घेतला. पण, असे करीत असताना २५ वर्षांपूर्वी उषाबाई पाटील यांच्यावर करण्यात आलेल्या कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेचा अडसर होता. म्हणून राजेंद्र पाटील यांनी उषाबाई पाटील यांनी याबाबत वैद्यकीय सल्ला घेतला. नाशिक येथील खासगी रुग्णालयात जाऊन शस्त्रक्रिया करून घेतली. यामुळे पाटील दाम्पत्यास मूल होण्याचा मार्ग मोकळा झाला. तरीही फार काळजी घेण्याची गरज होती. त्यानंतर उषाबाईंनी गेल्या दोन दिवसांपूर्वीच सुदृढ अशा जुळ्या मुलांना जन्म दिला. यामुळे हा विषय संपूर्ण शहरासाठी कुतुहलाचा ठरला. सर्वांची पाऊले पाटील दाम्पत्याच्या घराकडे वळू लागली. जुळ्या मुलांना पाहण्यासाठी गर्दी होऊ लागली आहे. प्रत्येक जण या जुळ्या मुलांना बघून पाटील दाम्पत्याच्या उदरी पुन्हा एकदा राहूल आणि विशाल यांनी जन्म घेतल्याची प्रतिक्रिया देत आहेत..