Breking News

मंगळवार, २७ फेब्रुवारी, २०१८

नवाब मलिकांविरोधात तळोदा न्यायालयात तक्रार!

ना.रावलांची बदनामी प्रकरण : श्यामसिंग राजपूत यांची पत्रकार परिषदेत माहिती सरकारी प्रकल्प जाहीर झालेल्या गावातील जमिनी कवडीमोल दराने विकत घेऊन सरकारला त्या वाढीव किमतीला विकण्याचा आरोप करीत भाजपाचे मंत्री जयकुमार रावल यांच्या बदनामीकारक वक्तव्य केल्याप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांच्या विरोधात तळोदा न्यायालयात तक्रार दाखल करण्यात आली आहे, अशी माहिती भाजपाचे तालुकाध्यक्ष श्यामसिंग राजपूत यांनी दिली. . नवाब मलिक यांनी कोणतीही खातरजमा न करता खालच्या पातळीवर जाऊन पालकमंत्री तथा पर्यटनमंत्री जयकुमार रावल तसेच भारतीय जनता पार्टीवर आरोप केले होते. धर्मा मंगा पाटील यांच्या मृत्यूनंतर जयकुमार रावल व पक्षाला बदनाम करण्याच्या उद्देशाने व राजकीय प्रतिष्ठा नष्ट करण्याचा प्रयत्न करण्यात आले. ना.रावल यांच्यावर खोटे व तथ्यहीन व बिनबुडाचे आरोप केले आहेत. रावल कुटुंबीय धुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांची फसवणूक करत असून पैसे कमावण्याचा सोपा मार्ग त्यांनी अवलंबले आहे. धुळे जिल्ह्यातील अनेक जमिनी जयकुमार रावल किंवा त्यांच्या कंपनीच्या नावे आहेत. रावल हे भूमाफिया असून त्यांनी माजी राष्ट्रपती यांची देखील जमीन बळकावली असल्याचा आरोपासह विविध आरोप पत्रकार परिषद घेऊन राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी केले होते. यामुळे जयकुमार रावल विरुद्ध केलेले आरोप हे केवळ वयक्तीक व पक्षाची बदनामी करण्याच्या हेतूने आहेत. यात केवळ त्यांची वयक्तीक व सामाजिक तसेच पक्षाची बदनामी करण्याचा हेतू असून त्यांची राजकीय प्रतिष्ठा संपवण्याच्या कट असल्याचे श्यामसिंग राजपूत यांनी यावेळी सांगितले. विरोधकांच्या केलेल्या आरोपात कुठलाही शुद्ध हेतू नाही, तसेच बिनबुडाचा आरोपामुळे संघटनेची व व्यक्तीची बदनामी झाल्याने नवाब मलिक यांच्या विरोधात वकीलांमार्फत तळोदा न्यायालयात ४९९, ५०० प्रमाणे फिर्याद नोंद करण्यात आली असल्याची माहिती श्यामसिंग राजपूत यांनी पत्रकार परिषदेत दिली..

सदर प्रकरणी तळोदा न्यायालयात अर्ज क्रमांक 51/18 असा दाखल झाला आहे. दि.17 मार्च रोजी सदर प्रकरण पडताळणी कामी ठेवण्यात आले आहे. या प्रकरणाची प्रथम वर्ग न्याय दण्डाधीकारी यांच्या समोर सुनावणी होणार आहे.. वकील संदीप पवार


सोमवार, २६ फेब्रुवारी, २०१८

दै.'पुण्यनगरी' च्या वृत्ताने बांधकाम विभागाला आली जाग

हातोडा पुलावरील खड्ड्यांसह भगदाड बुजण्यास सुरुवात
हातोडा पुलावरील जोड रस्त्यालगत भगदाड पडल्याने अपघात होण्याची शक्यता निर्माण झाली होती. सदर पुलाचे सहा महिन्यापुर्वी लोकार्पण होवून वाहतुकीला खुला करण्यात आला आहे. नित्कृष्ट कामामुळे वारंवार पुलावर खड्डे, भगदाड पडत आहेत. पुलाच्या गुणवत्तेबाबत नागरीकांसह वाहनधारकांनी प्रश्न उपस्थित केला आहे. तर नुकत्याच पडलेल्या भगदाडबाबत दै.'पुण्यनगरी' शनीवारच्या अंकात सचित्र बातमी प्रकाशित केली होती. या बातमीनंतर बांधकाम विभाग खडबडून जागा झाला असून ठिकठिकाणी पडलेले खड्डे व भगदाड बुजण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. . तापी नदीवरील हातोडा पुलाच्या कामासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मात्र हा पूल बांधकाम ते उद्घाटन असा सतत चर्चेंत राहिला आहे. अवघ्या सहा महिन्यात पुलाला जोडणाऱ्या रस्त्यादरम्यान एक मोठ भगदाड पडून जोड रस्त्यादरम्यान भराव खचल्याने याठिकाणी मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. याबाबत दै.'पुण्यनगरी' सचित्र वृत्त प्रकाशित केले. वृत्त प्रकाशित होताच बांधकाम विभाग खडबडून जागे झाले शनीवारी सकाळी जोड रस्त्यादरम्यान पडलेले भगदाड बुजण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. मात्र, खचलेला भराव तसाच असून यामुळे अपघाताची शक्यता वाहनधारकांनी बोलून दाखविली आहे. .

रविवार, २५ फेब्रुवारी, २०१८

हातोडा पुलाला पुन्हा पडले भगदाड

 तापी नदीवरील हातोडा पूल रहदारीसाठी सुरु होऊन अवघे सहा महिने झाले आहेत,
मात्र, पुलावरील जोड रस्त्याचा लगत एक भगदाड पडले असून ठिकठिकाणी भराव खचला आहे. यामुळे पुलाचा कामांविषयी प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे. तर अवजड वाहने यात अडकून अपघात घडण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याकडे संबंधित विभागाने लक्ष देण्याची मागणी वाहनधारकांनी केली आहे. . तापी नदीवरील हातोडा पुलाचे कामासाठी कोट्यावधी रुपये खर्च करण्यात आले आहेत. मागीलवर्षी काम पूर्ण झाल्यानंतर १५ आगस्ट रोजी हातोडा पुलाचे लोकार्पण पालकमंत्री जयकुमार रावल यांच्या अध्यक्षतेखाली खा.डॉ.हीना गावित, आ.डॉ.विजयकुमार गावित, आ.उदेसिंग पाडवी, आ.चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ.मल्लिनाथ कलशेट्टी, भरत माळी, डॉ.शशिकांत वाणी यांच्या उपस्थितीत पार पडला. हातोडा पूल बांधकाम ते उद्घाटन असा सतत चर्चेंत होता. लोकर्पणानंतरही हातोडा पूल पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. पुलाला जोडणाऱ्या रस्त्यादरम्यान एक मोठ भगदाड पडले असून भराव खचला आहे. यामुळे वाहन त्यात अडकण्याची भीती निर्माण झाली आहे. सुरुवातीला या पुलावरून लहान वाहनांना परवानगी देण्यात आली होती. त्यानंतर नागरीक व विविध संघटनांच्या मागणीवरून पुलावरुन मिनीबस व स्कुल बसला वाहतुकीची परवानगी देण्यात आली. या पुलामुळे नंदुरबारचे अंतर तळोदा, धडगाव येथून २० किमी. ने कमी झाले आहे. दरम्यान, कोट्यावधी रुपये खर्च करुन बांधण्यात आलेल्या या पुलावर भगदाड पडले असून भराव खचला आहे. यावरुन अवजड वाहने, रेती वाहतूकीची वाहने धावतात. जोडरस्त्या दरम्यान पडलेले भगदाड तातडीने बुजले नाही तर यात वाहने रुतून अपघात होण्याची शक्यता आहे. संबंधित विभागाने याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी वाहनधारकांनी केली आहे..



सोमवार, १९ फेब्रुवारी, २०१८

बिबट्याची मादी अन् बछड्यांची पहाटे झाली भेट!


तळोदा तालुक्यातील गुंजाळी शिवारात ऊसतोडणी करीत असतांना मजुरांना बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. वन कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन बछड्यांवर नजर ठेऊन होते. काल दि.१८ रोजी पहाटेच्या सुमारास आईपासून बिछडलेल्या मादीने आपल्या तिघा बछड्यांना घेऊन गेली आहे. . तळोदा शहरापासून १० कि.मी.अंतरावरील गुंजाळी गावात योगेश सुभाष शर्मा यांच्या शेतात ऊसतोड सुरु असतांना मजूरांना बिबट्याचे एक महिन्यांचे तीन बछडे मिळून आले. सदर घटनेची वनविभागाला माहिती मिळताच वनक्षेत्रपाल निलेश रोडे, वनपाल आर.बी.वायकर, वनपाल ए.सी.पाटील, वनरक्षक शरद मोरे, सचिन वाघ यांच्यासह वनकर्मचाऱ्यांनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली होती. ऊसतोड थांबवून परिसर मोकळा केला होता. बछड्यांना ताब्यात घेऊन त्यांची निगा राखणे, त्यांना पोषक आहार देणे कठीण होत असल्यामुळे वनविभागाने बछड्यांना ताब्यात न घेता त्याच ठिकाणी बछड्यांवर वनकर्मचारी नजर ठेऊन होते. मध्यरात्री त्या भागात पिल्लांसाठी व्याकुळ झालेली बिबट्या मादी डरकाळी फोडत पिलांना आवाज देत त्यांचा शोध घेत होती. यावेळी बछड्यांकडून प्रतिसाद मिळाल्याने काल रविवारी पहाटेच्या सुमारास बिछडलेल्या बछड्यांची बिबट्या मादीची भेट झाली. बिबट्या मादीचे आपले बछडे सोबत नेत्यांना दिसून आल्याचे वनमजूर भिमसिंग कोठारे, सुनिल वळवी, प्रताप डमकूल, जोला ठाकरे यांनी प्रत्यक्ष पाहिले. तसेच यासंदर्भात वनविभागाला कळविले. काही तासातच विभक्त झालेले बिबट्या मादी व बछड्यांची भेट झाल्याने वनविभागाने समाधान व्यक्त केले आहे..


गुंजाळी शिवारात आढळले बिबट्याचे तीन बछडे

तळोदा तालुक्यातील गुंजाळी शिवारात ऊसतोडणी करीत असतांना मजुरांला बिबट्याचे तीन बछडे आढळून आले. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी भेट दिली असून या बछड्यांवर नजर ठेवून आहेत.
तळोदा शहरापासून १० किमी. अंतरावरील गुंजाळी गावात योगेश सुभाष शर्मा यांच्या शेतात ऊसतोड सुरु असतांना मजुरांना बिबट्याचे बछडे दिसून आल्याने त्यांनी शेतातूप पळ काढला. यावेळी काही मजुरांनी धाडस दाखवित शेतातून जावून पाहणी केली असता एक महिना वयाचे तीन बिबट्याचे बछडे दिसून आले. सदर घटना मजुरांनी शेत मालकाला कळविली. त्यानंतर शेतमालकाने वनविभागाला माहिती दिली. वनविभागाचे कर्मचारी वनक्षेत्रपाल निलेश रोडे, वनपाल आर.बी.वायकर, वनपाल ए.सी.पाटील, वनरक्षक शरद मोरे, सचिन वाघ आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली. ऊसतोड थांबवून परिसर मोकळा करण्यात आला. यापूर्वी
असाच शेतात आढळलेल्या बछड्याला वातावरण संतुलन व पोषण आहार यामुळे वाचविण्यात वनविभागाला अपयश आले आहे. त्यामुळे बछड्यांना ताब्यात न घेता मादी येऊन त्यांना घेऊन जाईल, यासाठी त्यांच्यावर लक्ष  ठेवण्यात येत आहे.. यापूर्वी बोरद परिसरातील गोंडाळा शिवारात दि. २४ डिसेंबर रोजी ऊसाची पाचट जाळण्यासाठी लावण्यात आलेल्या आगीत १५ दिवसाचे तीन बिबटचे पिल्लू होरपळले होते. त्यापैकी एक बछडे घेऊन जाण्यास मादीला यश आले होते. तर दोनपैकी एकाचा जागीच मृत्यू झाला होता. तर एक बछडे वनविभागाने ताब्यात घेतले होते. अथक प्रयत्न करूनही त्या पिल्लास वाचवण्यास अपयश आले होते. यावर्षी वनविभागाने केलेल्या प्राणी गणना दरम्यान बिबटचा उल्लेख नाही. मात्र दोन महिन्यात पुन्हा बिबट्याचे तीन बछडे आढळून आल्याने या भागात एकूण बिबट्यांची संख्या किती असा प्रश्न निर्माण झाला आहे.

गुंजाळी शिवारात आढळले बिबट्याचे तीन बछडे तळोदा तालुक्यातील उमराई येथे ऊस तोडणी दरम्यान एक महिना वयाचे बिबट्याचे तीन बछडे आढळून आली. शेतातील ऊस तोड थांबविण्यात आली आहे. त्या बछड्यांवर वनविभागाचे कर्मचारी लक्ष ठेवून आहेत. . - सचिन रोडे . वनक्षेत्रपाल तळोदा.



रविवार, १८ फेब्रुवारी, २०१८

कोठारच्या दरीत नवजात अर्भकाचा टाहो!

गावकरी व आरोग्य विभागाच्या प्रयत्नांनी अर्भकास जीवदान :
तळोदा तालुक्यातील कोठार येथील दरीत एक नवजात अर्भक बेवारस स्थितीत आढळून आले आहे. या नवजात अर्भकास तळोदा उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले असून येथील डॉक्टरांनी उपचार सुरु केल्याने त्याची प्रकृती स्थिर असून सदर अर्भकास पुढील उपचारासाठी नंदुरबार जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. दरम्यान, माणुसकीला काळीमा फासणाऱ्या या घटनेची सर्वत्र निंदा करण्यात येत आहे.. तळोदा शहरापासून सुमारे १५ किमी. अंतरावर सातपुड्याच्या पायथ्याशी कोठार गाव आहे. येथूनच सातपुड्याच्या जंगलास सुरुवात होते. कोठार येथील गुलाबसिंग पाडवी हे काल शुक्रवारी २ वाजेच्या सुमारास गावानजीकच्या जंगलातून जात असतांना त्यांना लहान बाळाचा रडण्याचा आवाज ऐकू आला. त्यामुळे ते आवाजाच्या दिशेने गेले असता त्यांना एका लहान दरीत एक नवजात अर्भक (पुरुष जातीचे) बेवारस स्थितीत आढळून आले. याबाबत त्यांनी गावकऱ्यांना माहिती दिली. गावकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. गुलाबसिंग पाडवी यांनी कोठार येथील अनंत ज्ञानदीप आश्रमशाळेचे शिक्षक गोविंदू पाटील यांना याबाबत कळविले व कोणाला तरी संपर्क करण्यास सांगितले.गोविंद पाटील यांनी तळोदा
तालुक्यात आरोग्यमित्र म्हणून काम पाहणारे आ.उदेसिंग पाडवी यांच्या कार्यालयातील कौशल सवाई यांच्याशी संपर्क साधत घटनेबाबत माहिती कळविली. कौशल सवाई यांनी तळोदा पोलिस ठाण्यात संपर्क साधला व १०८ रुग्णवाहिका देण्याबाबत विनंती केली. रुग्णवाहिकेत डॉ. रिमन पावरा व कौशल सवाई हे कोठार येथे दाखल झाले. होते. डॉ. पावरा यांनी नवजात अर्भकाची तपासणी केली. अर्भकाचा श्वासोच्छवास सुरु असल्याने त्यास तातडीने प्राणवायू लावत त्याची स्वछता केली. कोठार येथे प्राथमिक उपचार केल्यानंतर नवजात अर्भकाला तातडीने तळोदा येथील उपजिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. सदर अर्भक १७०० ग्रॅम वजनाचे असून त्यावर डॉ.विजय पाटील यांनी उपचार करुन अतिदक्षता विभागात दाखल केले. तीन-चार तासापासून बाळाला दुध न मिळाल्याने त्याच्या शरीरातील पाणी कमी झाल्याने त्यावर उपचार सुरु करण्यात आले. तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ. महेंद्र चव्हाण, तालुका वैद्यकीश अधिक्षक डॉ.विजय पाटील यांनी अर्भकाची पाहणी केली. सदर अर्भकास पुढील उपचारासाठी नंदुरबार येथील जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले. याबाबत तळोदा पोलिस ठाण्यात रात्री उशिरा पर्यंत नोंद करण्यात आली नव्हती..

  बाळाची प्रकृती चांगली आहे. चार-पाच तासापासून त्याला दुध न मिळाल्याने त्याच्या शरीरातील पाणी कमी झाले आहे. त्यावर उपजिल्हा रुग्णालयात उपचार करण्यात येवून पुढील उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात हलविण्यात आले आहे. . - डॉ.महेंद्र चव्हाण, तालुका वैद्यकीय अधिकारी तळोदा.










गुरुवार, १५ फेब्रुवारी, २०१८

बारगळ गढीच्या संवर्धनासाठी सव्वा कोटीचा निधी!

पर्यटन विभागांतर्गत होणार विकास : ऐतिहासिक वास्तूला प्राप्त होणार गतवैभव. खांदेशातील प्राचीन, ऐतिहासिक वास्तू असलेल्या तळोदा शहरातील बारगळ गढीच्या संवर्धनासाठी पर्यटन विभागाकडून सव्वाकोटीचा निधी मंजूर करण्यात आला आहे. यामुळे जिल्ह्यातील प्राचीत ऐतिकासिक वास्तूचे जतन होण्यास मदत मिळणार आहे. . तळोदा शहराचे ऐतिहासिक वैभव असलेल्या बारगळ गढीच्या संवर्धनासाठी जहागीरदार अमरजित बारगळ यांनी पर्यटन विभागाकडे वारंवार पाठपुरावा केला आहे. खांदेशातील निवडक दुर्मिळ वास्तूपैकी एक असणाऱ्या तळोद्यातील बारगढ गढीला नंदुरबार, धुळे, जळगाव यासह नाशिक, पुणे, मुंबई येथून अभ्यासक, इतिहास तज्ञ, पर्यटक भेट देवून माहिती जाणुन घेतात. मात्र, काळानुरुप या वास्तूची बरीच पडझड झाली असून यातील प्रवेशद्वार, बुरुज, सभा मंडप, प्रमुख इमारत, लाकडी कोरीव काम, विविध झरोके, प्राचीन खिडक्या आदी जीर्ण झालेली आहेत. त्यामुळे या वास्तूचे संवर्धनासाठी बारगळ कुटुंबातील सदस्यांकडून प्रयत्न सुरू होते, सार्वजनिक बांधकाम विभागाकडून याबाबत प्रस्ताव सादर करण्यात आला होता. त्यावर ६ फेब्रुवारी रोजी शासन आदेश पारित करण्यात आला असून तळोद्यातील गढीचा विकासासाठी अंदाजित एक कोटी २४ लाख ९१ हजार रुपयाचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यापैकी ४० टक्के रक्कम बांधकाम विभागाकडे वर्ग केली जाणार आहे. मात्र, याबाबत बांधकाम विभागाकडे कुठलाही पत्रव्यवहार जिल्हाधिकारी कार्यलयातून झाला नसल्याचे समजते. जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी या ऐतिहासिक वास्तूच्या संवर्धनासाठी निधी मंजूर केल्याने समाधान व्यक्त करण्यात येत आहे. .

तळोदा शहरातील ऐतिहासिक बारगड गढीचे संवर्धन व्हावे, यासाठी जिल्हाधिकारी यांच्याकडे प्रस्ताव सादर केले होते. ६ फेब्रुवारी रोजी याबाबत शासन आदेश पारित झाल्याचे कळाले आहे. मात्र, अद्याप जिल्हाधिकारी कार्यालयातून मंजुरी पत्र प्राप्त झालेले नाही.. - पी.जे.वळवी, . अभियंता सार्वजनिक बांधकाम. 

बारगळ गढी खांदेशातील प्राचीन वास्तू असून गढीची काळानुरुप बरीच पडझड झाली आहे. या वास्तूची डागडुजी, विविध कामे होवून तीला गतवैभव प्राप्त होणार आहे. पर्यटन मंत्री जयकुमार रावल यांनी निधी मंजूर केला आहे. तर येथील प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींचे यासाठी योगदान मिळाले आहे. . - अमरजीत बारगळ.







मंगळवार, १३ फेब्रुवारी, २०१८

नंदुरबार जिल्हा आठवे साहित्य संमेलन


कर्नाटक राज्याने भाषा, साहित्य व संस्कृतीवर आठ कोटी रुपये अनुदान दिले तर आपल्या राज्यात अजूनही
आखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला केवळ 25 लाखांचे अनुदान आहे. त्यामुळे शासनाचीच याबाबत मोठी अनास्था असल्याची खंत अखिल भारतीय साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाद जोशी यांनी साहित्य संमेलनात व्यक्त केली. तळोदा येथील महाविद्यालयात रविवारी नंदुरबार जिल्हा साहित्य अकादमी व आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने नंदुरबार जिल्हा आठवे साहित्य संमेलन झाले. त्यावेळी डॉ.श्रीपाद जोशी बोलत होते. अध्यक्षस्थानी निंबाजीराव बागुल तर प्रमुख अतिथी म्हणून प्रा.डॉ.पीतांबर सरोदे, राजेंद्रकुमार गावीत, वाहरू सोनवणे, विदर्भ साहित्य संघाचे प्रदीप मोहिते, महामंडळाचे कार्याध्यक्ष विलास देशपांडे, रमाकांत पाटील, अविनाश पाटील, राजू पाटील, जिल्हा ग्रंथालय अधिकारी संतोष जाधव उपस्थित होते. डॉ.जोशी म्हणाले, आपला देश पारंपारिक, बहुभाषिक व आदिवासी जाती-जमातींचा आहे. त्यामुळे भाषा व संस्कृतीला खूप महत्त्व आहे. मात्र शासनाच्या उदासिन धोरणामुळे सध्या त्याच्यावर मोठा आघात होत आहे. वास्तविक साहित्य व संस्कृतीत समाजाच्या
 विकासाबरोबरच देशाच्या विकासाचेही प्रतिबिंब आहे. मात्र हल्ली याबाबतच उदासिनता दिसून येत आहे. या विषयी खंत व्यक्त करून शेजारच्या कर्नाटक राज्यात सांस्कृतिक मंडळाला तब्बल आठ कोटीचे अनुदान दिले जाते तर आपल्या राज्यात सांस्कृतिक महामंडळावर केवळ 25 लाखाचे अनुदान राखण्यात आले आहे. तेही वर्षानुवर्षे तेवढेच आहे. त्यावर अजूनही वाढ केली जात नसल्याचे त्यांनी सांगितले. राज्यकत्र्याच्या अनास्थेबाबत त्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. विधान परिषदेतही साहित्य क्षेत्रातील व्यक्तिंना पुरेशे प्रतिनिधीत्व दिले जात नसल्याचे सांगून याबाबत कायदेशीर लढाई लढली जात असल्याचे ते म्हणाले. साहित्याच्या क्षेत्रातही मुठभर लोकांची मक्तेदारी वाढल्यामुळे विद्रोही साहित्यिक निर्माण होत आहे. यावरही विचार झाला पाहिजे. त्याचबरोबर मराठी भाषेचा विकास करण्याऐवजी राज्यातील 80 हजार मराठी शाळा बंद करण्याचा निर्णय शासन घेत असल्याचे त्यांनी सांगितले. साहित्य संमेलनाच्या अवस्थाबाबत डॉ.श्रीपाद जोशी म्हणाले, अगदी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदासाठीदेखील निवडणूक घेतली जाते. एवढे दुर्देव या क्षेत्रातदेखील आले आहे. भाषा व संस्कृतीमुळेच देशाचा विकास आहे आणि मुठभर लोकांच्या हाती असलेल ही मक्तेदारी मोडून काढण्यासाठी सर्वानी एकत्र येण्याचे आवाहनही शेवटी त्यांनी केले.
या वेळी त्यांनी गेल्या आठ वर्षापासून जिल्हास्तरीय साहित्य संमेलने यशस्वी केले जात असल्याने साहित्य अकादमीचे कौतुक केले. या वेळी संमेलनाचे अध्यक्ष निंबाजीराव बागुल यांनी अध्यक्षीय भाषणात सांगितले, नंदुरबार जिल्ह्यातील सांस्कृतीक उत्सव व परंपरांना प्राचिन इतिहास आहे. त्यात आगळी वेगळी संस्कृती दडलेली आहे. ललित उत्सव, रासगान, गाव दिवाळी या सारख्या परंपरा येथे अस्तित्वात आहेत. त्याचबरोबर मंदिर, चैत्य, शिल्प, शिलालेख व लोकसाहित्य, लोककला यातूनही इथल्या साहित्याची जाणीव होते. साहित्यातून समाजातील रुढी, परंपरा यांचा विधायकपणे वापर करीत संस्कृतीची मांडणी केली जाते. त्यामुळेच साहित्यामुळे समाजाची प्रगती होत आहे. साहित्यात बोली भाषेला महत्त्व आहे जर बोलीभाषा नष्ट झाली तर संस्कृतीही नष्ट होईल. त्यामुळे बोलीभाषा टिकली पाहिजे. प्रास्ताविक व पाहुण्यांचा परिचय प्रा.पीतांबर सरोदे यांनी केला. संमेलनाची भूमिका विकास देशपांडे यांनी मांडली तर साहित्य संमेलनाची पाश्र्वभूमि संमेलनाचे स्वागताध्यक्ष राजेंद्रकुमार गावीत यांनी मांडली. सूत्रसंचालन विकास पाटील, रजनी रघुवंशी तर आभार रमाकांत पाटील यांनी मानले. व्यासपीठावर कॉलेज ट्रस्टचे अध्यक्ष सुदाम पाटील, आदिवासी देवमोगरा एज्युकेशन सोसायटीच्या जयाबाई गावीत, साईनाथ शिक्षण संस्थेचे अध्यक्ष डॉ.शशिकांत वाणी, प्राचार्य रामय्या, सुलभा महिरे, डॉ.राजेश वळवी, सतीष वळवी, संजय माळी, रुपसिंग पाडवी, हेमलता डामरे, प्रा.विलास डामरे, राजेंद्र राजपूत, जयसिंग माळी, जितेंद्र पाडवी, हिरामण पाडवी, नीमेश सूर्यवंशी, विनायक माळी, फुलसिंग पाडवी, प्रा.जयपाल शिंदे उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी ग्रंथ दिंडीची मिरवणूक काढण्यात आली. या ग्रंथ दिंडीचा शुभारंभ जिल्हा पोलीस अधीक्षक संजय पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. त्यानंतर ही दिंडी शेठ के.डी. हायस्कूलपासून मेनरोड, तहसील कचेरी, कॉलेज रोडमार्गे महाविद्यालयात समारोप करण्यात आला.
                 कला-साहित्यातून संस्कृतीचा वारसा 
परिसंवाद-१. जिल्हा साहित्य संमेलनातील परिसंवाद एकमध्ये साहित्य, संस्कृती व कलेचा आजच्या समाज जीवनावरील प्रभाव याविषयांवर सहभागी परिसंवादकारांनी मते मांडली. माणूस घडविण्यासाठी साहित्य खूप महत्त्वाचे आहे. तसेच आपल्याला मिळालेला कलेचा वारसा अधिकाधिक समृध्द व्हायला पाहिजे. कारण कला व साहित्याच्या माध्यमातूनच संस्कृतीचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जातात.. संमेलनातील परिसंवाद एकच्या अध्यक्षस्थानी डॉ.सविता पाटील होत्या. तर संयोजन म्हणून प्रा.जयपालसिंग शिंदे यांनी काम पाहिले. यावेळी परिसंवादात श्रीराम दाऊतखाने, दीपक कुळकर्णी यांनी सहभाग नोंदवून साहित्य, संस्कृती व कलेचा आजचा समाज जीवनावरील प्रभाव याविषयी मते मांडली. श्रीराम दाऊतखाने म्हणाले की, माणसाला माणूस बनविण्यासाठीच्या प्रक्रियेत साहित्य खूप उपयुक्त ठरते. साहित्य व कलेपासून प्रेरणा घेऊन अनेक थोर व्यक्ती घडले आहेत. साहित्याचा मानवी समाज जीवनावर मोठ्या प्रमाणात परिणाम घडून येत असतो.
मानवी जीवनावर धार्मिक साहित्य, संत वाड्:मय, प्रबोधन साहित्य, समस्या प्रधान साहित्य यांचा मोठा परिणाम घडून येतो. साहित्याचा मोठा चांगला परिणाम हा समाजजीवनावर होत असतो. तसेच दीपक कुळकर्णी म्हणाले की, साहित्य, कला, संस्कृती या क्षेत्रात आपण वाहून घेऊ शकत नाही. कला जोपासतो पण ती वृद्धींगत करण्यासाठी जेवढी गुंतवणूक समाजाने करायला पाहिजे, तेवढी होत नाही. कलेचा समाज जीवनावर परिणाम होतो, पण कसा व्हायला पाहिजे हे समाज म्हणून आपल्यावर सर्वस्वी अवलंबून असते. आपल्याला जो कलेचा वारसा मिळालेला आहे, तो अधिकाधिक समृद्ध करायला पाहिजे, असे सांगितले. अध्यक्षीय समारोपात डॉ.सविता पाटील यांनी सांगितले की, संस्कृती, साहित्य व कला या एकमेकांवर अवलंबून असणाऱ्या गोष्टी असल्याचे सांगितले. दैनंदिन जीवन जगत असतांना ते कला, साहित्य, संस्कृतीच्या अनुषंगाने जगत असतो. कला व साहित्याच्या माध्यमातून संस्कृतीचा वारसा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे जात असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले..
परिसंवाद-2 




            'श्यामची आई' नाट्यरुपीने प्रेक्षकांचे डोळे पाणावले! 
तळोदा येथे आयोजित नंदुरबार जिल्हा साहित्य संमेलनातील सभागृह दोनमध्ये सादरीकरणातून
नाट्यरुपीने श्यामची आई या सानेगुरूजींच्या कथेचे महत्त्व पटवून देण्यात आले. आपल्या घाबरट श्यामला बळ देण्यासाठी आई कशी त्या प्रोत्साहन देते यासह सकुमावशी व श्याम यांच्यातील हृदयस्पर्शी संवादाच्या नाट्यरुपी सादरीकरणातून उपस्थित प्रेक्षकांचे डोळे पाणावले. तसेच आई सोडून सेवा करण्यापूर्वीच आई जग सोडून गेल्याने आता मी घरी जावून काय करु असे श्यामचे वाक्य नाट्यरुपी कानी पडताच भावनिक प्रसंग सादर होताच प्रेक्षकांनी टाळ्या वाजवून प्रतिसाद दिला.. नंदुरबार जिल्हा साहित्य संमेलनात दुपारी अडीच वाजेला एकपात्री नाट्यचे सादरीकरण करण्यात आले. यावेळी डॉ.माधव कदम यांनी श्यामची आई या कथेचे नाट्यरुपी सादरीकरण केले.
 श्याम ज्यावेळी तलावात पोहायला जात नाही, त्यावेळी आई त्याला पोहण्यास जाण्याच्या हट्ट धरते. मात्र भित्रा श्याम लपून बसतो, जाण्यास नकार देतो, अश्यावेळी त्याची आई त्याला फटकारे देऊन पोहण्यास पाठवते. श्याम हिंम्मतीने पोहण्याचा प्रयत्न करतो. श्याम घरी आल्यावर त्याला आई दही देते आणि प्रेमाने जवळ घेवून कुरवाळते व त्याला दही देते. यावेळी श्याम रडतो आणि म्हणतो अंगावरील वळ आले एवढे तू मारलेस, अंगावरचे वळ तरी जाऊदे मगच तुझी दही गोड लागेल. त्यावेळी आई म्हणते, भित्रा होण्यापेक्षा माझ्या श्यामने प्रत्येक गोष्टीत पुढाकार घेऊन निडर होऊन पुढे गेले पाहिजे. तसेच नाट्यरुपाच्या दुसऱ्या क्षणात श्यामची घरची परिस्थिती हालाकीची असते. श्य्याम हा अतिशय खोडकर व हट्टी असतो. एकेदिवशी श्याम अंघोळीनंतर अंग पुसण्यासाठी त्याच्या आईचा साडीचा पदर मागतो.
अंघोळ झाल्यानंतर देवपूजेसाठी निघालेल्या श्याम हा आपले पायाला घाण लागू नये. म्हणून आपल्या आईचा पदर खाली टाक मी त्यावरून देवळात जातो, असा अट्टहास धरतो. आई पदर खाली टाकते व श्यामला म्हणते की, श्याम ज्याप्रमाणे तू तुझे पायाला घाण लागू नये. म्हणून काळजी घेत आहे, तशीच काळजी तू तुझ्या मनाला घाण लागू नये म्हणून आयुष्य भर घ्यावी. या प्रसंगासोबतच सकुमावशी व श्याम यांच्यातील हृदयस्पर्शी संवादाचे सादरीकरण करून उपस्थित्यांच्या डोळ्यात पाणी आणले. ज्या आईची सेवा करायची होती, ती आईच या जगाच्या जंजाळ्यातून निघून गेली. आता घरी जाऊन मी काय करू, ज्या आईने माझ्या श्यामला दही आवडते. म्हणून दहाची वाटी दिली. ती आई या जगात नाही. आता मी कश्यासाठी घरी जाऊ असे भावनिक प्रसंग प्रेक्षकासमोर उभे करून प्रचंड टाळ्या वाजवून प्रेक्षकांनी प्रतिसाद दिला..
                   बालकवींच्या कवितांनी रसिक झाले तृप्त
 साहित्य संमेलनात बालकट्टा कार्यक्रमात चिमुकल्या कवींनी विविध कविता सादर करुन
 श्रोत्ये रसिकांना तृप्त केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रमेश भट होते. या कार्यक्रमात मी वाचलेली पुस्तकांविषयी हर्षल वाघ या बालकाने सत्यजित रे या लेखकाच्या मृत्यू घर या वाचलेल्या पुस्तकाबाबत अनेक अनुभव व्यक्त केले. संगिता पावरा या विद्यार्थिनीने आर.के.नारायण यांच्या मालगुडी डेज या कथा संग्रह कसे प्रभावित केले हे सांगितले. रोशनी रमेश पाडवी या विद्यार्थिनीने भुता गोष्ट वाचली नंतर काय वाटते, याविषयीही सांगितले. शुभम मनिष मराठे या विद्याथ्र्याने श्रीमद् भगवत गीता वाचल्यानंतर आलेली अनुभूतीही सुंदररित्या विषद केली. कविता सादरीकरणात पूजा राठोड हिने निसर्ग कविता तर दीक्षा गुरव या विद्यार्थिनीने मेरे पापा ही आपल्या आईच्या मदतीने तयार केलेली कविता सादर केली. या कवितेने सर्वांना मंत्रमुग्ध केले. तसेच सीमा राठोड या विद्यार्थिनीने बेटी तर मयुरी पाटील हीने पाणी, सूचिता वसावे हिने शांती तर मायावती गावित हिने माझी शाळा, जयश्री वळवी हीने मॉ, वर्षा रामराजे हीने शिक्षक, अवंतिका पाटील व रश्मी भावसार यांनी संस्कृती तर मिलींद धोदरे यांनी आई वर आपली कविता सादर केली. बालकट्टयात सहभाग नोंदविणाऱ्या मुला-मुलींना राजेंद्र गावित, निंबाजीराव बागूल, रमेश भाट, निमेश माळी यांच्या हस्ते प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विकास पाटील यांनी केले. संयोजन निमिश सूर्यवंशी यांनी केले..

              राज्य सरकारकडे 75 लाख ते एक कोटी एवढय़ा निधीची मागणी
बडोदा येथील मराठी साहित्य संमेलनाला राज्य सरकारने 75 लाख ते एक कोटी रुपयांचा निधी दिला असता तर गुजरात सरकारने देखील तेवढाच निधी देऊ केला असता. अजूनही वेळ गेलेली नाही, त्यामुळे यापूर्वी मंजुर केलेली निधीची मागणी पुर्ण केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी करावी अशी अपेक्षा अखिल भारतीय मराठी साहित्य महामंडळाचे अध्यक्ष डॉ.श्रीपाद जोशी यांनी व्यक्त केली. यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या पत्रात डॉ.श्रीपाद जोशी यांनी म्हटले आहे की, गुजरात सरकारने देखील बडोदा साहित्य संमेलनाला 25 लाखांचा निधी दिलेला आहे. परंतु महामंडळाने आधीच राज्य सरकारकडे 75 लाख ते एक कोटी एवढय़ा निधीची मागणी केली होती, आपण ते देण्याचे जाहीर देखील केले असते तर गुजरात सरकारने देखील तेवढा निधी देऊ केला असता. त्यामुळे अजूनही वेळ गेलेली नसून राज्य सरकारने तातडीने ती मागणी पुर्ण केल्याची घोषणा करावी. जेणेकरून गुजरात सरकारकडेही तशा वाढीव सहाय्याची मागणी करता येईल. कर्नाटक सरकारने त्यांच्या भाषेच्या साहित्य संमेलनासाठी आठ कोटी रुपये निधी दिल्याचे यापूर्वीच प्रसिद्ध झाले आहे. त्यामुळे आपणही तातडीने निर्णय घेवून घोषणा करावी अशी मागणीही या पत्रात श्रीपाद जोशी यांनी केली आहे.