Breking News

सोमवार, २४ जून, २०२४

संघर्षातून समाजसेवेपर्यंत: योगेश मराठे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास

तळोदा : काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्या मनात कायमची जागा मिळवतात. त्यांच्या मोकळ्या स्वभावामुळे, स्पष्टवक्तेपणामुळे, आणि त्यांच्या बोलण्यातून येणाऱ्या सहज हास्यामुळे ते कोणालाही आपलंसं करून घेतात. अशीच एक व्यक्ती म्हणजे योगेश शांताराम मराठे. त्यांचा जीवनप्रवास, त्यांची कर्तृत्व गाथा आणि समाजातील त्यांची ओळख याची नोंद घेणे हा खरं तर समाजासाठी गौरवाची गोष्ट आहे. योगेशभाईंच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा हा संघर्ष, मेहनत, आणि निस्वार्थ समाजसेवेचा उत्कृष्ट नमुना आहे. त्यांचं आयुष्य म्हणजे साधेपणा, कष्ट, आणि माणूसकीचं जिवंत उदाहरण आहे.

        योगेश मराठे यांचे मूळ गाव पारोळा तालुक्यातील देवगाव. हे गाव छोटं, पण योगेश यांचं बालपण मात्र मोठ्या संघर्षांनी भरलेलं होतं. घरची परिस्थिती तशी बेताची होती. लहान वयातच गरिबीचे चटके सोसावे लागले. घरातील अडचणी, आर्थिक अडसर, आणि जीवनातील कठीण परिस्थिती यांच्याशी त्यांनी लहान वयातच सामना करायला सुरुवात केली. पण या अडचणींनी त्यांना कधीच मोडून टाकलं नाही. उलट, या सगळ्या संकटांनी त्यांना अधिक कणखर, अधिक जिद्दी बनवलं. लहान वयातच मेहनतीची किंमत कळली. त्यातूनच पुढे त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांना मिळालेलं शिक्षण मर्यादित होतं, पण जीवनानं त्यांना शिकवलं ते जगण्याचं खरे धडे.
         योगेश भाऊंनी विविध व्यवसायात आपले हात आजमावले. सुरुवातीला छोट्या-मोठ्या उद्योगांतून स्वतःला आर्थिकदृष्ट्या उभं करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी किरकोळ व्यापार, छोटे-छोटे व्यवसाय, आणि अनेक धंद्यांमध्ये नशीब आजमावले. प्रत्येक व्यवसायातून नवा अनुभव घेत, अडचणींचा सामना करत, त्यांनी आपली वाटचाल सुरु ठेवली. व्यवसाय करताना त्यांना अनेकदा अपयशही मिळालं, पण कधीच हार मानली नाही. मनात अपार जिद्द आणि प्रचंड मेहनतीची तयारी होती. त्या जोरावर ते पुढे जात राहिले. जीवनातला हा संघर्ष त्यांना नेहमीच अधिक मजबूत करत राहिला. अनेकदा नशिबाने पाठ फिरवली, पण त्यांनी नशिबावर कधी विश्वास ठेवला नाही, काहीतरी करत रहावे प्रयत्न सुरू ठेवावे काहींना काही मार्ग निघताच असे ते नेहमी म्हणत, 

        तळोदा शहरातील माजी नगराध्यक्ष भरतभाई माळी यांच्या नेतृत्वात आणि संजय माळी यांच्या मार्गदर्शनात, योगेशभाईंनी 'गणेश सोशल ग्रुप'च्या माध्यमातून समाजकार्यास सुरुवात केली. प्रारंभी हा एक छोटा प्रयत्न होता, पण हळूहळू त्यांनी समाजकार्यात आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित केलं. या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले. गरजूंसाठी मदत, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबिरं, आणि समाजातील विविध घटकांसाठी उपयुक्त उपक्रम राबवून त्यांनी तळोदा शहरात आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या कामाची दखल घेत अनेक लोक त्यांच्यासोबत जोडले गेले. त्यांच्या विनम्रतेने आणि मनमिळावूपणाने त्यांची लोकप्रियता वाढत गेली.

     समाजकार्यासोबतच योगेश मराठे यांना राजकारणाची ओढ निर्माण झाली. त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सुरुवातीला विधानसभा समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यानंतर शहर अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी पक्ष संघटना बळकट केली. काँग्रेस पक्षात कार्यरत असताना त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न उचलले. शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे त्यांना पक्षात आणि समाजात दोन्हीकडे मान मिळाला. त्यांनी पक्षासाठी झोकून देऊन काम केलं आणि लोकांमध्ये आपली जागा पक्की केली.

       योगेशभाईंच्या राजकीय प्रवासात त्यांचे जिवलग मित्र हितेंद्र क्षत्रिय आणि संदीप परदेशी यांची मोलाची साथ मिळाली. या त्रिकुटाने पुढे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या तिघांनी मिळून जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवली. स्थानिक पातळीवर पक्षाला नवी ओळख मिळवून दिली. विशेष म्हणजे त्यांनी राजकीय व सामाजिक कार्य करताना कधीही मतभेदांच्या राजकारणात स्वतःला गुंतवलं नाही. त्यांची काम करण्याची पद्धत कायम सकारात्मक, लोकाभिमुख, आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारी होती. पक्ष बदलला तरी त्यांची लोकांसाठी झटण्याची वृत्ती मात्र कायम आहे.

        योगेश मराठे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा खरा गाभा म्हणजे समाजासाठी त्यांची निस्वार्थ भावना. ते कोणालाही मदत करताना कधीही मोठेपणा दाखवत नाहीत. त्यांच्या मदतीमुळे अनेक गरजूंचे प्रश्न सोडवले गेले. मराठा समाजाचे तळोदा शहरातील युवा नेतृत्व, छत्रपती शिवाजी महाराज शिव स्मारक समितीचे अध्यक्ष पदी आहेत. विशेषत: त्यांची एक प्रेरणादायी परंपरा म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून दर वाढदिवसाला ११,००० रुपयांची देणगी समाजकार्याकरिता देणं. काही लोक वाढदिवस साजरे करतात, पण योगेशभाई वाढदिवस समाजासाठी काहीतरी देण्याची संधी मानतात. हा त्यांचा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून अखंडित सुरू आहे. याशिवाय आमदार राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त योगेश मराठे यांच्या पुढाकाराने तळोद्यात समाजोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. चर्मकार समाजाला १० खुर्च्या व २ मॅट, मातंग समाजाला १० खुर्च्या व २ मॅट तसेच कुकरमुंडा येथील इस्कॉन मंदिराला गाद्या व मॅट प्रदान करण्यात आले. खर्च टाळत समाजासाठी उपयुक्त वस्तू देत मराठे यांनी समाजसेवेची आदर्श दिशा दिली. यातून त्यांची समाजाबद्दलची बांधिलकी, जबाबदारी आणि निस्वार्थीपणा दिसून येतो. 
        योगेश मराठे यांनी केवळ समाजासाठीच नव्हे, तर आपल्या कुटुंबासाठीदेखील मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या भाऊ सुधाकर मराठे यांना नोकरी मिळवून देण्यात त्यांचे मोठे सहकार्य आहे. सुधाकर यास योग्य मार्गदर्शन, आधार आणि संधी मिळवून देत त्यांनी कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून दिलं. आज सुधाकर मराठे यांची ओळख समाजात चांगली आहे, याचं श्रेय योगेशभाईंना मोठ्या प्रमाणात जातं. त्यांनी संपूर्ण कुटुंबाला सावरण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यांनी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मदतीचा हात दिला आहे आणि आज त्यांच्या कुटुंबाची प्रगती साधली आहे.. 
        आज योगेशभाई आम. राजेश पाडवी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात सक्रिय राजकारण करत आहेत. पक्ष बदलला, पण समाजकार्याची दिशा आणि लोकांसाठी काम करण्याची वृत्ती तशीच आहे. पक्षीय राजकारण कितीही असलं तरी योगेशभाईंसाठी माणूस महत्त्वाचा आहे. ते राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा करणं हेच आपलं कर्तव्य मानतात. पक्ष बदलला पण माणसं जोडण्याची आणि त्यांच्यासाठी निस्वार्थ झटण्याची वृत्ती कायम राहिली आहे. ते आजही तळोदा परिसरात आपली वेगळी ओळख जपून आहेत.
       योगेशभाई जे मनात असतं तेच थेट बोलतात. त्यांच्या बोलण्यात नेहमीच हास्य मिसळलेलं असतं. कठीण परिस्थितीतसुद्धा ते हलकंफुलकं वातावरण निर्माण करतात. त्यांचं मन अत्यंत निस्वार्थी, साधं आणि कोणताही दिखावा न करणारा आहे. कुटुंबासाठी त्यांनी नेहमी खंबीर पाठींबा दिला आहे. राजकारण, समाजकारण, किंवा व्यक्तिगत नातं – ते माणसं जोडतात, तोडत नाहीत. योगेश मराठे यांचा संपूर्ण जीवनप्रवास हा संघर्ष, मेहनत, निस्वार्थ समाजसेवा आणि राजकीय प्रामाणिकपणाचं उत्तम उदाहरण आहे. ते आज ज्या ठिकाणी पोहोचले आहेत, ते त्यांच्या अपार मेहनतीचा आणि लोकांना दिलेल्या निस्वार्थ प्रेमाचा परिणाम आहे.        
  योगेशभाईंसारख्या निस्वार्थी व्यक्तिमत्त्वाची उपस्थिती म्हणजे एक सकारात्मक आशेचा किरण आहे. ईश्वरचरणी प्रार्थना की त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, आणि समाजसेवेची अजून मोठी संधी लाभो. वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा योगेशभाई!....

सोमवार, १० जून, २०२४

आमचे घर : आठवणींचा ठेवा, कष्टांचा वारसा आणि जीवनप्रवासाचा साक्षीदार

                  हे खरं तर आम्ही आमच्या मामाचे घर म्हणतो; पण आम्हाला मामा नव्हते. हे घर आमच्या आजी स्व. नबाबाई संपत मराठे यांचे होते. त्यामुळे या घराशी आमच्या कुटुंबाचे अतूट नाते जोडले गेले. आमची आई आशाबाई शांताराम मराठे ही स्व.संपत मराठे व स्व.नाबाबाई मराठे यांची नवसाची एकुलती एक मुलगी होती. आमचे आजोबा स्व. संपत मराठे यांचे निधन झाले तेव्हा त्या काळात संपर्काची साधने कमी होती. मुलीला ही दुःखद बातमी वेळेवर मिळाली नाही. तब्बल दहा दिवसांनी तिला ही गोष्ट कळली. त्या प्रसंगामुळे आजीने आपल्या मुलीला, म्हणजेच आमच्या आईला, कायम आपल्या जवळ ठेवण्याचा निर्णय घेतला.  
      आमचे मूळ गाव पारोळा तालुक्यातील देवगाव. तेथे आमची वडिलोपार्जित शेती होती. त्या काळी ग्रामीण भागात उद्योगधंदे किंवा रोजगाराच्या संधी फारशा नव्हत्या. शेतीवरच आमचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशाने माझे वडील शांताराम वेडू मराठे आणि आई सौ. आशाबाई मराठे यांनी तळोदा येथे येऊन संसाराची नवी सुरुवात केली..
           याठिकाणी सुरुवातीचे दिवस अत्यंत कष्टाचे होते. वडिलांनी लॉरीवर भाजीपाल्या विक्री करून पाहिली, त्यानंतर ते गल्लोगल्ली फिरून बर्फाचा गोला विकू लागले. मी लहान असताना त्यांच्या लॉरीवर बसून "गोला वाले, भाजी वाले!" अशी आरोळी मारत फिरलो आहे. त्यामुळे त्यांच्या कष्टाची जाण आहे. सकाळी गोला किंवा भाजलेल्या आणि सायंकाळी बाफलेल्या शेंगा विकणे, ती आठवण आजही मनात ताजी आहे.
           फक्त वडीलच नव्हे तर आईनेही संसार उभा करण्यासाठी खूप मेहनत घेतली. वडिलांना मदत करणेसोबतच बाजारात मठ आणि पापडी विकणे अशा अनेक कामांमध्ये तिने सहभाग घेतला. आमची आजी देखील जिल्हा परिषद शाळेवर गोळ्या बिस्कीट विक्री करत होती त्यांच्या सर्वांच्या कष्टामुळेच आमचा संसार हळूहळू मार्गी लागला.      
          या सर्व काळात आमची आजी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. तिच्यामुळे आम्हाला राहण्यासाठी हे जुने घर मिळाले. हे घर फक्त विटा आणि मातीचे बांधकाम नव्हते; ते आमच्या आयुष्याचा आधार होते. या घरात आणखी एक वाटा होता तो म्हणजे आमचे आजोबा आजीचे लहान बंधू स्व.ओंकार शंकर मराठे यांचा त्यांनी ही मरणापूर्वीच आपण ही जागा माझ्याकडून घ्या असे म्हणून प्रेम व्यक्त केले.
         या घरात आमच्या असंख्य आठवणी दडलेल्या आहेत. चार भावंडे, आई-वडील आणि आजी अशा मोठ्या कुटुंबाचा आनंद, गप्पा, हशा, सण-उत्सव आणि लहानसहान भांडणे या सर्वांचे हे घर साक्षीदार आहे. आमच्या बालपणातील प्रत्येक क्षण या घराच्या भिंतींमध्ये आजही जिवंत आहे.
            विशेष म्हणजे आमच्या चारही भावंडांचे विवाह याच घरातून झाले. त्यामुळे या घराचे आमच्या आयुष्यातील स्थान आणखी मोठे आहे. काळ बदलला, परिस्थिती बदलली, घरे बदलली; पण या घराशी जोडलेल्या आठवणी मात्र आजही तितक्याच जिवंत आहेत.
        आज जेव्हा या जुन्या घराकडे पाहतो, तेव्हा आजीचे प्रेम, आई-वडिलांचे अथक कष्ट आणि आमच्या बालपणातील सुंदर क्षण डोळ्यांसमोर उभे राहतात. म्हणूनच हे घर आमच्यासाठी केवळ एक वास्तू नसून आमच्या कुटुंबाच्या संघर्ष, प्रेम, त्याग आणि जिव्हाळ्याचे जिवंत स्मारक आहे. हे घर आमच्या आठवणींचा अमूल्य ठेवा आहे. 
          कालांतराने आई-वडिलांच्या अथक परिश्रमातून या जुन्या कवलारू घराचे रूपांतर पत्र्याच्या घरात झाले. संसाराची घडी हळूहळू स्थिरावत गेली आणि घरालाही नवे रूप मिळाले. पुढे मला देखील या घरासाठी काहीतरी करण्याची संधी मिळत आहे. मी या घराचे रूपांतर दुमजली, टुमदार आणि सुबक अशा घरात करण्याचा निर्णय घेतला आहे. घराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे. नवीन बांधकाम, नवीन सुविधा आणि नवीन स्वरूप प्राप्त होणार आहे.
       मात्र घराचे रूप बदलणार असले तरी त्याच्या जुन्या आठवणी मात्र ताज्याच राहतील यात शंका नाही, त्या मातीच्या भिंती, कौलारू छप्पर, अंगणातील खेळ, आई-वडिलांचे कष्ट, आजीचे प्रेम, भावंडांबरोबर घालवलेले आनंदाचे क्षण आणि घरभर घुमणारा हशा आजही मनात जिवंत आहे. नवीन घर उभे राहील, काळ पुढे जाईल, पण जुन्या घराने दिलेली ऊब, आपुलकी आणि संघर्षातून उभ्या राहिलेल्या आयुष्याच्या आठवणी कधीही विसरता येणार नाहीत.
       आज या घराकडे पाहताना अभिमान वाटतो की आई-वडिलांनी कष्टाने सुरू केलेला प्रवास पुढे नेण्याचे भाग्य मला लाभले. परंतु या सुंदर घराच्या पायात जुन्या घराच्या आठवणींचीच मजबूत वीट रचलेली आहे. म्हणूनच हे घर आमच्यासाठी केवळ निवारा नसून, आमच्या कुटुंबाच्या संघर्ष, जिद्द, प्रेम आणि एकोप्याची जिवंत कहाणी आहे....