Breking News

सोमवार, ८ मे, २०१७

हातोडा पुलाचे उदघाटन पुन्हा ऐरणीवर!

आमदार उदेसिंग पाडवी यांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते तळोदा ते नंदुरबार रस्त्याला जोडणारा हतोडा पुलाचे उद्घाटन करण्याबात प्रसिद्धी पत्रक काढून माहिती दिली होती. मात्र पुलाची सध्याची स्थिती पाहता पुल अध्यापही काही महिने पूर्ण होणार नसल्याचे चित्र दिसून येत आहे. आमदार पाडवी यांनी काढलेल्या पत्रकाबाबत एकच चर्चा रंगली असून हतोडा पूल पुन्हा एकदा चर्चेचा विषय ठरला आहे. पुढाऱ्यांनी पुलाच्या श्रेय घेण्याच्या घाई करण्या ऐवजी पुलाच्या कामाला गती मिळून योग्यरीत्या काम होण्याकडे लक्ष देणे गरजेचे असल्याचे जनतेकडून अपेक्षा व्यक्त केल्या जात आहे. तळोदा तालुक्याच्या थेट जिल्ह्याच्या ठिकाण असलेल्या नंदूरबारशी संपर्क यावा, यासाठी तत्कालीन मंत्र्याच्या प्रमुख पुढाकाराने सन २००७ - ०८ मध्ये हातोडा पूलाचे भूमिपूजन होऊन कामाला सुरुवात झाली. तेव्हा पासूनच या पुलाचे उद्घाटन दोन मंत्र्यानी केल्याने पूल चर्चेचा विषय बनला होता. त्यानंतर नंदुरबार जिल्ह्याचा विकासाचा सेतू म्हणून ओळखला जाणारा गुजरात राज्याचा सिमेवरील हातोडा पूल विविध तांत्रिक अडचणींसह अन्य बाबींमुळे चर्चेत आला आहे. मागील काही महिन्यांपूर्वी पुलावरील भराव खचून पूल चर्चेचा विषय बनला होता. तर तत्कालीन पालकमंत्री गिरीश महाजन व आमदार उदेसिंग पाडवी यांनी जून 2016 मध्ये पूल सुरू करण्याबाबत आश्वासन दिले होते. मात्र विविध तांत्रिक अडचणींमुळे पुल तयार होण्यास विलब झाला होता... तर सध्या पूल पूर्णतः तयार होण्यापूर्वीच आमदार उदेसिंग पाडवी यांनी मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात हातोडा पूलाचे उद्घाटन मुख्यमंत्री यांच्या हस्ते होणार असल्याचे प्रसिद्धी पत्रक काढून माहिती दिली होती. मात्र हतोडा पुलाची सध्याची स्थिती पाहता अद्याप काही महिने तरी पूलाचे काम पूर्ण होणार नसल्याचे चित्र समोर आहे. एप्रिल महिन्याच्या सुरवातीला आमदार उदेसिंग पाडवी यांनी बांधकाम विभागाच्या अधिकारी व कर्मचाऱ्यासह हातोडा पुलाची पाहणी केली होती. त्यावेळी एस ३ या स्लॉब चे काम होऊन पुर्ण सेंटरिंग झाले होते व मात्र त्यावर स्लॉबसाठी क्रेन उपलब्ध नसल्याने कामाला विलंब होत असल्याचे सांगण्यात आले होते. मात्र १५ एप्रिल पर्यंत पुलाचे काम पूर्ण होईल असे आश्वासन कार्यकारी अभियंता अनिल पवार व त्यांच्या सहकाऱ्यांनी आमदार पाडवी व पदाधिकाऱ्यांना दिले होते. त्यांच्या आश्वासनानुसार आमदार पाडवी यांनी कोणत्याही परिस्थितीत मे महिन्याचा पहिल्या आठवड्यात या पुलाचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस याच्या शुभ हस्ते उद्घाटन होणार असल्याचे निश्चित झाले असल्याची माहिती प्रसिद्धीपत्रक काढून दिली होती. मात्र मे महिन्याच्या पहिला आठवडा संपायला आला, तरी हातोडा पुलाचे उदघाटन होण्याची कोणतीही चिन्हे अद्याप तरी दिसून येत नसल्याने जिल्हावासीयांच्या आशेवर पाणी फिरले आहे. महा आरोग्य शिबिराच्या निमित्ताने आलेल्या मुख्यमंत्रीनी हतोडा पुला बाबत कुठलीही चर्चा, विचारणा अथवा साधी पाहणी देखील केली नसल्याने जनतेतून नाराजीचा सूर उमटत आहे. प्रामुख्याने तळोदा व धडगाव तालुक्याच्या विकासाच्या दृष्टीने महत्वाचा असणाऱ्या तापी नदीवर या हातोडा पुलासाठी निधी मिळवण्यासाठी जिल्ह्यातील सर्वपक्षीय नेत्यांनी निधी आणण्यासाठी प्रयत्न केलेत त्यासोबत श्रेय घेण्याची स्पर्धा राजकीय वर्तुळात अनेकदा झाली. यापुढे ही ती राहणार आहे. या स्पर्धेत मात्र प्रत्यक्षात हातोडा पुलाचे काम पूर्णत्वास आणण्यासाठी येणाऱ्या समस्यांकडे दुर्लक्ष झाले असल्याची चर्चा रंगत आहे. अनेकदा या पुलाचे काम पूर्ण होऊन उद्घाटनाच्या तारखा निश्चित झाल्याचे सांगण्यात आले व प्रत्यक्षात मात्र उद्घाटनाच्या तारखेचा तो दिवस उगवलाच नसल्याने नाराजीचा सूर उमटत आहे. कामाचे श्रेय लाटण्याची घाई करण्याऐवजी लवकरात लवकर हतोडा पुलाचे लोकार्पण व्हावे, अशी आशा जिल्हावासीयांना आहे..

*या पुलाला पुलाला एकूण सुमारे ५८ कोटी ४० लाख निधी खर्च करण्यात आला आहे. पुलाच्या बांधकामाचे काम अहमदनगर येथील राजदीप बिल्डिंग अँड कन्स्ट्रक्शन प्रा.ली या कंपनीला देण्यात आले आहे. नदीत असलेल्या पाण्यामुळे पुलाचा कामाची मुदत अनेकदा वाढवून घ्यावी लागली आहे. पुलाचा इंस्टीमेट व कालावधी ठरवतांना तापी नदीत असलेल्या पाणी साठ्याचा विचार केला गेला नाही. नदीत पावसाळा व हिवाळ्या दरम्यान भरपूर पाणी साठा असतो.त्यामुळे ठेकेदाराला काम करणे सोयीचे नसते. फक्त उन्हाळ्यातील तीन चार महिने काम करण्यात येत असते. या कामाचा कालावधी सन २००९ ते २०११ पावसाळ्या सह देण्यात आला होता. पुन्हा २०११ -१२ कालावधी वाढविण्यात आला. नदीत मोठ्या प्रमाणात असणाऱ्या पाणी साठ्यामुळे काम निर्धारित वेळेत पूर्ण होऊ शकले नाही. त्यासाठी ३ मार्च १७ च्या
आदेशान्वये ३१ मार्च पावेतो सुधारित मुदत वाढविण्यात आली आहे.* 

 *या उन्हाळ्यात तापी नदीतला पाणीसाठा कमी झाल्यामुळे पुलाचे काम युद्धपातळीवर राबविण्यात येत आहे. पुलाचे ९ पिलर्स व ११ फाउंडेशन झाले आहे. पुलाला ६२.५० मीटर लांबीचे १० स्लॅब असून नंदुरबार बाजूकडील १५ मीटर अप्रोज रस्ता व तळोदा बाजूकडील ३५ मिटर ऑप्रोज,असा एकूण ६७५ मीटर लांबीचा हा पूल आहे.*



कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा