Breking News

शनिवार, २८ सप्टेंबर, २०२४

उदार, दिलदार, सदाबहार मित्र बाप्या !

सुधाकर मराठे 
              काय म्हणावे तुझ्या मैत्रीला, देवाने दिलेली एक साथ सख्ख्या भावापेक्षा जास्त प्रेम करणारा माझे कितीही चुकले असेल तरी माझ्या पाठीशी भक्कमपणे उभा राहणार माझ्यावर येणाऱ्या संकटांचा पहिला वार अंगावर घेण्याची तयारी दाखवणारा मनाने अतिशय मोकळा सदैव माझी पाठ राखण करणारा असा देवरूपी दिलेला एक सखा म्हणजे प्रिय मित्र राकेश गुरव उर्फ बापू ...
       तुझी माझी पहिली भेट ही वयाच्या अवघ्या नऊ-दहा वर्षाचा असताना झाली तू काबाडकष्ट करून पतंग विकायचा तुटलेल्या पतांगाना जोडणी करायचा त्यावेळी मी तिथे पतंग घेण्यासाठी येत असे, त्यानंतर शालेय जीवनात आपली चांगलीच गट्टी जमली तू मला मित्र या नात्यापेक्षा जास्त सन्मान दिला माझा प्रत्येक छोट्या-मोठ्या दुःखात तुझ्या सहभाग जाणवत होता आणि याची जाणीव म्हणून मी देखील तुझ्यासोबत मैत्री जपली, तुझे जे काही भले होईल त्यासाठी मी ही प्रयत्न केले. 
             पहाटे पाच वाजेपासून आपल्या भेटीची सुरुवात व्हायची हातात टमरेट घेवून गेलो तरी घरचे शोधत आपणास यायचे हा गमतीचा भाग असला तरी सहवास यातून दिसतोच. शालेय आयुष्य असो की महाविद्यालयीन आयुष्य मैदानी खेळ असो वा अन्य काही खोडी असोत आपण सोबत एकत्रित केल्यात मात्र या सर्व बाबी घडत असताना आपणामुळे कुणाचे भावनिक, मानसिक, शारीरिक आर्थिक असे कुठलेही नुकसान झाले नाही हे आपले सौभाग्यच.. शिक्षणात तुला गोडी नसली तरी अन्य बाबतीत तुझी महत्त्वाकांक्षा फार मोठी होती त्यातच तुझ्यात असलेले देशप्रेम व देशाप्रती असलेली निष्ठेमुळे तू देश सेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगून होता तू देश सेवेत जावे यासाठी प्रयत्नही केलेस मात्र त्यात तुला यश आले नाही. असो प्रत्येक गोष्ट प्रत्येकाच्या नशिबी असतेच असे होत नाही, तू त्या क्षणाला मुकला असला तरी तू जे ही काही केले त्यात तू समाधानी आहेस हे महत्वाचं, या सर्वांमध्ये तुझ्या खोडकर व सर्वांना हसवणारा हा स्वभाव सर्वांना हवाहवासा वाटतो.. तू जेथे गेले तेथे तुझे स्वतंत्र ओळख निर्माण करतो. गणपतीवर असलेले तुझी अपार श्रद्धा, विविध वाद्यांच्या व गायनाचा छंद व आवड ही तू आजही जोपासले आहे..

        अत्यंत हलाखीचा परिस्थितीवर मात करत तू पुढे आयुष्याचा गाडा ओढत आहे. वडील अरुण व आई मोतन यांनी दिलेले संस्काराच्या धडे युधिष्ठिर सारखा लाभलेला मोठा बंधू त्यांनी वेळोवेळी पाजवलेले बाळकडू त्यात मोठ्या वहिणीचा रूपात मिळालेली माया लहान भावाची साथ व आजीच्या आशीर्वादामुळे तू आयुष्याचा पटलावर भक्कमपणे उभा आहे.  
     
      सुरुवातीच्या काळात तुझ्यात जी ऊर्जा होती ती खूप अफाट होती तू खूप हुरहुन्नरी होतास, एका कामावर बसून न राहता असंख्य कामे करण्याचे तुझे धडपड मी पाहिले आहे. अगदी कमी वयात बाजाराची चाहूल तुला लागल्यामुळे बाजाराची ओळख तुला प्राप्त झाली होती, लहान वयापासूनच कधी फोटोग्राफी तर कधी मेकॅनिकलच्या दुकानावर तर कधी पतंग विकताना येवढेच काय तर कधी रस्त्यावर पडलेले भंगार उचलून विकून २ पैसे कमविताना मी तुला पाहिले आहे, काहीही झाले तरी कुठेही कमी पडणार नाही अशा तुझ्यातला जोश मी पाहिले आहे. अगदी नोकरी नाही लागली तरी तळहातावर मेहनत करून पोट भरण्याची तळमळ व मेहनत करण्याची अफाट इच्छा तुझ्या अंगी पाहिली आहे आणि त्या जोरावर मी सुद्धा पावलं उचलले, अगदी लहान वयातच आपण दोघांनी सोबत मंडप बांधले मंडळ बांधण्यापासून प्राप्त झालेल्या दोन पैशाची गुंतवणूक करण्यास आपण सुरुवात केली.. 
             काहीही झाले तरी आपण सोबत राहू, आयुष्य जगताना असंख्य स्वप्न सोबत बघितली, सुरुवातीचा काळ हा खूप गरीबीचा होता असे असले तरी आपण कुठे बडेजावं पणा केला नाही परिस्थितीशी झुंजत आनंद साजरा केला मग तो अगदी सोबत असून हाप चड्ड्यांवरती फिरणे असो किंवा कॉलेजमध्ये लुंगी घालून हिंडणे असो, आपण फार धिंगाणा घातला आयुष्याला आनंद साजरा केला तो आनंद पाहून अनेकांना हेवा देखील वाटला.. काळ लोटात गेला 25 वर्षे पेक्षा अधिक कालावधी लोटल्या आपला सहवासाला मात्र नाते आपले आजही तेवढेच घट्ट आहे. तुझा नातेवाईक असोत व मित्र परिवारात मला कधीही स्वतः ओळख करून द्यावी लागली नाही कारण माझे गुणगान तू माझ्या पश्चात त्यांच्या पुढे गायलेले मला प्रत्येक वेळेस जाणवले आहे. दिपाली वहिनी चा रूपात तुला लाभलेली अर्धांगिनी ही देखील तुला साजेशी व वळणावर आणणारी असल्याकारणाने तिचे देखील कौतुक करण्यासारखे आहे.  तुमच्या संसारात अधिक गोडवा निर्वाह म्हणून देवाने दिलेले दोन मुले हे तुमच्या जीवनाचा आधार आहेत.
      माझ्या मनातील प्रवाह मोकळा करण्यासाठीचे हक्काचे ठिकाण म्हणजे तू कुठलीही बाब निडरपणे पूर्ण विश्वास ठेवून तुझ्याशी चर्चा करू शकतोस कारण चांगल्या गोष्टींचे भांडवल होईल व वाईट गोष्टीला बोलायला जाईल एवढा विश्वास अगदी बालवयातच माझा तुझ्यावर बसला आहे आणि तो आजही कायम आहे भविष्यातही कायम असेल यात तीळ मात्र शंका नाही.
             मैत्री हे जगातलं सर्वात सुंदर नातं मानलं जातं, जे कोणत्याही स्वार्थाशिवाय असतं. जेव्हा संपूर्ण जग आपल्या विरोधात उभं असतं, तेव्हा मित्रच आपल्यासोबत असतात. आयुष्यात प्रत्येक व्यक्ती खऱ्या मित्राच्या शोधात असते, जो मित्र आपल्या सुख-दु:खात नेहमी आपल्यासोबत असतो तोच खरा मित्र बाकी सर्व प्रवाह असतात.

शुक्रवार, ६ सप्टेंबर, २०२४

तळोदा गणेशोत्सवाचे एक आकर्षण ;ओंकार काका गाढे

गणरायावर विशेष श्रद्धा असणारे तळोदा येथील ओंकार शंकर गाढे हे मागील 50 वर्षापासून सार्वजनिक दादा गणपती मंडळात सक्रिय आहेत. दरवर्षी गणरायाच्या स्थापनेपासून मूर्तीची विटंबना होऊ नये याकरिता देखरेखेची जबाबदारी  त्याच्याकडे असते. त्याकरिता 11 दिवस मंडपातच त्याचा पडावा असतो. शेवटल्या दिवशी  कागद व बांबू पासून साकारलेले प्राणी व पशुचे प्रतिकात्मक अवतार धारण करून ते मिरवणूकित सहभागी होतात. मागील 50 वर्षांपासून अखंडीतपणे सुरू असलेल्या हा अवतारी उपक्रम आजही मिरवणुकीचे आकर्षण ठरत आहे. 
              ओंकार गाढे यावर्षी कुठला अवतार बनवतील याकडे सर्वांचेच लक्ष लागून असते. यंदाचा मिरवणुकीत गाढे यांनी अश्व तयार केले होते. अश्वनृत्य पाहण्यासाठी बघ्याची मोठ्या प्रमाणात गर्दी उसळली होती. ओंकार गाढे हे हमालीचे काम करून आपला उदरनिर्वाह चालवतात. ओंकार गाढेचे सार्वजनिक दादा गणपती  मंडळाला लाभलेले कार्य उल्लेखनीय आहे. यावरूनच त्यांची गणराया बद्दल असलेली श्रद्धा लक्षात येते. वयाच्या आकडेवारीत म्हातारपण आलेला पण तरुणाला ही लाजवणारे 72 वर्षीय ओंकार गाढेचा या कार्याला सर्वाच दाद मिळत आहे... ह्यापुर्वी स्व: बाबू परदेशी हे गंणेशोत्सवापूर्वी सवा महीना उपवास करुण विसर्जनाच्या दिवशी हनुमानाचे रूप धारण करत होते. त्यांचे हे रूप पाहण्यासाठी कल्लोळ गर्दी दाटत होती. त्यानंतर ओंकार गाढेनी ही परंपरा कायम ठेवली आहे....

        सन 2024 मध्ये सरासरी पावसाचे प्रमान अधिक असल्याने व निकृष्ट रस्ते कामे झाल्यामुळे पालिकेचे पितल उघडे पडले होते. शहरातील सर्वच प्रमुख रस्त्यांवर वसाहतीतील रस्त्यांवर मोठे खड्डे पडल्याने वाहने चालवणे जिक्रीचे झाले यावर उपाय म्हणून ओंकार गाढे हे स्वयंप्रेरणेने माती टाकून खड्डे बुजवन्याचे कार्य केल्यामुळे त्यांची ही कृती अनेकांसाठी प्रेरणाच्या विषय ठरली आहे. 
       

बुधवार, ४ सप्टेंबर, २०२४

निर्भीड, सामाजिक वसा घेतलेलं, कुटुंबवत्सल व्यक्तिमत्त्व : श्री. वतनकुमार मगरे साहेब....

"झाले बहू, आहेत बहू, होतील बहू" या उक्तीप्रमाणे लहानपणापासूनच उच्च ध्येय बाळगून, आत्मविश्वासाने प्रयत्नांची पराकाष्टा करून तळोद्यातील वतनकुमार मगरे हे यशाची एकेक पायरी चढून सार्वजनिक बांधकाम विभागात उच्च पदस्थ अधिकारी बनले. निर्भीड, सडेतोड, निगर्वी, हजरजबाबी, कुटुंबवत्सल असे त्यांचे व्यक्तिमत्व आहे. समाजाचे आपण काहीतरी देणे लागतो या भावनेतून ते नेहमीच गोरगरिबांना मदत करीत असतात तसेच सामाजिक उपक्रमांमध्ये उत्स्फूर्तपणे सहभागी होतात. एकत्र कुटुंब पद्धतीवर त्यांचा भर असून प्रचंड व्यापातून देखील ते कुटुंबाची काळजी घेतात. वतनकुमार मगरे हे महाराष्ट्र माळी समाज महासंघाचे माजी कोषाध्यक्ष तथा अखिल भारतीय माळी महासंघाचे माजी चिटणीस, विश्वस्त वामनराव देवचंद मगरे यांचे सुपुत्र आहेत.
जीवनाच्या प्रत्येक वळणावर आपल्या व्यक्तिमत्त्वाच्या ठसा उमटविणारे वतनकुमार वामनराव मगरे यांच्या जन्म तत्कालीन धुळे जिल्ह्यातील तळोदे तालुक्यात ३ सप्टेंबर १९६९ रोजी झाला. लहानपणापासून ते शांत आणि अभ्यासात हुशार होते. प्राथमिक शिक्षणापासून तर पदव्युत्तर शिक्षणापर्यंत बहुतेकदा त्यांनी प्रथम क्रमांक मिळवला आहे. त्यांचे प्राथमिक शिक्षक धुळे येथील महाजन हायस्कुलमध्ये झाले. सुरुवातीला त्यांची घरची आर्थिक परिस्थिती तेवढी मजबूत नव्हती, त्यातल्या त्यात त्यांच्या स्वाभिमानी स्वभाव होता, यामुळे त्यांचा पुढील शिक्षणाची व नोकरीची चिंता त्यांचा वडिलांना सतावत होती. दहावी पास झाल्यानंतर भारतीय नौदलात जाण्याची संधी त्यांना मिळाली होती. परंतु पुढील शिक्षणात खंड पडू नये म्हणून त्यांनी ती संधी नाकारली. आणि दहावीची परीक्षा पास झाल्यानंतर खामगाव येथील गव्हर्मेंट पॉलीटेक्निकला प्रवेश घेतला. नंतरचे दोन वर्ष पुन्हा धुळे येथे शिक्षण घेतले. वडील वामनराव मगरे हे सुद्धा उच्चशिक्षित होते आणि त्यांचे व्यक्तिमत्त्व बहुआयामी होते. परंतु काम करणारे वरिष्ठ अभियंते त्यांचे श्रेय घेत कारण ते पदवीधारक होते. आपल्या विषयाचे अपेक्षित ज्ञान नसताना केवळ पदवीमुळे इतरांना मान मिळतो आणि धन ही मिळते. मग मी ही पदवी का मिळवू नये असे ठरवून त्यांनी देखील बीई करण्याचे ठरवले. मात्र त्यावेळी ते नोकरी करीत होते आणि त्यांनी नोकरी सोडण्याचा निर्णय घेतला व त्याप्रमाणे त्यांनी आपल्या मालकाला सांगितले. हुशार आणि कर्तव्यदक्ष व्यक्ती आपल्याला सोडून जातो आहे, म्हणून मालकाने वतनकुमारांची मनधरणी केली आणि नोकरी सोडू नका मी तुम्हाला माझ्या धंद्यात भागीदारी देतो असा प्रस्ताव त्यांच्यासमोर मांडला. अत्यंत विनम्रपणे त्यांनी मालकाला सांगून त्यांच्या भावी जीवनाची कल्पना देऊन नोकरी सोडली आणि धुळे येथील एसएसव्हीपीएस संस्थेच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात प्रवेश घेतला.
अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असताना वार्षिक परीक्षेत प्रथम आल्याने तिसऱ्या वर्षी ते महाविद्यालयाचे जनरल सेक्रेटरी झालेत तर चौथ्या वर्षाला त्यांना युनिव्हर्सिटी रीप्रेझेंटटेटीव होण्याचा मान मिळाला. जनरल सेक्रेटरी झाल्यामुळे विद्यार्थ्यांच्या समस्या सोडवण्याचे काम त्यांच्याकडे होते. दरम्यान एकदा वडील वामनराव यांचे लक्ष घरातील देव्हाऱ्याकडे कडे गेले, तिथे त्यांना एक रामपुरी चाकू दिसला. वडील अचंबित झाले त्यांनी वतनकुमारांना चाकू बाबत विचारले. चाकू माझ्याच आहे असे उत्तर वतनकुमार यांनी दिले. स्वभावाने अत्यंत मवाळ, धार्मिक, कोणालाही दुःख न देणाऱ्या व्यक्तीकडे हा चाकू कसा? त्यांनी परत विचारले. तेव्हा वतनकुमार यांनी उत्तर दिले की, बापूजी चाकू मला नाईलाजाने जवळ ठेवावा लागतो. कारण परराज्यातील काही विद्यार्थी खूप बेशिस्त, गुंडगिरी, भाईगिरी, मारामाऱ्या करणारे आहेत. त्यांच्याजवळ चाकू व इतर हत्यारे असतात आणि ते सदैव दहशतीचे वातावरण निर्माण करत असतात. महाविद्यालयाच्या जनरल सेक्रेटरी असल्यामुळे ही सारी भांडणे सोडवावी लागतात. प्रसंगी पोलीस स्टेशनला सुद्धा जावे लागते. गुंड पोरांना असे वाटू नये की जनरल सेक्रेटरी हा कमकुवत आणि घाबरट आहे. त्यामुळे त्यांच्यावर वचक असावा म्हणून त्यांना फक्त घाबरवण्यासाठी चाकू मला बाळगावा लागतो असे त्यांनी सांगितले. कशालाही न घाबरता, जसाच तसे या म्हणीप्रमाणे प्रसंगी धाडसाने वागणे हा त्यांच्या स्वभावाचा एक पैलू आहे. त्यांच्यामुळे पुढे महाविद्यालयात असे वातावरण निर्माण झाले की, भांडणे बंद होऊन सर्वांमध्ये प्रेमाचे वातावरण निर्माण झाले.
बीई झाल्यानंतर एमईच्या प्रवेश परीक्षेत उत्तम गुण मिळाल्याने त्यांना सांगली येथील महाविद्यालयात प्रवेश मिळाला, शिवाय दर महिन्याला दोन हजार दोनशे रुपये शिष्यवृत्ती देखील मंजूर झाली. सांगली येथे हा अभ्यासक्रम पूर्ण करीत असताना त्यांनी गव्हर्मेंट पॉलीटेक्निक श्रेणी एक, मुंबई टेलिफोन महानगर निगम, उपअभियंता सार्वजनिक बांधकाम, लेफ्टनंट ईन आर्मी, मुंबई महानगरपालिका या सर्व श्रेणी एक अधिकाऱ्यांच्या स्पर्धात्मक परीक्षा दिल्या. या सर्व परीक्षांमध्ये त्यांना घवघवीत यश मिळाले. आणि सर्वच ठिकाणी त्यांना नोकरीसाठी बोलावणे देखील आले. शेवटी त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभागात उपअभियंता श्रेणी एकची नोकरी स्वीकारली. प्रारंभी त्यांनी नंदुरबार इथे नोकरी केल्यानंतर तळोदा, नाशिक, इगतपुरी, अहमदनगर या ठिकाणी त्यांनी सेवा केली. आपल्यावर जी काही जबाबदारी सोपवली गेली ती जबाबदारी प्रामाणिकपणे पार पाडणे आणि कर्तव्य दक्षता सिद्ध करणे हा त्यांच्या स्वभाव धर्म असल्यामुळे कोणत्याही वरिष्ठ अधिकाऱ्याची मर्जी जिंकणे त्यांना सहज शक्य झाले. माणसापेक्षा माणसाचे काम सर्वांना प्रिय असते आणि हे वतनकुमार मगरे यांनी आपल्या कार्यातून सिद्ध केले आहे. कोणावरही विसंबून न राहता आपल्या कामाला लागणे हे त्यांचा रोमारोमात भिनले आहे. आणि त्यामुळेच त्यांनी सर्वच क्षेत्रात यश मिळवले आहे.
आतापर्यंतच्या सेवाकाळात वतनकुमार मगरे यांच्यावर अनेक संकटे आलीत मात्र त्यांनी सर्व संकटांवर आपल्या संयमाने, धैर्याने मात केली. कार्यकुशलता, कार्यकत्परता, मनमिळाऊ स्वभाव, सगळ्यांना बरोबर घेऊन चालण्याची वृत्ती, अडचणीच्या वेळी मानवतेच्या दृष्टिकोनातून गरजू लोकांना मदत करण्याची वृत्ती या सर्व गुणांमुळे ते ज्या-ज्या ठिकाणी गेलेत त्या ठिकाणी त्यांनी आपल्या संपर्कात येणाऱ्या प्रत्येक कार्यालयीन कर्मचाऱ्यांना नेहमीच हवेहवेसे झालेत आणि आपल्या विशिष्ट स्वभावाच्या कायमचा ठसा उमटवला. वतनकुमार मगरे हे वामनराव मगरे यांचे चिरंजीव आहेत, वामनराव मगरे यांनी देखील जवळपास ३० वर्षापेक्षा अधिकचा काळ समाजकार्य केले. समाजसेवा हीच ईश्वरसेवा आहे असे मानणारे ते होते आणि तोच वारसा वतनकुमार मगरे यांनी पुढे चालवला आहे. तोंडाने बोलण्यापेक्षा प्रत्यक्ष कार्य करून दाखवने हीच खरी समाजसेवा आहे असे ते म्हणतात. आजकाल बऱ्याच श्रीमंत लोकांना दुसऱ्याला मदत करण्याची इच्छा होत नाही, अशा परिस्थितीत अहोरात्र मेहनत करून कमावलेले लाखो रुपये समाजकार्यात लावणारे दानशूर स्वर्गीय वामनराव देवचंद मगरे व वतनकुमार वामनराव मगरे हे लोकांमध्ये एक आगळेवेगळे आणि विरळ पिता पुत्राची जोडी आहे. स्वतःच्या प्रगतीच्या आधी ते भावंडाच्या प्रगतीची काळजी घेणारे आहेत. स्वतःच्या प्रगतीसाठी आणि इतरांच्या कल्याणासाठी जीवन कसे जगावे याच्या आदर्श त्यांनी घालून दिला आहे आणि हे त्यांच्या संपर्कात आल्यावरचं कळते. स्वकष्टाने स्वतःचे कर्तृत्व सिद्ध करणारे, कोणत्याही प्रकारच्या मोठेपणा न मिरवता सामान्य माणसात मिसळणारे आणि विविध गुणांनी संपन्न अशा वतनकुमार मगरे यांच्यासारखे व्यक्तिमत्व आजच्या सोशल मीडियाच्या युगात दृष्टीप्रथास पडणे दुरापास्त झाले आहे असेच म्हणावे लागेल.
चौकट
जीवनातील परमोच्च आनंदाचे क्षण :
● महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा उत्तीर्ण होऊन १९९४ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागात सहाय्यक अभियंता श्रेणी - १ या पदावर नियुक्ती.
● मार्गप्रकल्प उपविभागात काम करीत असताना १९९८ मध्ये हातोडा पुलाच्या प्राथमिक सर्वेक्षणाचे काम करून आराखडा मंजूर केला.
● अक्कलकुवा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील होराफडी येथे २००१ साली रस्ता तयार केला. त्याठिकाणी सर्वप्रथम शासकीय वाहन पोहोचण्याच्या आनंद अविस्मरणीय होता.
● सरदार सरोवर प्रकल्पाच्या पाण्याच्या फुगवट्यामुळे बाधित झालेल्या सावऱ्यादिगर गावाला जोडणाऱ्या रस्त्यावरील पुलाचे काम २०१३ रोजी सुरू केले.
● पुतणी पायल चे लग्न स्वतः उभारलेल्या वामनराव बापूजी मंगल कार्यालयात थाटात लावून दिले.
● तळोदा परिसरातील विद्यार्थ्यांना शिक्षणाची सोय उपलब्ध करून देणाऱ्या कॉलेज ट्रस्टला ११ लाख, ११ हजार, १११ रुपयांची भरीव अशी देणगी दिली.
● सहा जुलै २०२४ रोजी त्यांची कॉलेज ट्रस्ट येथे संचालक म्हणून सर्वानुमते निवड करण्यात आली.
● देव मोगरा विद्या प्रसारक संस्थेच्या करारनामा १६ मे २०१४ रोजी केला.
● तळोद्यातील आर्ट्स अँड कॉमर्स ट्रस्ट या न्यासाचा तहहयात, वंश परंपरागत विश्वस्तपदी नियुक्ती झाली.

सध्या राबवित असलेले प्रकल्प :
मनरमा नगर, कीर्ती नगर, वामनराव बापूजी नगर, मनोकिरण नगर, सर्वेश नगर, गोदावरी नगर तसेच वामनराव बापूजी मंगल कार्यालय व मनोरमा वामनराव मगरे शैक्षणिक संकुल.

भविष्यातील ध्येय व उद्दिष्टे (स्वप्न)
       तळोदा येथे स्पर्धात्मक परीक्षांसाठी अभ्यास केंद्र सुरू करणे, तळोदा येथे पॉलीटेक्निक, इंजीनियरिंग, शिक्षण शास्त्र, वैद्यकीय,विधी महाविद्यालय व इतर अनुषंगिक उच्च शिक्षणाची महाविद्यालये सुरू करणेसाठी प्रयत्नशील राहणे,तळोद्यात एक मोठा मॉल तयार करणे जिथे विविध स्वरूपाच्या वस्तू माफक दरात मिळतील.तळोद्याच्या विकासासाठी मग ते रस्ते असो शालेय इमारती असो किंवा तळोदेकरांच्या हिताच्या दृष्टीच्या गोष्टी असो यात तन-मन-धनाने प्रयत्न करून बदल घडवून आणणे. शेतीपूरक उद्योगांचा विकास करणे. व्यसनमुक्ती केंद्र उभारणे, अध्यात्मिक प्रगतीसाठी अभ्यासकेंद्र निर्माण करणे, वृद्धाश्रम, अनाथाश्रम, विधवाश्रम,निर्माण करून गोरगरिबांची व पिडीतांची सेवा करणे.