Breking News

शुक्रवार, २६ जून, २०२६

आकाशाला गवसणी घालणारा दिवचा अविस्मरणीय प्रवास

दिनांक २६ जून २०२६...     
   अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेला दिवस अखेर उजाडला. आम्ही दहा मित्रांनी केंद्रशासित प्रदेश दिव येथे विमानाने प्रवास करण्याचा बेत आखला होता. प्रत्येकाच्या मनात उत्सुकता, आनंद आणि नव्या अनुभवाची ओढ होती. मात्र, प्रवासाला निघण्यापूर्वीच एक दुःखद बातमी आली. आमचा मित्र विशाल सूर्यवंशी याच्या काकूंचे दुःखद निधन झाल्यामुळे त्याला या सहलीला येणे शक्य झाले नाही. त्याची उणीव आम्हा सर्वांना सतत जाणवत होती.
       पहाटेपासूनच प्रत्येकाची लगबग सुरू झाली होती. सामानाची आवराआवर, वेळेचे नियोजन आणि मित्रांच्या सततच्या फोनमुळे वातावरण उत्साहाने भरून गेले होते. प्रवासाच्या सुरुवातीला पावसाची शक्यता लक्षात घेऊन अनेक चर्चा रंगल्या. नंदुरबारपर्यंत चारचाकीने जायचे की दुचाकीने, यावर बराच वेळ खल झाला. शेवटी आमच्या समूहातील मावळा दादाभाऊ पाटील यांनी ठामपणे सांगितले, आपण दुचाकीनेच नंदुरबारला जाऊ. सकाळची पाच वाजताची ट्रेन पकडू आणि वेळेत सुरतला पोहोचू. त्यांच्या या प्रस्तावाला सर्वांनी एकमुखाने होकार दिला. यात आमचे स्नेही असलेले राहुल व बापू यांनी मात्र बगल देत स्वतंत्र प्रवास करणे निवडले.
              ठरल्याप्रमाणे पहाटे आम्ही दुचाकींवरून नंदुरबार गाठले. तिथून बसस्थानक आणि रेल्वे स्थानकावर पोहोचेपर्यंत गप्पा, विनोद, एकमेकांची खेचाखेच आणि हास्याचा अखंड वर्षाव सुरू होता. प्रवासाचा प्रत्येक क्षण आनंदाने भरून गेला होता. अखेर आम्ही सुरतला सुखरूप पोहोचलो. आमच्या दहा जणांच्या समूहात माझा ज्ञानूचा व विशालचा यापूर्वी विमानप्रवासाचा अनुभव होता. मात्र इतर सर्व मित्रांसाठी हा आयुष्यातील पहिलाच विमानप्रवास होता. त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद आणि उत्सुकता दिसत होती. कोणी विमान किती मोठे असेल याची चर्चा करत होते, तर कोणी खिडकीजवळची जागा मिळावी म्हणून प्रयत्न करत होते. प्रत्येकजण हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये आणि मनात कायमचा जपून ठेवण्याचा प्रयत्न करत होता.
       सुरत विमानतळावर पोहोचल्यानंतर प्रथम सुरक्षा तपासणी, बोर्डिंग पास, ओळखपत्रांची पडताळणी अशा सर्व औपचारिक प्रक्रिया पूर्ण केल्या. विमानतळाचे भव्य आणि आधुनिक वातावरण पाहून अनेक मित्र अक्षरशः भारावून गेले. प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहून छायाचित्रे काढत होता. काहींनी सेल्फी घेतले, तर काहींनी विमानाच्या पार्श्वभूमीवर आठवणी टिपल्या. अखेर तो बहुप्रतीक्षित क्षण आला. बोर्डिंगची घोषणा होताच आम्ही सर्वजण उत्साहाने विमानात प्रवेश केला. विमानातील आसनावर बसल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर आनंदासोबत थोडीशी भीतीही स्पष्ट दिसत होती. सीट बेल्ट लावताना एअर होस्टेसच्या सूचना काळजीपूर्वक ऐकल्या. काही क्षणांतच विमानाने धावपट्टीवर वेग घेतला आणि एका झटक्यात आकाशात झेपावले.

       विमान जमिनीपासून उंचावत असताना खाली दिसणारी सुरत शहराची दृश्ये, लहानशा खेळण्यांसारख्या दिसणाऱ्या इमारती, नागमोडी वळण घेणारे रस्ते आणि पांढऱ्याशुभ्र ढगांमधून होणारा प्रवास हा अनुभव शब्दांत मांडणे कठीण आहे. पहिल्यांदाच विमानप्रवास करणाऱ्या मित्रांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, आनंद आणि समाधान यांचा सुंदर मिलाफ दिसत होता. त्या क्षणी प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती. स्वप्न प्रत्यक्षात उतरले! या अविस्मरणीय प्रवासाची ही तर केवळ सुरुवात होती. पुढे दिवच्या निसर्गसौंदर्याने, समुद्रकिनाऱ्यांनी, ऐतिहासिक वारशाने आणि मित्रांच्या सहवासाने हा प्रवास आयुष्यभरासाठी मनात कोरला जाणार होता. २६ जून २०२६ चा हा दिवस आमच्या सर्व मित्रांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आठवण बनून कायम स्मरणात राहील.....

शुक्रवार, ५ जून, २०२६

माणुसकीच्या स्पर्शाने उभारी देणारा अधिकारी - निर्मल तोरवणे

  धुळे जिल्ह्यातील रहिवासी असलेले निर्मल तोरवणे हे नाव केवळ एक अधिकारी म्हणून नव्हे, तर माणुसकीचा जीवंत अनुभव देणारा एक दिलदार, प्रेमळ आणि सोज्वळ व्यक्तीमत्त्व म्हणून ओळखलं जातं. त्यांच्या वागणुकीतला आत्मीयतेचा सूर, सहकार्याची तयारी आणि मनमिळावूपणा अनेकांना आजही सावरणारा, आधार देणारा ठरला आहे. अशा व्यक्तींचा आपल्या जीवनात असणं म्हणजे नशिबाचं भाग्यच.

        माझ्या व्यक्तिगत संघर्षाच्या काळात मी खूप अडचणीत होतो. आर्थिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या आणि निर्णयाच्या उंबरठ्यावर थांबलेला. त्या वेळी तोरवणे साहेब एका देवदूतासारखे आले. सुधाकरजी, टेन्शन घेऊ नका. तुमचे काहीही काम असले तरी आपण मार्गी लावु, हे त्यांचे शब्द अजूनही कानात घुमतात. त्यांनी एकाही क्षणी कुठलीही मागणी केली नाही, कुठलीही अपेक्षा ठेवली नाही. दिलं तर केवळ भरभरून प्रेम, मदत आणि साथ.
           माझ्यासारख्या सामान्य व्यक्तीसाठी त्यांनी ज्या प्रकारे मदतीचा हात दिला, ती उभारी विसरणं अशक्य आहे. माझं आयुष्य जेव्हा आर्थिक संकटांमुळे ढवळून निघालं होतं, तेव्हा त्यांच्यामुळेच स्थिरता आली. कठीण प्रसंगांमध्ये त्यांचं नेहमीच एक वाक्य असायचं सुधाकरजी, टेन्शन घेऊ नका, मार्ग काढू. आणि हे केवळ बोलण्यापुरतं नव्हतं, तोरवणे साहेब प्रत्यक्ष कृतीतून तो मार्ग शोधून देत असत...
          त्यांनी माझ्याकडून कुठलीच अपेक्षा केली नाही मी त्यांना भेटायला गेलो तर फक्त एक चॉकलेट ते माझ्याकडून घेत आणि या गोड माणसाला मी जाताना अगदी निरागसपणे न विसरता चॉकलेट घेऊन जात. त्यांची बदली झाली याचा मेसेज नुकताच त्यांच्या तोंडीच समजला. साहजिकच, मनाला एक कळ लागली. तो मेसेज ऐकून दुःख वाटले.. खरं सांगायचं तर ते केवळ अधिकारी नव्हते, तर एका मोठ्या मनाचे, दयाळू हृदयाचे माणूस आहे. त्यांच्या अशा वृत्तीमुळे त्यांनी नंदुरबार जिल्ह्यात एक वेगळी ओळख निर्माण केली. जी फक्त फाईल किंवा टेबलपुरती नव्हती, तर थेट लोकांच्या हृदयाशी जोडलेली होती.
         तोरवणे साहेबांनी माझ्यासह अनेकांना हात दिला, आधार दिला. त्यांच्या व्यक्तिमत्त्वाने प्रेरित होऊन आज मी जे काही स्थिर आहे, ते केवळ त्यांच्या निःस्वार्थ मदतीमुळे. माझ्या आयुष्यात त्यांनी जे स्थान निर्माण केलं आहे, ते शब्दात मांडणं कठीण आहे. माणसं येतात आणि जातात, पण काहीजण आपल्या आयुष्यात अशी छाप सोडतात की ती आठवण संजीवनी ठरते. निर्मल तोरवणे साहेब म्हणजे अशीच एक व्यक्ती – ज्यांना विसरणं अशक्य, आणि ज्यांचं ऋण शब्दांनीही फेडणं अशक्य!..
           आयुष्यात खूप प्रेम करा आणि माणसं भेटले साहेब यात आपण माझा हृदयात कधी स्थान केलं हे मलाही कळलं नाही पण या संकटात आपली लाभलेली साथ ही कधीही मला विसरता येणार नाही आपणास कधीही कुठलीही कशीही पद्धतीची मदत लागली तर मी कशाही पद्धतीने करण्याचा प्रयत्न करेल हा शब्द मी तुम्हाला देतो.. बदली झाल्याचा संदेशाने थोडा भारावून गेलो मात्र पुणे सारखा मेट्रोपोन्टीन सिटी मध्ये तुमच्या माध्यमातून आमचं स्थान कुठेतरी राखले जाईल याची शास्वती ही तेवढीच प्राप्त झाली...