
१७ दिवसापासून सुरु होता मृत्यूशी संघर्ष : वनविभाग व पशुवैद्यकीय विभागाच्या प्रयत्नांना अपयश
ऊसाची पाचट जाळतांना आगीत होरपळलेल्या बिबट्याच्या बछड्याचा गेल्या १७ दिवसापासूनची मृत्यूशी सुरु असलेली झुंज काल संपली. बुधवारी सकाळी ८ वाजेचा सुमारास हा बछडा गतप्राण झाला. वनविभागाच्या व पशुवैद्यकीय अधिकाऱ्यांच्या अथक प्रयत्नानंतर हा बछडा वाचविण्यात अपयश आले आहे. बछड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी या ठिकाणी उपस्थितांचे डोळे पानावले. .
तळोदा तालुक्यातील बोरद परिसरातील गोंडाळा शिवारात दि.२४ डिसेंबर रोजी एका शेतात ऊसाची पाचट जाळण्यासाठी आग लावण्यात आली होती. दुर्देवाने या ऊसाचा शेतात बिबट्याचे नर-मादी १५ दिवसाच्या तीन पिलांसह वास्तव्यास होते. दरम्यान पाचट जाळण्यावेळी आगीतून नर-मादी आपल्या एका पिलासह शेतातून सुरक्षित बाहेर पडण्यात यशस्वी झाले होते. मात्र, दोन बछडे या आगीत होरपळले होते. त्यापैकी एकाचा जागीच होरपळून मृत्यू झाला होात. तर दुसरे भाजल्याने जखमी झाले होते. मागील १७ दिवसा पासून वनविभागाच्या अधिकाऱ्यांच्या देखरेखीत पशुवैद्यकीय अधिकारी डॉ.सामुद्रे या बछड्यावर उपचार करीत होते. आवश्यकवेळी तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शनानुसार बछड्यावर उपचार सुरू होते. बऱ्यापैकी जखमा भरल्याने बछडयाच्या प्रकृतीत सुधारणा होत होती. मादीच्या दुधाची भर निघावी यासाठी इतर पर्यायी पोषक द्रव्ये देण्यात आली. मात्र, आईच्या मायेची ऊब, तिच्या दुधापासून मिळणारे पौष्टिक घटक, प्रोटिन्स तसेच नैसर्गिक वातावरण न मिळाल्याने सातत्याने डिहायड्रेट होणे, वजनात घट होणे आदी प्रकार घडत होते. वन विभागाचे कर्मचारी व पशुवैद्यकीय अधिकारी त्याची काळजी घेत होते. बछड्याच्या प्रकृतीत सुधारणा होऊन ते कर्मचाऱ्यांमध्ये चांगलेच रमले होते. वनपाल चव्हाण यांनी त्याचे महाराणी असे नाव ठेवले होते. महाराणी म्हणताच बछडे धावत येऊन त्यांच्या मांडीवर बसत होते. अंगाखांद्यावर खेळणे, लाड करणे, एवढे घट्ट नाते या बछड्याला सांभाळ करणाऱ्या वनपाल चव्हाण व वनमजूर इलमशी जुडले होते. मात्र, गेल्या दोन दिवसापासून पुन्हा वरील कारणांमुळे बछड्याची प्रकृती खालावली होती. त्याच्यावर तातडीने आवश्यक ते उपचार करण्यात आले. मात्र, अथक प्रयत्नानंतरही बछड्यास वाचविण्यात अपयश आले. काल सकाळी ८ वाजेच्या सुमारास त्या बछड्याने आपला प्राण सोडला. पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर सामुद्रे यांनी त्याचे शवविच्छेदन केले.वनविभागाच्या परिसरात या बछड्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी वनसंरक्षक थोरात, वनक्षेत्रपाल सी.डी. कासार, वनपाल ए.सी.पाटील, वनरक्षक एस.डी.मोरे, वनरक्षक इलम आदी उपस्थित होते. मागील १७ दिवसापासून या बछड्याची स्वत:च्या लेकरासारखी काळजी घेणाऱ्या वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अथक प्रयत्नानंतरही बछड्यास वाचवण्यात अपयश आल्याने यावेळी त्यांचे डोळे पाणावले होते..
मागील १७ दिवसापासून बछड्यावर उपचार सुरू होते. आगीत जवळपास ३०-४० टक्के ते भाजले होते. दरम्यान, स्वत:च्या बाळासारखी त्याची निगा राखली. यामुळे वनविभागाचे अधिकारी व कर्मचाऱ्यांचे या बछड्याशी भावनिक नाते प्रस्तापित झाले होते. त्याच्या प्रकृतीत सुधारणा व्हावी यासाठी प्रयत्न सुरु होते. मात्र, बिबटचे पिलू फारच लहान असल्याने शेवटी त्याने निरोप घेतला. प्रयत्न करुनही यश न आल्याने सर्वांनाच खुप दु:ख होत आहे..
-
थोरात.
उपवनसंरक्षक, तळोदा.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा