Breking News

सोमवार, २८ मे, २०१८

दै.पुण्यनगरीचे वृत्ताची दखल

तळोदा तालुक्यातील १२ ग्रामपंचायतींचे पाण्याचे नमूने तपासणीसाठी पाठवले नसल्याचे निदर्शनास आल्याने दि. ११ मे रोजी दै.पुण्यनगरीतून बारा ग्रामपंचायतींकडून पाणी नमूने पाठविण्यात दिरंगाई, नागरिकांच्या आरोग्याचे सोयरसूतक नाही या शीर्षकाखाली वृत्त प्रसारित केले होते. सदर वृत्ताची जिल्हाधिकारी यांनी दखल घेत दि.१७ रोजी संबंधितांवर कारवाईचे आदेश दिले होते. दरम्यान तातडीने गटविकास अधिकारी यांनी संबधित ग्रामपंचायतींच्या ग्रामसेवकाना कारणे दाखवा नोटीस बजावल्यानंतर बाराही गावांचे पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले आहेत. ग्रामस्थांनी दै.पुण्यनगरीचे आभार मानले आहेत..
                                             तळोदा तालुक्यात हातपंप, विहिरी, बोअरवेल असे एकुण ६७ जलस्त्रोत आहेत. महाराष्ट्र जीवन प्राधिकरण या विविध माध्यमातून तालुक्यातील लाखो नागरीकांना पिण्याच्या पाण्याची सोय उपलब्ध होते. प्रशासनाकडून मान्सूनपूर्व व मान्सून सुरु झाल्यावर तालुक्यातील सर्व गावातील जलस्रोताचे नमुने संकलित करुन ते तपासणीसाठी तालुका आरोग्य प्रयोगशाळेत पाठवून पाणी नमुन्याची अनुजीव व रासायनिक तपासणी केली जाते. ही प्रक्रिया मान्सूनपूर्व व मान्सूनोत्तर करणे आवश्यक असते. मात्र तळोदा तालुक्यातील ६७ ग्रामपंचायतीपैकी १२ ग्रामपंचायतीकडून पाण्याचे नमुने पाठवले नसल्याने ग्रामसेवकांचा बेजबाबदारपणा व नागरिकांच्या आरोग्याबाबत प्रश्नचिन्ह उपस्थित करत दि.११ रोजी दै. पुण्यनगरीने वृत्त प्रसारित केले होते. या वृत्ताची जिल्हाधिकारी डॉ.मल्लीनाथ कलशेट्टी यांनी तातडीने दखल घेत संबधितांवर तात्काळ कारवाई करा व याबाबतचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयात सादर करा असे आदेश गटविकास अधिकारी व विस्तार अधिकारी यांना दिले होते. त्यानुसार तातडीने गटविकास अधिकारी यांनी संबधित ग्रामसेवकांना कारणे दाखवा नोटीस बजावल्या. त्यात सार्वजनिक पिण्याच्या पाण्याच्या स्त्रोतांची सन २०१७-१८ या आर्थिक वर्षातील मान्सून पश्चात रासायनिक व जैविक तपासणी करून घेण्यासाठी स्त्रोतांचे पाणी नमुने संकलन करण्याचे कामे सुरू असताना संबधित ग्रामपंचायतींकडून आजपर्यंत पाणी नमूने पाठवण्यात आले नाही. त्याचप्रमाणे पिण्याच्या पाण्याचे नमूने तात्काळ तपासणी करण्यात यावे. पाणी नमुने दूषित आल्यास तात्काळ कार्यवाही करून पिण्याच्या पाण्याचे शुद्धीकरण करण्यात यावे. पिण्याच्या पाण्याची टाकीची स्वच्छता करून ग्रामस्थांना शुद्ध व स्वच्छ पाणी उपलब्ध करण्याची जबाबदारी ग्रामसेवकांची आहे. मात्र सदर कामाकडे अक्षम्य दुर्लक्ष केल्याचे स्पष्ट होत असल्याने सदरचे वर्तन हे महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (वर्तवणूक) नियम १९६७ मधील ४ चे उल्लंघन करणारे व अक्षम्य कसूर करणारे असून प्रशासनास नियमबाह्य व बेजबाबदार वर्तन केल्यामुळे संबंधितांवर महाराष्ट्र जिल्हा परिषदा, जिल्हा सेवा (शिस्त व अपील) नियम १९६४ शिस्तभंग विषयक कार्यवाहीचा प्रस्ताव का सादर करण्यात येऊ नये? असा प्रश्न उपस्थित करत नोटीस मिळाल्यापासून तीन दिवसाच्या आत खुलासा सादर करण्याचे आदेश दिले होते. परिणामी तातडीने संबधित ग्रामपंचायतीकडून कार्याची पूर्तता करत पाण्याचे नमुने तपासणीसाठी पाठवले असल्याचे विस्तार अधिकारी के.बी.पाटील यांनी सांगितले. याबाबत ग्रामस्थांनी दै.पुण्यनगरीचे आभार मानले आहेत..

 ➤➤➤ या होत्या पाणी नमूने पाठविण्यास दिरंगाई करणाऱ्या ग्रामपंचायती➤➤➤
नवागांव, मोड, मोहिदा, रतनपाडा, रामपूर, मोदलपाडा, नळगव्हाण, पिंपरपाडा, शिर्वे, सोमावल बुद्रुक, सोमावल खुर्द, वाल्हेरी.. 

➤➤➤जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये तात्काळ संबधित ग्रामपंचायतींना कारणे दाखवा नोटीस बजावून याबाबत जाब विचारला होता. तसेच पाण्याचे नमुने तपासणीसाठी तात्काळ पाठवण्याचे आदेश दिले होते. त्यावरून संबधित ग्रामसेवकांनी कार्यपूर्तता केली असून तालुक्यातील एकूण ६७ ग्रापंचायतीकडून पाण्याचे अहवाल सादर केले आहेत. . -
के.बी.पाटील. विस्तार अधिकारी, पं.स.तळोदा. 







कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा