Breking News

बुधवार, १५ मे, २०१९

कुयरीडाबरसह परिसरात उपाययोजनांसाठी बीडीओंचा सीईओंकडे अहवाल सादर

अतिदुर्गम भागातील तळोदा तालुक्यातील कुयरीडाबर, पालाबार, गौऱ्यामाळ, चिडमाळ या पाड्यांमध्ये मुलभूत सुविधा नसल्याने येथील रहिवाश्यांचे हाल होत आहेत. याबाबतची कैफियत येथील रहिवाश्यांनी लोकसंघर्ष मोर्चाच्या मदतीने जिल्हा प्रशासनाकडे मांडल्यानंतर संबंधित विभागांना भेटी देवून पाहणी करण्याचे आदेश जिल्हाधिकारी बालाजी मंजुळे यांनी दिले होते. त्यानुसार तहसीलदार, गटविकास अधिकारी व विविध विभागाच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देवून पाहणी केली. यामुळे उपाययोजनांबाबत अहवाल गटविकास अधिकारी सावित्री खर्डे यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा यांच्याकडे काल सादर केला आहे. . स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतरही अतिदुर्गम भागातील तळोदा शहरापासून २० कि.मी. अंतरावर असणाऱ्या रापापूर ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या कुयरीडाबर, पालाबार, गौऱ्यामाळ, चौगाव खुर्द ग्रामपंचायती अंतर्गत येणाऱ्या गौऱ्यामाळ, चिडमाळ येथील रहिवाश्यांना मुलभूत सुविधा नसल्याने समस्यांचा सामना करावा लागत होता. यामुळे जिल्हा प्रशासनाच्या आदेशानुसार दि.११ रोजी तहसीलदार, गटविकास अधिकारी सावित्री खर्डे आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष भेटी देवून तेथील दाहक वास्तव पाहिले. यामध्ये कुयरीडाबर येथे ३१५ लोकवस्ती असून पिण्याच्या पाण्यासाठी तीन कच्च्या विहीरी असून दोन कोरड्या ठाक पडल्या आहेत. तर एका विहीरीतून झऱ्याच्या स्वरूपात पाण्याची गरज भागविली जात असल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे. यामुळे येथे दोन कोरड्या विहीरींचे खोलीकरण, पालाबार किंवा केलापाणी येथून गाढवावरून पाण्याची वाहतूक, केलापाणी ते कुयरीडाबरपर्यंत चार कि.मी.अंतराचा रस्ता करण्याच्या उपाययोजना अहवालात नमुद करण्यात आल्या आहेत. तसेच पालाबार येथे दोन विहीरी असून पाणी पुरेसे नसल्याचे नमुद करण्यात आले आहे. यामुळे एका विहीरीचे खोलीकरणाची उपाययोजना सुचविण्यात आली आहे. तसेच सुमारे तीन कि.मी.चा रस्ता करण्याबाबतची उपाययोजनादेखील सुचविण्यात आली आहे. अहवालात गौऱ्यामाळ येथे पाण्यासाठी चार हातपंप प्रस्तावित असून ग्रा.पं.निधीतून एक हातपंप प्रस्तावित करण्याची उपाययोजना सुचविण्यात आली आहे. तर चिडमाळ येथे नविन पाईपलाईन प्रस्तावित करणे, माळखुर्द ते चिडमाळपर्यंत तीन कि.मी.अंतराचा रस्ता करण्याबाबत अहवालात नमुद करण्यात आले आहे..

जिल्हा प्रशासनाने आदेश दिल्यानंतर अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष जावुन पाहणी केली आहे. त्यात चौघा पाड्यांना जाण्यासाठी रस्ता नसल्याचे दिसून आले आहे. तसेच पाणी टंचाईची समस्या मोठी असल्याचे अहवालात नमुद करण्यात आले आहे. असे असले तरी आता प्रत्यक्षात उपाययोजना होणार कधी याची प्रतिक्षा येथील रहिवाश्यांना आहे..


कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा