Breking News

रविवार, ८ डिसेंबर, २०२४

दिपक परदेशी: चप्पल हरवलेला कार्यकर्ता

०५ डिसेंबर २०२४
तळोदा : दिपक परदेशी नाव ऐकले की डोळ्यांसमोर येतो एक साधा-सुधा माणूस, ज्याच्या पायांना चप्पलांनी कधीच स्पर्श केलेला नाही. चप्पलविरहित जीवनशैली त्याने एवढ्या अभिमानाने स्वीकारली आहे की, गावातील चप्पल विक्रेत्यांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला आहे.

फॅशन आयकॉन: हाप चड्डी आणि टी-शर्ट

सुटला तर बुटाचा एक तरी फोटो शोधायला लागतो, पण दिपकच्या बाबतीत असं नाही. हाप चड्डी आणि टी-शर्ट हाच त्याचा ओळख पटवणारा युनिफॉर्म. गावात कुणाला फॅशनच्या टिप्स हव्या असतील, तर तो पहिल्यांदा दिपककडे जातो. कारण फॅशनमध्ये 'राहणीला आराम महत्त्वाचा' हा सिद्धांत त्याने जगाला शिकवला आहे.

भाजपासाठी ‘सुपरहिरो’

दिपक परदेशी हे नाव म्हणजे भाजपाचा ‘लोकल सुपरहिरो.’ त्याला झेंडा दिला की तो गावभर असा फिरतो, जणू काही कारगिल युद्धातील सर्वात उत्साही सैनिकाचा सन्मान मिळाला आहे. विरोधकांची मिटिंग असो किंवा मोर्चा, दिपक नेहमी तयार असतो. "कुणाशीही भिडू, पण झेंडा सोडू नको," हा त्याचा बाणा!

इस्की टोपी उसके सर

दिपकची खासियत म्हणजे ‘इस्की टोपी उसके सर.’ गावातल्या पंधरापैकी पंचवीस प्रकरणं तो अशा प्रकारे हाताळतो की, लोकं शेवटी त्यालाच पंच मानून प्रकरण मिटवतात. गावातल्या लोकांनी ‘टोपी मॅनेजमेंट’ हा विषय शिकायचा असेल, तर दिपकला गुरु मानायला सुरुवात केली आहे.

चप्पल आणि दिपक यांचं वाकडं नातं

गावकऱ्यांनी विचारलं, "दिपक, तू चप्पल का घालत नाहीस?" तर उत्तर आलं, "मी चप्पल घातली तर लोकं माझं जमीनवरचं नातं विसरतील!" त्याचा साधेपणा इतका टोकाचा आहे की चप्पल विक्रेत्यांनी त्याला 'आदर्श ग्राहक' म्हणून सन्मानित केलंय - फक्त कधीही काहीही खरेदी न केल्याबद्दल.

दिपकचा जनसंपर्क: डोळा आणि कटाक्ष

दिपकचा जनसंपर्क इतका तगडा आहे की, त्याच्या एका कटाक्षाने लोकं कामाला लागतात. गावातील पोहेवाल्या काकांकडे तो चहा मागतो, तर पोहे, चहा, आणि एका प्लेट उपमा अशी ऑर्डर पूर्ण होऊनच राहते. राजकारणापासून क्रिकेटपर्यंत त्याचा अभ्यास आहे.

दिपक परदेशी: गावाचं कमेडी आयकॉन
दिपकच्या साधेपणात एक मोठं विनोदाचं गाठोडं आहे. गावात कुणाचंही वादळं येवो, दिपक तिथे हजर असतो, मग वाद मिटवायला किंवा वाद वाढवायला. लोक त्याला ‘चप्पलविरहित स्वराज्याचा ब्रँड अॅम्बेसेडर’ म्हणतात. त्याचा प्रत्येक संवाद हा विनोदाचं पीक असतो.

दिपक परदेशी: चप्पलविरहित, साधा, पण गावाचं हृदय जिंकणारा कार्यकर्ता.

वरील लेख हा केवळ विरंगुळा म्हणून लिहला आहे. 

सोमवार, २ डिसेंबर, २०२४

नात्यांचा उत्सव: के.आर. पब्लिक स्कूलमध्ये आजी-आजोबांसाठी आगळावेगळा कार्यक्रम


नंदुरबार (प्रतिनिधी):
श्री स्वामी समर्थ विद्यानिकेतन संचलित के.आर. पब्लिक स्कूल आणि ज्युनिअर कॉलेज नंदुरबार येथे नाती आणि नातवंडांच्या नात्यावर आधारित एक आगळावेगळा कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यामध्ये आजी-आजोबांना त्यांच्या नातवंडांसोबत वेळ घालवण्याची संधी देऊन कुटुंबातील जिव्हाळा आणि संवाद वृद्धिंगत करण्याचा उद्देश साधण्यात आला.

कार्यक्रमासाठी उद्योजक सिद्धार्थ वाणी, सौ. उमाबेन वाणी, जिल्हा पोलिस अधीक्षक श्रवणदत्त आणि सौ. श्रबोनीपात्र यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते. लहान मुलांनी आपल्या आजी-आजोबांसाठी नृत्य, गाणी, आणि विविध सादरीकरणे सादर केली.

कार्यक्रमात आजी-आजोबांनीही सक्रिय सहभाग घेतला. त्यांनी नातवंडांसोबत वाद्य वाजवत भजन गायले आणि आपले अनुभव शेअर करत बालपणीच्या आठवणींना उजाळा दिला.

शाळेच्या चेअरमन किशोर वाणी यांनी या कार्यक्रमाचे महत्त्व अधोरेखित करत नात्यांचा जिव्हाळा जपण्यासाठी अशा उपक्रमांची गरज व्यक्त केली. प्राचार्या डॉ. छाया शर्मा यांनी उपस्थितांचे आभार मानले आणि नाती-नातवंड हे आजी-आजोबांसाठी आयुष्याचे खरे सुख असल्याचे नमूद केले.

हा कार्यक्रम नात्यांचा उत्सव ठरला. आजी-आजोबांनी मुलांमध्ये मिसळून वेळ घालवत खूप आनंद घेतला. उपस्थितांनी शाळेच्या या उपक्रमाचे मनापासून कौतुक केले.

रविवार, १ डिसेंबर, २०२४

"नात्यांचे महत्त्व उलगडणाऱ्या संगीता काकूंना अखेरचा निरोप"

"आपुलकीचा अविरत प्रवास: संगीता काकूंना आदरांजली"

०१ डिसेंबर २०२४
            मध्य प्रदेशातील जाहूर गावातील संगीता मराठे यांचे जीवन एक आदर्श कुटुंबवत्सल स्त्री म्हणून ओळखले जाते. त्यांचा विवाह पारोळा तालुक्यातील देवगाव येथील गणेश मराठे यांच्यासोबत झाला. हा संसार एका सुखसमृद्ध आणि सुसंस्कृत कुटुंबात सुरू झाला. स्व. विरभान मराठे मास्टर यांच्या मार्गदर्शनाखाली या कुटुंबाने परंपरेचा वारसा जोपासला, ज्यामध्ये सुसंस्कृतता, प्रेम, आणि एकोप्याचा संगम दिसून येतो. संगीता मराठे यांचा स्वभाव हा अतिशय प्रेमळ, नम्र, आणि मनमिळाऊ होता. त्या प्रत्येकाला आपलेसे करणाऱ्या होत्या. परिस्थिती कितीही कठीण असो, त्यांनी कधीही धैर्य सोडले नाही. त्या एक आदर्श गृहिणी, प्रेमळ आई, आणि कुटुंबाचा आधार होत्या.

         त्यांचा वैवाहिक जीवनाची सुरुवात ही अत्यंत संपन्न आणि समाधानकारक परिस्थितीत झाली. त्या कुटुंबाची मुळं मजबूत होती, आणि त्यामध्ये सौहार्द, समजूतदारपणा, आणि नात्यांचा आदर यांचा सुंदर मिलाफ होता. संगीता यांनी आपल्या स्वभावाने आणि कौशल्याने या कुटुंबाला अधिक मजबुती दिली.

          संगीता आणि गणेश मराठे यांच्या संसारात दोन मुलांच्या आगमनाने कुटुंबाचा विस्तार झाला. मोठा मुलगा अमोल आणि नंतर पंकज उर्फ काल्याच्या जन्माने त्यांच्या कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला. त्यांनी मुलांच्या संगोपनासाठी आणि शिक्षणासाठी अथक परिश्रम घेतले. पुढे, दोघा मुलांची लग्न थाटामाटात झाली. या नात्यांमध्ये त्यांनी सासू आणि आजी म्हणूनही आपले स्थान कायम राखले. नातवंडांनी त्यांच्या जीवनात आणखी गोडवा भरला.

           परिस्थिती कायम एकसारखी राहत नाही. गणेश आणि संगीता यांच्या आयुष्यातही आर्थिक अडचणींनी प्रवेश केला. कुटुंबाने या कठीण काळाचा एकत्रितपणे सामना केला. संगीता यांनी अशा काळातही कधीही आपल्या जबाबदाऱ्या टाळल्या नाहीत. त्याचबरोबर, त्यांच्या प्रकृतीने काही आव्हाने उभी केली. दीर्घकालीन आजारामुळे त्यांना उपचारांसाठी विविध ठिकाणी जावे लागले. गणेश मराठे यांनी त्यांच्या आरोग्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. यामुळे काही काळासाठी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली, परंतु नंतरचा काळ अधिक कठीण ठरला.

        1 डिसेंबर 2024 रोजी संगीता काकू यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांसाठी हा धक्का होता. त्यांनी मागे दोन मुले, सुना, नातवंडे, आणि आठवणींचा एक मोठा ठेवा सोडला. संगीता मराठे यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांची गोड स्मृती आणि दिलासा देणारा स्वभाव कायमच त्यांच्या परिवारासाठी प्रेरणादायी ठरेल.

           काकूंच्या निधनाने कुटुंबासाठी एक मोठी हानी झाली आहे. त्या फक्त कुटुंबातील सदस्य नव्हत्या, तर सर्वांच्या आधारस्तंभ होत्या. त्यांच्या मृदू स्वभावाने, सहकार्याने आणि आपुलकीने त्यांनी प्रत्येक नात्याला अधिक मजबूत केले होते.
            त्यांचा एक प्रसंग आयुष्यभर स्मरणात राहील तो म्हणजे भडगाव येथील आमचे मोठे काका गोविंद मराठे यांच्या निधनानंतर, आमच्या वडिलांची प्रकृती बिघडली होती त्यांना तब्येतीची बातमी कळताच, काकूंची तळमळ, प्रेम, आणि आपुलकी दिसून आली. क्षणाचाही विचार न करता त्या व पुष्पा काकू तळोदा येथे आमच्या सोबत पोहोचल्या. त्यांच्या दिवसभराच्या सहवासाने आणि प्रेमळ स्वभावाने संपूर्ण कुटुंबाला आधार मिळाला. हा दिवस फक्त त्यांच्या सहवेदनेचा नव्हे, तर त्यांच्या नात्यांप्रती असलेल्या प्रामाणिकतेचा ठेवा ठरला.

      त्यांनी आमच्याबद्दल उद्गारलेले शब्द " सुर्यवंशी वाड्यात तुम्ही दोघे भावासारखे भाऊ नाहीत, पैसा कमावण्यापेक्षा खर्च करण्याची धमक तुमच्यात आहे," तुमची सहर कुणालाही येणार नाही. या त्यांच्या शब्दांतून त्यांच्या निस्वार्थ स्वभावाचा प्रत्यय येतो. या वाक्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची सखोलता स्पष्ट केली आहे.

        काकू या प्रत्येकासाठी आपुलकीने वागणाऱ्या होत्या. कुटुंबातील प्रत्येक समस्या आणि संकटाच्या वेळी त्या धैर्याने उभ्या राहत. त्यांच्या जाण्याने केवळ भावनिकच नाही, तर कुटुंबाला आधार देणारा महत्त्वाचा स्तंभ हरपला आहे. त्यांचा जाणे ही कधीही भरून न येणारी पोकळी आहे. त्यांची आठवण कुटुंबासाठी सदैव प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या कृतीतून, शब्दांतून, आणि वागणुकीतून त्यांनी कुटुंबासाठी कायमचा वारसा तयार केला आहे.

      "स्व.संगीता काकू, तुमच्या आठवणींनी आमचे मन सदैव भरून राहील. तुमच्या कुटुंबासाठी दिलेले प्रेम आणि आधार आम्ही कधीही विसरू शकत नाही. तुमची जागा कोणीही घेऊ शकणार नाही. आपणास भावपूर्ण श्रद्धांजली."..

शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०२४

कर्तबगार, दिलखुलास, दिलदार अन् सदाबहार मित्र ; मनोज ढोले

सुधाकर मराठे
        मनोज अशोक ढोले हा एक असा मित्र आहे, ज्याने आपल्या कठीण परिस्थितीतही खंबीरपणे उभे राहत, कुटुंबासाठी मोठा आधार निर्माण केला आहे. शिक्षणात विशेष गोडी नसली तरी मनोजला मित्रमंडळ, क्रिकेट, आणि व्यवसायात नेहमीच रस होता. लहानपणापासूनच त्याची निरागसता आणि मदतीची वृत्ती यामुळे तो सर्वांचा लाडका बनला. अभ्यासात मागे असला तरी त्याच्या मैत्रीतील आणि खेळातील समर्पणाने त्याला स्थानिक पातळीवर लोकप्रिय केले होते. 
        क्रिकेटमधील त्याच्या उत्कृष्ट खेळामुळे त्याचे नाव रायझिंग स्टार क्रिकेट संघ व भोईराज संघात विशेष ओळखले जाते. त्याचे ताकदवान षटकार आणि आक्रमक खेळ पाहण्याची मज्जाच वेगळी होती. लहानपणी त्याला तोंडात चार आणे ठेवून चघळण्याची सवय जडली होती, जी मजेशीर वाटत असली तरी घरच्यांकडून व मित्र परिवाराकडून त्याला या सवयीबद्दल ओरडा बसायचा. परंतु, हळूहळू त्याने अन्य विविध बाबींकडे लक्ष केंद्रित करून त्या सवयीवर नियंत्रण मिळवले.
          घरच्या अडचणींमुळे, मनोजने १० वी पावेतो शिक्षण घेतले त्यानंतर त्याने शाळा सोडली आणि आपल्या कुटुंबाच्या भाजीपाला व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केली. दररोज रात्री बेरात्री उठून भाजी खरेदीसाठी  नंदुरबार येथे जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे आणि दिवसभर आई-वडिलांना दुकानात मदत करणे, हा त्याचा दिनक्रम झाला. त्याच्या मेहनतीमुळे तळोदा शहरातील त्यांचे भाजीपाला दुकान एक नामांकित ठिकाण बनले आहे. मनोजच्या अथक परिश्रम, प्रामाणिकपणा आणि कुटुंबाबद्दलच्या प्रेमामुळे त्याच्या दुकानाला स्थानिक पातळीवर प्रतिष्ठा मिळाली आहे, आणि तो एक आदर्श युवक म्हणून ओळखला जातो.
        मनोजच्या आई-वडिलांनी त्याला लहानपणापासून मेहनतीचे महत्त्व शिकवले. त्यांनी नेहमी सांगितले की, "आई-वडिलांची साथ नेहमी सोबत असावी, वाईट व्यसनांना जाऊ नकोस, मेहनत करून खा आणि लबाडी करू नकोस." या शिकवणीतून मनोजने जीवनातले वास्तविक मूल्य समजून घेतले. मित्र परीवाराच्या कुटुंबातील कुठलेही कार्य असो मनोज पूर्ण वेळ त्याठिकाणी देत असल्यामुळे कार्यक्रम अगदी सहज पार पडत.

          त्याच्या आई-वडिलांच्या पाठिंबामुळे त्याने कठोर परिश्रम करण्याची आणि प्रामाणिकपणे जगण्याची शिकवण घेतली. त्यांनी त्याला प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या आधारावर यश मिळवण्याचे महत्त्व समजावून सांगितले. या मूल्यांमुळे मनोजने वाईट मार्गाला लागण्याऐवजी आपल्या कुटुंबाच्या व्यवसायात कार्यरत राहणे आणि समाजाच्या भल्यासाठी मदत करणे पसंत केले.
       मनोजच्या या शिकवणीमुळे तो एक प्रगतीशील युवक बनला आहे, जो आपल्या कुटुंबाच्या कष्टाची कदर करतो आणि सर्वांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतो.
          मनोजला खऱ्या अर्थाने साथ लाभली ती त्याच्या लहान भाऊ मुकेशची, मुकेशने नेहमीच मनोजच्या कठीण काळात त्याला आधार दिला आहे. दोन्ही भाऊ एकमेकांचे सहायक बनून एकत्रितपणे कुटुंबाच्या भाजीपाला व्यवसायात कार्यरत आहेत. मुकेशच्या समर्थनामुळे मनोजने अनेक आव्हानांचा सामना केला आहे. मुकेश त्याच्या भावाला प्रेरित करत असतो, जेव्हा तो थोडा हताश असतो. त्यांनी एकमेकांच्या गुणांची कदर केली असून, एकत्रित मेहनत केल्याने त्यांचा व्यवसाय यशस्वी झाला आहे.
        भाऊ म्हणून मुकेशने जो विश्वास, प्रोत्साहन, आणि सहयोग दिला आहे, त्यामुळे मनोजच्या जीवनातील अनेक अडथळे पार करण्यात त्याला मदत झाली आहे. एकत्र काम करून आणि एकमेकांना आधार देऊन त्यांनी जीवनातील संकटांना सामोरे जाण्याचा आदर्श उदाहरण निर्माण केला आहे. त्यांच्या यशात आणि व्यवसायाच्या वाढीत मुकेशची भूमिका खूप महत्त्वाची आहे, ज्यामुळे मनोज आपल्या ध्येयांच्या दिशेने अधिक निर्धाराने चालत राहतो...
                  सोज्वळ पत्नीसह मनोजला हर्षल व कृष्णा असे दोन मुले आहेत, आणि त्याचा परिवार खूप सुखी आहे. त्याने आपल्या कुटुंबासोबत एक आनंदी आणि प्रेमळ वातावरण निर्माण केले आहे. आपल्या मुलांना चांगले शिक्षण देणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे याकडे तो विशेष लक्ष देतो.....


गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०२४

iसविस्तर बातमी पाहण्यासाठी येथे क्लिक करा...=

महिलांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या; भाजप की काँग्रेसला फायदा?

२० नोव्हेंबर २०२४
तळोदा : यंदाच्या निवडणुकीत महिलांच्या प्रचंड उत्साहाने मतदान केंद्रांवर रेकॉर्डब्रेक गर्दी पाहायला मिळाली. "लाडकी बहीण योजना", महिलांचे आरक्षण, आणि महिला सक्षमीकरणाच्या मुद्यांवर दोन्ही प्रमुख पक्षांनी भर दिला होता. या पार्श्वभूमीवर महिलांच्या मतदानाचा कल कोणत्या पक्षाच्या बाजूने झुकला आहे, यावर सगळ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

        महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
ग्रामीण आणि शहरी भागांतील महिलांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लावल्या. काही ठिकाणी मतदानासाठी दोन-तीन तास प्रतीक्षा केल्याचे दिसून आले. महिला मतदारांनी सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांवर विचार करून मतदान केल्याचे मत व्यक्त केले.

भाजपला फायदा?
महिलांसाठी "लाडकी बहीण योजना", गॅस सिलिंडरवर सबसिडी, आणि "प्रधानमंत्री आवास योजना" यांसारख्या योजनांनी भाजपला मोठा आधार मिळाला आहे. ग्रामीण भागातील अनेक महिलांनी भाजपला मतदान केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

काँग्रेसची पकड?
दुसरीकडे, काँग्रेसच्या "गृहलक्ष्मी योजना", महिला रोजगारासाठी नव्या योजना, आणि महागाईविरोधी धोरणांमुळे महिलांमध्ये काँग्रेसच्या बाजूनेही मोठा कल असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काँग्रेसने महागाईवर कडक टीका करून महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

महिला मतदारांपैकी काहींनी भाजप सरकारच्या योजना स्तुत्य असल्याचे सांगितले, तर काहींनी काँग्रेसच्या महागाईविरोधी उपाययोजनांना पसंती दर्शवली. "भाजपने गॅस सबसिडी दिली, पण महागाईवर उपाय केला नाही. यामुळे आम्ही परिवर्तनाचा विचार करत असल्याचे काही म्हणाले.

कौन पुढे?
       सर्व्हे आणि मतदान केंद्रांवरील पाहणीवरून महिलांच्या मतदानाचा कल स्पष्ट होण्यासाठी मतमोजणीची वाट पहावी लागेल. त्यामुळे महिलांचे निर्णायक मतदान दोन्ही पक्षांच्या विजयासाठी महत्त्वाचे ठरेल.

      महिलांच्या सहभागाने या निवडणुकीचे गणित अधिकच गुंतागुंतीचे बनवले आहे. महिलांचा कल भाजप किंवा काँग्रेसकडे किती प्रमाणात आहे, याचा अंतिम निर्णय निकालानंतरच स्पष्ट होईल.

नंदुरबार जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील मतदानाच्या आकडेवारीवरून महिलांनी या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. चार विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांच्या मतदानाचा टक्का पुरुषांच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून आले.

महत्वाची आकडेवारी:
1. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ:

एकूण महिला मतदार: 1,59,319

मतदान केलेल्या महिला: 96,024 (60.27%)

महिलांचा मतदानाचा टक्का पुरुषांपेक्षा अधिक.

2. शहादा विधानसभा मतदारसंघ:

एकूण महिला मतदार: 1,77,588

मतदान केलेल्या महिला: 1,17,295 (66.05%)

पुरुषांच्या तुलनेत महिलांचा सहभाग अधिक.

3. नंदुरबार विधानसभा मतदारसंघ:

एकूण महिला मतदार: 1,77,212

मतदान केलेल्या महिला: 1,01,959 (57.54%)

महिला मतदारांचा टक्का लक्षणीय.

4. नवापूर विधानसभा मतदारसंघ:

एकूण महिला मतदार: 1,53,098

मतदान केलेल्या महिला: 1,14,051 (74.50%)

नवापूरमध्ये महिलांनी सर्वाधिक उत्साह दाखवला.


जिल्ह्याचा एकूण मतदानाचा टक्का:

पुरुष: 63.08%

महिला: 64.35%

इतर: 23.08%

एकूण मतदान: 63.72%

महिलांचा निर्णायक सहभाग:

         महिलांचा सहभाग पुरुषांपेक्षा जास्त असल्याने यंदाच्या निवडणुकीत महिलांचे मत पक्षांच्या विजयासाठी निर्णायक ठरणार आहे. महिलांच्या आरक्षण, योजना, आणि सक्षमीकरणाच्या मुद्द्यांवर प्रचार केला गेल्याने महिला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येते. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतलेल्या सर्व मतदारांचे अभिनंदन केले असून, शांततापूर्ण वातावरणात निवडणूक पार पाडल्याचे समाधान व्यक्त केले आहे.
         महिलांचा वाढलेला मतदान टक्का कोणत्या पक्षाला फायदा करून देईल, हे निकालानंतरच स्पष्ट होईल. पण महिलांचा वाढता सहभाग लोकशाहीसाठी एक सकारात्मक पाऊल ठरतो आहे.

रविवार, १७ नोव्हेंबर, २०२४

हिमाचल टूरचा चुरशीचा प्रसंग: नियमांवरील विजय

०७ नोव्हेंबर २०२४
         सुधाकर व त्याच्या मित्रांच्या समूहाने ३ लाख १५ हजार रुपयांचे हिमाचल पॅकेज एका कंपनीकडून बुक केले होते. आधीच ठरल्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने पैसे देण्याचा करार होता. मात्र, टूरच्या दुसऱ्या दिवशीच कंपनीकडून पूर्ण रक्कम तातडीने भरण्याचा आग्रह होऊ लागला. या प्रसंगामुळे प्रवासाच्या उत्साहावर विरजण पडले, मात्र समूहाच्या धैर्याने आणि ऐक्याने हा वाद चुरशीने हाताळण्यात आला.. यात लेखी करणार देताना नियम पूर्णपणे दिले होते मात्र शब्द देताना वेगळे देत होते याबाबत त्यांच्याशी त्याच वेळी चर्चा करून लेखी नमूद करण्याची विनंती केली होती. त्यांनी विश्वास दर्शवला होता. मात्र ऐनवेळी रक्कम मागण्यास सुरुवात केल्यामुळे समूहाने नकार दिला.    
    सुरुवातीला कंपनीने नियमांकडे कानाडोळा करून, ठरलेल्या अटींना डावलून, समूहावर रक्कम पूर्ण देण्याचा दबाव टाकला. कंपनीचा मॅनेजर थेट धमकीच्या सुरात म्हणाला, "जर पैसे भरले नाहीत तर रात्रीच तुम्हाला चेक-आउट करावे लागेल." या वक्तव्यामुळे समूहात तणाव निर्माण झाला, पण सुधाकरने शांतपणे परिस्थिती हाताळली. त्यांना ठामपणे सांगितले की, “आम्ही ठरलेल्या अटींप्रमाणेच वागू.” समूहातील इतर दहा जणांनी सुधाकरच्या मताला पाठिंबा दिला. त्यांनी मॅनेजरला स्पष्ट केले, “सुधाकर जे म्हणत आहेत, तेच योग्य आहे. आम्ही एकत्र आहोत.”

      मॅनेजरचा दबाव वाढत असताना, सुधाकरने ठाम भूमिका घेतली. त्याने सांगितले, "जर परिस्थिती अशीच राहिली तर आम्ही पोलीस ठाणे गाठू. गरज पडल्यास आंदोलन छेडू." हा निर्णय कंपनीला अडचणीत आणणारा ठरला. रात्री १२ वाजता थेट कंपनीचा मालक शिमला येथे आला.
       मालकाने सुधाकर व समूहाशी चर्चा केली. समूहाच्या ठाम भूमिकेमुळे आणि नियमांच्या आधारावर बोलल्यामुळे शेवटी कंपनीने मध्यस्थी केली. रक्कम कमी करण्यात आली, आणि समूहाच्या अटींनुसार उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने घेण्यास कंपनी तयार झाली. व त्यानंतर मिळणाऱ्या सुविधाही उत्तम मिळाल्या, हा प्रसंग समूहाच्या विजयाचा ठरला. यामुळे न केवल प्रवासाचा आनंद कायम राहिला, तर समूहाने एकीची ताकद काय असते हे दाखवून दिले. हा संघर्ष फक्त कंपनीच्या चुकीच्या धोरणांविरुद्धच नव्हे, तर प्रवाशांच्या हक्कांसाठी उभा राहण्याचा आदर्श ठरला.
      या प्रसंगातून एक गोष्ट स्पष्ट झाली - नियमांना डावलून काम करणाऱ्यांविरुद्ध ठाम राहिल्यास यश मिळतेच. समूहाच्या संयमाने आणि एकजुटीने नियमांवर विश्वास ठेवणाऱ्यांचा विजय झाला..

दै.पुण्यनगरीचे निष्ठावंत सेवक: सुरज पाटील यांचे अल्पायुष्य जीवन ; भावपूर्ण श्रध्दांजली

१७ नोव्हेंबर २०२४
साध्या पण कर्तृत्वशाली व्यक्तिमत्त्वाचे धनी सुरज पंडित पाटील यांचे केवळ ४० व्या वर्षी झालेले आकस्मिक निधन मनाला चटका लावणारे आहे. दै. पुण्यनगरी कार्यालयात ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या सुरजने आपल्या समर्पित वृत्तीने आणि निष्ठेने संस्थेतील प्रत्येक सदस्याच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते.

      सुरज पाटील हे नाव म्हणजे कामाप्रती निष्ठेचा आदर्श. जाहिराती सेटअप करणे, बातम्या सुसूत्र करणे यांसारख्या तांत्रिक बाबींमध्ये त्याचा हातखंडा होता. संस्थेच्या छोट्या-मोठ्या कामांसाठी तो नेहमी तत्पर असायचा. जाहिरातीचे आर.ओ. भरण्यापासून जाहिरातीचे उत्पन्न मिळवण्यासाठी व बँकेत जाऊन भरण्या करणे पावेतो प्रतिनिधींसोबत काम करण्यापर्यंत, त्याने कार्यालयातील विविध भूमिका प्रामाणिकपणे पार पाडल्या.

     सुरजचा स्वभाव मनमिळाऊ होता. त्याने कधीही संताप व्यक्त केला नाही, कुणालाही दुखावले नाही. त्याच्यात सर्वांना धरून चालण्याची असामान्य कला होती. त्याचा चेहरा नेहमी हसरा असायचा, आणि त्याच्या सकारात्मक उर्जेमुळे कार्यालयाचे वातावरण नेहमी प्रसन्न असे,
     अवघ्या कमी वयात, जीवनाचा उत्कर्ष गाठण्याच्या टप्प्यावर त्याला आजाराशी सामना करावा लागला. त्या संघर्षाने त्याला खूप थकवले, पण त्याने कधीही स्वतःला खचू दिले नाही. दुर्दैवाने, ४० व्या वर्षी त्याच्या या सुंदर प्रवासाचा अंत झाला, ज्यामुळे त्याचे कुटुंब, मित्र, सहकारी आणि परिचित हळहळले.

     सुरजच्या आठवणींमध्ये त्याचे हसरे रूप, काम करण्याची लगन, आणि सर्वांशी केलेले आपुलकीचे वागणे नेहमीच जिवंत राहील. त्याचा संघर्ष, त्याची मेहनत, आणि त्याचा साधेपणा यामुळे तो कायम लोकांच्या हृदयात राहील.

      सुरजभाऊ यांचे अकाली जाणे हे त्यांच्या कुटुंबासाठी, सहकाऱ्यांसाठी, आणि संस्थेसाठी मोठी हानी आहे. त्यांच्या निष्ठेचे, साधेपणाचे आणि सकारात्मकतेचे उदाहरण आपल्यासाठी कायम प्रेरणादायी ठरेल. सुरज, तुमच्या आठवणी आणि कार्याची सावली आमच्यासोबत नेहमी राहील. दैनिक पुण्यनगरीतील एक सहकारी अश्या अचानक गेल्याचे आयुष्यभर दुःख असेल. तुला भावपूर्ण श्रद्धांजली!

सुधाकर मराठे
 तळोदा प्रतिनिधी

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०२४

"रेल्वे प्रवासातील अडचणी आणि आनंदाचा प्रवास"

१६ नोव्हेंबर २०२४
प्रवास हा नेहमीच आठवणींचा ठेवा असतो, पण कधी कधी तो आठवणींसोबत संकटांनाही घेऊन येतो. दक्षिण भारताच्या प्रवासातील शेवटच्या दिवशी आमचे तिकीट हरवले होते. त्या गोंधळात, फक्त प्रवास पूर्ण करण्यासाठी आम्हाला टीसीला दंड भरावा लागला. ती रक्कम कमी नव्हती, पण त्यावेळी दुसरा पर्यायच नव्हता. तो प्रसंग जसा अवघड होता, तसाच पुढे जाण्याचा अनुभवही देणारा होता. तर हिमाचल हिंडून आल्यानंतर सुरतहून नंदूरबार जाण्यासाठी सुरत भुसावळला पॅसेंजर रेल्वेचे आरक्षित तिकीट न मिळाल्यामुळे आम्ही काऊंटरवरून तात्पुरती तिकिटे काढली. 
प्रवासाची सुरुवातच आव्हानात्मक होती.   ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली, मात्र तिच्या प्रत्येक डब्यात पाय ठेवण्यासही जागा नव्हती. ही परिस्थिती पाहून सर्व बायका घाबरल्या. मुलांसोबत गडबड गोंधळ उडाला. महिला आणि लहान मुले गर्दीच्या त्या दृश्याने घाबरली होती. काही मुले रडायला लागली, तर काहींनी घाबरून आईच्या कुशीत आसरा घेतला. गोंधळात सर्वांचा संयम तुटत चालला होता. जागा मिळवणे अशक्य होतं, पण पुढील रेल्वे सकाळी पाच वाजता असल्याने या ट्रेननेच प्रवास करणे गरजेचे होते.

                           रात्र असल्याने पुढील रेल्वे सकाळी पाच वाजता होती. मात्र, त्यावेळी प्रवास करणे कठीण होईल, असे वाटल्याने आम्ही या भरगच्च ट्रेनमध्येच जागा मिळवण्याचा निर्धार केला. सर्व पुरुष मंडळींनी बायकांना व मुलांना सुरक्षित ठेवण्याचे ठरवले. "टीसी आला, तर त्याला मॅनेज करायचे," असेही ठरले.
गर्दीच्या त्या धकाधकीत, कुठेतरी एक कोपरा मिळवून आम्ही थोडासा विसावा घेतला. व्यारा स्थानकावर ट्रेन थांबली, तेव्हा टीसी समोर आला. त्याने आम्हाला पाहिले, आणि प्रत्येकी ५० रुपये घेतले. यानंतर आमच्यासाठी थोडीशी मोकळी जागा उपलब्ध करून दिली. हा सगळा प्रसंग इतका अनोखा आणि मजेशीर वाटला की शेवटी आम्ही सगळेच हसत राहिलो.
हा प्रवास आमच्यासाठी फक्त मार्गक्रमण नव्हता, तर एक अनुभव होता - एका आव्हानाचा, जिद्दीचा आणि परिस्थितीला जुळवून घेण्याचा. ही रात्र आम्हाला खूप काही शिकवून गेली - संकटांमध्ये एकत्र राहणे, संयम राखणे आणि जिद्दीने पुढे जाणे. हा प्रवास जितका कठीण होता, तितकाच आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला.
 
        या प्रवासात शेवटच्या दिवशी सुरत-भुसावळ पॅसेंजर ट्रेनमध्ये मिळालेला अनुभव व दक्षिण भारतीय सहली दरम्यान हरवलेले तिकिटे या दोन्ही अनुभवांनी एक गोष्ट मात्र शिकवली - प्रवासात संकटे येत असली तरी ती सहनशीलता, एकमेकांना आधार, आणि प्रसंगावधानाच्या जोरावर पार करता येतात. गमावलेले तिकीट असो किंवा जागा, संकटे कधीही येऊ शकतात, पण शेवटपर्यंत प्रयत्न सोडले नाहीत, तर प्रवास कायम लक्षात राहतो..

शुक्रवार, १५ नोव्हेंबर, २०२४

दिल्लीहून सुरतपर्यंतचा प्रवास: अनुभव, निसर्ग आणि आठवणी*

           
१५ नोव्हेंबर २०२४
दिल्ली निजामुद्दीन स्थानकावर पहाटे ५ वाजता आम्ही वेर्णाकुलम एक्सप्रेसने सुरतसाठी प्रवासाला सुरुवात केली. वातानुकूलित डब्यात रिझर्वेशन असल्याने प्रवास आरामदायक होता. पहाटेच्या शांत वातावरणात ट्रेन सुरू झाल्यावर खिडकीतून बाहेर बघताना हिवाळ्याचा गारठा जाणवत होता. स्टेशनवरचा गोंधळ मागे पडत, शहराच्या वर्दळीपासून दूर जात प्रवासाची खास सुरुवात झाली..

*प्रवासातील पहाटेचा आनंद*

         रेल्वे जसजशी पुढे सरकत होती, तसतसे दिल्लीचा धावपळीतला परिसर मागे पडत मोकळ्या, हिरव्या मैदानांचे दर्शन होऊ लागले. पहाटेचा चहा आणि  नाश्ता घेत गप्पा सुरू झाल्या. बाहेरून येणारा वारा आणि ट्रेनच्या खडखडाटात प्रवास अधिकच रोमांचक वाटत होता.
*राजस्थानचा ओसाड पण मोहक प्रदेश*

       दुपारच्या सुमारास रेल्वेने राजस्थानच्या हद्दीत प्रवेश केला. रुक्ष माती, दूरवर दिसणारे वाळवंटाचे सपाट मैदान, आणि मध्येच दिसणारी छोटी छोटी गावे प्रवासाला वेगळा अनुभव देत होती. कधी कधी उंटगाड्या आणि रंगीत पगड्या घातलेल्या व्यक्ती दृष्टीस पडत होत्या. यावेळी खिडकीतून बाहेर बघताना त्या प्रदेशाच्या वेगळेपणाचा आनंद घेत होतो.

*गुजरातच्या दिशेने प्रवास*
       जसजसा प्रवास पुढे सरकत होता, तसतसे हवा उष्ण होऊ लागली. संध्याकाळपर्यंत गुजरातमध्ये प्रवेश करताच, हिरवीगार शेती, नारळाची झाडं, आणि शेतकरी त्यांच्या कामात मग्न असल्याचे दृश्य दिसू लागले. गुजरातच्या रेल्वे स्थानकांवर स्थानिक पदार्थ विकणाऱ्या विक्रेत्यांची लगबग आणि गुजराती भाषेतला संवाद ऐकून प्रवास अधिकच रंगतदार होत गेला.

*रात्री सुरत स्थानकावर पोहोचलो*

        रात्रीच्या सुमारास सुरत स्थानकावर पोहोचलो. स्टेशनवर उतरताच सुरतच्या व्यापारमय आणि चैतन्यशील वातावरणाची झलक पाहायला मिळाली. प्रवासाचा थोडासा थकवा होता, पण एक अद्वितीय अनुभव मिळाल्याचा आनंदही तितकाच होता. दिल्लीपासून सुरतपर्यंतचा हा प्रवास निसर्ग, संस्कृती, आणि प्रदेशाच्या वैविध्याचा साक्षीदार ठरला..