हे खरं तर आम्ही आमच्या मामाचे घर म्हणतो; पण आम्हाला मामा नव्हते. हे घर आमच्या आजी स्व. नबाबाई संपत मराठे यांचे होते. त्यामुळे या घराशी आमच्या कुटुंबाचे अतूट नाते जोडले गेले. आमची आई आशाबाई शांताराम मराठे ही स्व.संपत मराठे व स्व.नाबाबाई मराठे यांची नवसाची एकुलती एक मुलगी होती. आमचे आजोबा स्व. संपत मराठे यांचे निधन झाले तेव्हा त्या काळात संपर्काची साधने कमी होती. मुलीला ही दुःखद बातमी वेळेवर मिळाली नाही. तब्बल दहा दिवसांनी तिला ही गोष्ट कळली. त्या प्रसंगामुळे आजीने आपल्या मुलीला, म्हणजेच आमच्या आईला, कायम आपल्या जवळ ठेवण्याचा निर्णय घेतला.
आमचे मूळ गाव पारोळा तालुक्यातील देवगाव. तेथे आमची वडिलोपार्जित शेती होती. त्या काळी ग्रामीण भागात उद्योगधंदे किंवा रोजगाराच्या संधी फारशा नव्हत्या. शेतीवरच आमचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशाने माझे वडील शांताराम वेडू मराठे आणि आई सौ. आशाबाई मराठे यांनी तळोदा येथे येऊन संसाराची नवी सुरुवात केली..
याठिकाणी सुरुवातीचे दिवस अत्यंत कष्टाचे होते. वडिलांनी लॉरीवर भाजीपाल्या विक्री करून पाहिली, त्यानंतर ते गल्लोगल्ली फिरून बर्फाचा गोला विकू लागले. मी लहान असताना त्यांच्या लॉरीवर बसून "गोला वाले, भाजी वाले!" अशी आरोळी मारत फिरलो आहे. त्यामुळे त्यांच्या कष्टाची जाण आहे. सकाळी गोला किंवा भाजलेल्या आणि सायंकाळी बाफलेल्या शेंगा विकणे, ती आठवण आजही मनात ताजी आहे.
फक्त वडीलच नव्हे तर आईनेही संसार उभा करण्यासाठी खूप मेहनत घेतली. वडिलांना मदत करणेसोबतच बाजारात मठ आणि पापडी विकणे अशा अनेक कामांमध्ये तिने सहभाग घेतला. आमची आजी देखील जिल्हा परिषद शाळेवर गोळ्या बिस्कीट विक्री करत होती त्यांच्या सर्वांच्या कष्टामुळेच आमचा संसार हळूहळू मार्गी लागला.
या सर्व काळात आमची आजी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. तिच्यामुळे आम्हाला राहण्यासाठी हे जुने घर मिळाले. हे घर फक्त विटा आणि मातीचे बांधकाम नव्हते; ते आमच्या आयुष्याचा आधार होते. या घरात आणखी एक वाटा होता तो म्हणजे आमचे आजोबा आजीचे लहान बंधू स्व.ओंकार शंकर मराठे यांचा त्यांनी ही मरणापूर्वीच आपण ही जागा माझ्याकडून घ्या असे म्हणून प्रेम व्यक्त केले.
या घरात आमच्या असंख्य आठवणी दडलेल्या आहेत. चार भावंडे, आई-वडील आणि आजी अशा मोठ्या कुटुंबाचा आनंद, गप्पा, हशा, सण-उत्सव आणि लहानसहान भांडणे या सर्वांचे हे घर साक्षीदार आहे. आमच्या बालपणातील प्रत्येक क्षण या घराच्या भिंतींमध्ये आजही जिवंत आहे.
विशेष म्हणजे आमच्या चारही भावंडांचे विवाह याच घरातून झाले. त्यामुळे या घराचे आमच्या आयुष्यातील स्थान आणखी मोठे आहे. काळ बदलला, परिस्थिती बदलली, घरे बदलली; पण या घराशी जोडलेल्या आठवणी मात्र आजही तितक्याच जिवंत आहेत.
आज जेव्हा या जुन्या घराकडे पाहतो, तेव्हा आजीचे प्रेम, आई-वडिलांचे अथक कष्ट आणि आमच्या बालपणातील सुंदर क्षण डोळ्यांसमोर उभे राहतात. म्हणूनच हे घर आमच्यासाठी केवळ एक वास्तू नसून आमच्या कुटुंबाच्या संघर्ष, प्रेम, त्याग आणि जिव्हाळ्याचे जिवंत स्मारक आहे. हे घर आमच्या आठवणींचा अमूल्य ठेवा आहे.
कालांतराने आई-वडिलांच्या अथक परिश्रमातून या जुन्या कवलारू घराचे रूपांतर पत्र्याच्या घरात झाले. संसाराची घडी हळूहळू स्थिरावत गेली आणि घरालाही नवे रूप मिळाले. पुढे मला देखील या घरासाठी काहीतरी करण्याची संधी मिळत आहे. मी या घराचे रूपांतर दुमजली, टुमदार आणि सुबक अशा घरात करण्याचा निर्णय घेतला आहे. घराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे. नवीन बांधकाम, नवीन सुविधा आणि नवीन स्वरूप प्राप्त होणार आहे.
मात्र घराचे रूप बदलणार असले तरी त्याच्या जुन्या आठवणी मात्र ताज्याच राहतील यात शंका नाही, त्या मातीच्या भिंती, कौलारू छप्पर, अंगणातील खेळ, आई-वडिलांचे कष्ट, आजीचे प्रेम, भावंडांबरोबर घालवलेले आनंदाचे क्षण आणि घरभर घुमणारा हशा आजही मनात जिवंत आहे. नवीन घर उभे राहील, काळ पुढे जाईल, पण जुन्या घराने दिलेली ऊब, आपुलकी आणि संघर्षातून उभ्या राहिलेल्या आयुष्याच्या आठवणी कधीही विसरता येणार नाहीत.
आज या घराकडे पाहताना अभिमान वाटतो की आई-वडिलांनी कष्टाने सुरू केलेला प्रवास पुढे नेण्याचे भाग्य मला लाभले. परंतु या सुंदर घराच्या पायात जुन्या घराच्या आठवणींचीच मजबूत वीट रचलेली आहे. म्हणूनच हे घर आमच्यासाठी केवळ निवारा नसून, आमच्या कुटुंबाच्या संघर्ष, जिद्द, प्रेम आणि एकोप्याची जिवंत कहाणी आहे.
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा