Breking News

सोमवार, २२ सप्टेंबर, २०१४

समाजकार्यासाठी धडपडणारा युवा राजकारणी

दिलखुलास व्यक्तीमत्व, चेहऱ्यावर नेहमी आनंद, गोरगरीब सामान्य माणसाच्या मदतीला धावून जात
 प्रत्येकाच्या हाकेला साद देणारे संजय बबनराव माळी यांनी समाजात व मित्र परिवारात आपली एक स्वतंत्र ओळख निर्माण केली आहे़ आपल्या १४ वर्षाच्या राजकीय जीवनात तीन वेळा पालिका व तालुक्यातील विविध संस्थांवर प्रतिनिधीत्व करतांना संजू आबांनी राजकारणापेक्षा समाजकारणाला महत्व दिले़ आज शहरातील आपत्ती, सामान्य माणसाच्या सुखदुखात सर्वात आधी आबा व त्यांची टीम आधी मदतीला पोहचते़ राजकारण करतांना आधी समाकारण हे व्रत अंगीकारलेले आबा आज तळोद्यातील समाजकार्यासाठी धडपडणारा युवा राजकारणी म्हणुन आज सर्वांना परिचीत झाले आहेत़ तळोदा शहरातील पेहलवान घराण्यात जन्मलेले संजय माळी पेहलवानीत तरबेज नसले तरी राजकारण व समाजकारणात त्यांचा हात धरणे कठीण आहे़ मनमिळावू स्वभाव, दांडगा जनसंपर्क, सदैव गरजूंना मदत करण्याची धडपड, कोणतेही काम स्वत: लक्ष घालून करून घेण्यावर भर, आलेल्या अडचणींवर योग्य तो मार्ग काढण्याची खुबी, सहकाऱ्यांना नेहमी प्रोत्साहन देत त्यांच्यात समाजसेवेसाठी उर्जा निर्माण करण्याची कला हा आबांचा मूळ स्वभाव़ आपल्या स्वभावातील महत्वाचे गुण वैशिष्टयांमुळे त्यांच्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या फार मोठी झाली आहे़ संजयआबा त्यांचे पिताश्री बबनराव पहेलवान यांचा समर्थ वारसा आहेत़ कै़बबनराव पेहलवान हे त्याकाळात राज्यातील नामांकीत कुस्तीपटू होते. तर १९६५ साली तळोद्याचे नगराध्यक्ष होते. मातोश्री विमलताई माळी नगरसेविका होत्या. बंधू भरतभाई माळी तळोदा
 तालुक्यातील राजकारणाचा केंद्रबिंदू असून माजी नगराध्यक्ष तथा पालिकेचे गटनेते म्हणुन आजही धुरा त्यांच्या हातात आहे़ मोठे बंधू आप्पासाहेब लक्ष्मण माळी हे पी.ई.सोसायटीचे अध्यक्ष असून दुर्गम भागातील गोरगरीबांच्या मुलांच्या शिक्षणासाठी स्वता लक्ष घालतात़ वहिनी सौ.योजनाताई माळी या देखील तळोदा पालिकेच्या माजी नगराध्यक्षा आहेत. भरतभाई, लक्ष्मणआप्पा त्यांच्या मार्गदर्शनाखाली तळोदा शहराचा सर्वांगिण विकास होतो आहे, हे कोणी नाकारू शकत नाही़ आबासाहेबांनी राजकारण व समाजकारणात भरतभाईंचा आदर्श घेत तळोदा शहराचा विकासाच्या ध्यास नेहमी त्यांच्या डोळ्यासमोर असतो़ संजयआबा माळी यांनी २००२ साली राजकारणात प्रवेश केला़ भरतभाई यांच्या मार्गदर्शनातून आबांनी २० टक्के राजकारण व ८० टक्के समाजकारण हे सुत्र नेहमी पाळले़ शहरातील कोणावरही संकट येवो, त्यास मदतीसाठी आबा व त्यांचे सहकारी नेहमीच पुढे असतात़ आपल्या मनमिळावू स्वभावामुळे आबांनी आज दांडगा जनसंपर्क जोडला आहे़ आपल्या सामाजिक कामामुळे संजय माळी हे तळोदेकरांच्या गळ्यातील ताईत बनले आहेत़ यामुळेच संजयआबा माळी हे तळोदा पालिकेत सलग तीनवेळा बहुमताने विजयी झाले आहेत़ त्यांनी समाजकारण, राजकारण यात स्वतंत्र स्थान मिळविले असून ते तालुक्यातील विविध संस्थांवर प्रतिनिधीत्व करीत आहेत़ सध्या ते पालिकेत बांधकाम सभापती, वि.वि.का.सो.चे अध्यक्ष, पीपल्स एज्यूकेशन सोसायटीचे संचालक, दूध उत्पादक संघाचे उपाध्यक्ष, गणेश सोशल ग्रुपचे संस्थापक अध्यक्ष आहेत. गणेश सोशल ग्रुपच्या माध्यमातून व आपले एकनिष्ठ सहकारी योगेश मराठे, हितेंद्र क्षत्रिय, संदीप परदेशी, भरत चौधरी, कमलेश पाडवी व सदस्यांच्या सहकार्याने सतत नवनवीन उपक्रम राबवित आहेत़ तळोदा शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन त्यांनी केले आहे़ वेळोवेळी गोरगरीब जनतेला मदतीला धावून जाणे, शैक्षणिक, सामाजिक दृष्ट्या मदत करण्यासाठी आबा व त्यांचे सहकारी नेहमीच धावून जात असतात़ तळोदा शहरात शांतता नांदावी, एकता निर्माण व्हावी यासाठी राम रहीम गणेश
मंडळ उत्सव साजरा केला जात आहे़ दरवर्षी इफ्तार पार्टीचे आयोजन, शहरातील रूढी परंपरा जपण्यासाठी रावण दहन कार्यक्रम, गणेश आरास स्पर्धा, रांगोळी स्पर्धा आदींसह विविध कार्यक्रमात अग्रेसर राहून तळोदा शहरात एक वेगळी छाप गणेश सोशल ग्रुपने निर्माण केली आहे़ सदर ग्रुप समाजकारणात अग्रेसर असून तळोदा शहरवासीयांच्या सेवेसाठी अंबुलेन्स सेवा, विकलांगासाठी सायकली वाटप, पूरग्रस्तांना अन्न वाटप, गरीब कुटुंबातील कोणी मयत झाले तर त्याच्या अंत्यसंस्कारासाठी मदत करण्यासाठी संजय आबांच्या नेतृत्वातील गणेश सोशल गृपची टीम नेहमीच अग्रेसर राहत आहे़ प्रत्येकाशी संवाद साधत त्यांच्या समस्या जाणुन घेवून आधी त्या कशा सोडविता येतील यासाठी संजय आबांचे नेहमीच प्रयत्न राहतात़ आबांचे सर्वांशी मैत्रीपूर्ण संबंध, सामान्यांसह शहरातील प्रत्येक व्यक्तीच्या सुखदुखात हजर राहणारे आबांचे राजकारणातील विरोधक देखील मित्र आहेत़ आज आबांचा वाढदिवस... आबा करीत असलेल्या सामाजिक कामाला शहरातील पत्येकाची साथ लाभत आहे़ आबांच्या हातून नेहमी अशीच सामान्य व शहरवासियांची सेवा घडत राहो हीच त्यांना हार्दीक शुभेच्छा !

मंगळवार, ९ सप्टेंबर, २०१४

गणपती बाप्पा

'गणपती बाप्पा मोरया, पुढच्या वर्षी लवकर या' अशा गगनभेदी घोषणा, वाद्यांचा दणदणाट, गुलालाची उधळण, फटाक्यांची आतिषबाजी आणि अधूनमधून येणार्या पावसाच्या हलक्या सरी अंगावर झेलत अभूतपूर्व उत्साहाच्या लाटेवर स्वार होऊन अवघ्या महाराष्ट्राचे लाडके दैवत असलेल्या विघ्नहर्त्या गणरायाला सोमवारी गणेभक्तांनी भावपूर्ण निरोप दिला. किरकोळ घटना वगळता सार्वजनिक तसेच घरगुती गणेशांना निर्विघ्नपणे निरोप देण्यात आल्याने पोलिसांसह सर्वांनी सुटकेचा नि:श्वास टाकला. तालोद्यात दादा गणपती व बड़ादादा गणपतीची ११ तासांच्या शाही मिरवणुकीनंतर मंगळवारी सकाळी तापी नदीत विसर्जन करण्यात आले. भव्यदिव्य देखावे आणि मोठमोठय़ा वाद्यपथकांचे आकर्षण असलेली सार्वजनिक दादा गणपतीची विसर्जन मिरवणूक तब्बल 08 तास पेक्षा जास्त वेळ चालली. पासवाच्या हलक्या सरी येत असतानादेखील विसर्जन मिरवणुकांमधील उत्साह कमी झाला नव्हता. राज्यातील अनेक भागांत विसर्जन मिरवणुका मंगळवार सायंकाळपर्यंत चालल्या. ११ दिवसांसाठी मुक्कामी आलेल्या गणपती बाप्पाला निरोप देताना अनेकांच्या भावना अनावर झाल्या होत्या.




















तोरणमाळ

महाराष्ट्रातील हिल्स स्टेशन्सच्या क्रमवारीत राज्यात दुस- या क्रमांकावर असलेलं तोरणमाळ
समुद्रसपाटीपासून एक हजार ७६ मीटर उंचीवर वसलेलं असून या पठाराचं क्षेत्रफळ ४१ चौरस किलोमीटर इतकं आहे. सातपुडयाच्या चौथ्या पर्वतरांगेत नंदूरबार जिल्ह्यात हा परिसर मोडतो. सातपुडा पर्वतात पंचमढी आणि अमरकंटकाच्या खालोखाल तोरणमाळचं पठार उंच आहे. तोरणमाळची सरासरी उंची ३३३६ फूट एवढी आहे. राज्याच्या प्रमुख शहरांपासून अलिप्त असल्याने तोरणमाळ तसं अनाघ्रात पर्यटनस्थळ आहे. कालपर्यंत इथं दळणवळणाच्या सोयींचा अभाव होता. या सर्वाचा फायदा मात्र एक निश्चित झाला, तो म्हणजे तोरणमाळ आपलं नसर्गिक सौंदर्य आजही टिकवून आहे. घाटवळणाचे रस्ते, बाजूला हिरवीगर्द झाडी, हिरव्या गवताचा गालिचा पांघरून डौलाने उभे असलेले डोंगर, त्यांच्यावर गर्द वनराई, हे तोरणमाळचं वैशिष्टय़. आकाशाला भिडू पाहणा-या डोंगरांमधून एका वेगळ्या संगीताची आणि सौंदर्याची निर्मिती करत खळखळणारे झरे, धबधबे, वन्यप्राणी, दूरवर जाऊन क्षितिजाचा ठाव घेऊ पाहणा-या पाऊलवाटा या सर्वाना आसमंतात कवटाळून तोरणमाळ भोगवादाच्या शहरी संस्कृतीपासून अलिप्त आहे. पुराणात तोरणमाळचा ‘तूर्णमाळ’ असाही उल्लेख सापडतो. मुबलक प्रमाणात तोरणाची झाडे असल्याने त्याला तोरणमाळ हे नाव पडलं असावं. पण माळवा साम्राज्याचा राजा मांडू याच्या राजधानीचं ठिकाण काही काळ तोरणमाळ होतं. त्याच्या ताब्यात असलेल्या सातपुडा
पर्वतावरील राज्याचं द्वार अथवा तोरण म्हणूनही या प्रदेशाला तोरणमाळ म्हटलं जात असावं. तोरणमाळ या डोंगरी किल्ल्यापासून खानदेशचा इतिहास सुरू होतो. आज तिथे फक्त या किल्ल्याचे अवशेष आहेत, त्याचं बांधकाम भक्कम असल्याचे ते पुरावे आहेत. याच किल्ल्याला लागून किंवा मधे अश्वत्थामाचं मंदिर आहे आणि किल्ल्यात त्याचं वास्तव्य असल्याची भावना स्थानिक जनतेत आहे. महाभारतकाळात तोरणमाळ येथे युवनाश्व नावाचा राजा राज्य करत होता. खानदेशचा सर्व प्रदेश त्याच्या राज्यात समाविष्ट होता. तोरणमाळ ही त्याच्या साम्राज्याची राजधानी होती. भामेर येथील दंतकथेनुसार, तोरणमाळचा राजा युवनाश्व हा भामेर येथील किल्ल्यात पावसाळ्यात वास्तव्य करून राहत होता. कदाचित पावसाळ्यातील चार महिने तोरणमाळ येथे प्रचंड पाऊस पडत असेल. तोरणमाळला जाण्याचे-येण्याचे रस्ते बंद होत असावेत. मात्र आज परस्थिती बदलली आहे पावसाळ्यातही तोरणमाळ येथील वाहतूक सुरळीत सुरु असते.पांडवांनी एका यज्ञप्रसंगी एक अश्व सोडला होता. तोरणमाळचा राज युवनाश्व याने या घोडय़ाला अडवून तो भामेर
ऊर्फ भम्बागिरीच्या किल्ल्यात लपवून ठेवला होता. तेव्हा पांडवांनी युवनाश्वशी युद्ध करून त्याचा पाडाव केला आणि आपला घोडा सोडवून नेला. त्यावेळेपासून कदाचित पांडव आणि युवनाश्व यांच्यात मैत्री झाली असेल किंवा युवनाश्वाने पांडवांचं मांडलिकत्व स्वीकारलं असेल. नेमकं काय झालं कुणास ठाऊक? पण कुरुक्षेत्रात कौरव आणि पांडव यांच्यात जे युद्ध झालं त्या युद्धात तोरणमाळचा राजा युवनाश्व हा पांडवांच्या बाजूने लढल्याची आख्यायिका सांगितली जाते. युवनाश्व राजा शक्तिशाली होण्यास तोरणमाळचा सुरक्षित किल्ला कारणीभूत ठरला, असं संशोधकांचं मत आहे. गोरक्षनाथांच्या वास्तव्यामुळे या किल्ल्याशी नाथपंथीयांचाही संबंध जोडला जातो. आज तोरणमाळला हिल स्टेशन म्हणून जशी मान्यता आहे तसं त्याचं गोरक्षनाथांची तपोभूमी म्हणूनही धार्मिकदृष्टया महत्त्व आहे. गोरक्षनाथ आणि मिच्छद्रनाथ यांनी हजारो वर्षापूर्वी इथं तपश्चर्या केली होती. दरवर्षी महाशिवरात्रीला इथं त्यांची यात्रा भरते.
एका आख्यायिकेनुसार, आज ज्या ठिकाणी तोरणमाळचा प्रसिद्ध यशवंत तलाव आहे त्याच्या मध्यवर्ती तळाशी एक मंदिर आहे. या मंदिरातच गोरक्षनाथांनी तपश्चर्या केली होती. याच ठिकाणाहून तीन किलोमीटर अंतरावर मिच्छद्रनाथांची गुंफा आहे. त्याकाळी या भागात पाणी नव्हतं. एकदा मोठया प्रमाणावर दुष्काळ पडला. तेव्हा मिच्छद्रनाथ, गोरक्षनाथ यांनी आपल्या तपश्चय्रेने नर्मदामातेला इथं बोलावलं. माता नर्मदेने पाणी देण्याचं मान्य केलं, परंतु क्षमतेपेक्षा पाणी जास्त आल्यास ते परत द्यावं ही अट घालूनच ते दिलं. त्यातून या तलावाची निर्मिती झाली, असं सांगतात. चौदा खाटांच्या विणकामासाठी लागणारा दोर या तलावाचा तळाचा ठाव घेण्यासाठी तलावात सोडण्यात आला होता. तरीसुद्धा तळाचा ठाव लागला नसल्याची आख्यायिका सांगितली जाते. आज हा तलाव ओतप्रोत भरून वाहतो. हे वाहणारं पाणी
सीताखाईच्या धबधब्यातून सरकल नदीला जाऊन मिळतं व ही नदी पुढे नर्मदेला जाऊन मिळते. या तलावाशेजारी एक नाथमंदिर आहे. दर शिवरात्रीला या मंदिरात गोरक्षनाथांची यात्रा भरते. महाराष्ट्र, गुजरात, मध्य प्रदेश या तीनही राज्यांच्या सीमारेषांचा संगम असलेल्या इथल्या जंगल दरीतल्या आदिवासींचं तोरणमाळवर बेहद्द प्रेम आहे. इथल्या निसर्गसौंदर्यावर त्यांची असीम श्रद्धा आहे. तोरणमाळ परिसरात पाहण्यासारखी अनेक सौंदर्यस्थळं आहेत. तोरणमाळला पोहोचल्यावर दृष्टीस पडतो तो दूरवर पसरलेला यशवंत तलाव. महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांनाही तोरणमाळच्या सौंदर्याने मोहिनी घातली होती. त्यांच्या भेटीनंतर २६ सप्टेंबर १९६९ रोजी या तलावाचं ‘यशवंत तलाव’ असं नामकरण करण्यात आलं. या तलावाचं जुनं नाव अज्ञातच आहे. या तलावाच्या सभोवर हिरवीगार झाडी आहे.
कुठल्याही बाजूने या तलावाचं सौंदर्य न्याहाळता येतं. कधीही न आटणा-या या तलावात विहार करण्यासाठी खास स्वयंचलित बोटींची व्यवस्थाही आहे. २७ मीटर खोल असलेल्या या तलावाचं सौंदर्य बोटींवर बसून न्याहाळणं, हा एक वेगळाच अनुभव आहे. तोरणमाळ परिसराला याच तलावातून पाणीपुरवठा होतो. सीताखाई ही गर्द झाडींनी नटलेली अंगावर शहारे आणणारी दरी आहे. तीनही बाजूंनी फाटलेला पहाड आणि मधेच एक उंच सुळका. निसर्गाच्या अचाट शक्तीने साकारलेलं हे एक निसर्गनिर्मित शिल्पच म्हणावं लागेल. पावसाळ्यात त्यावरून खळखळणारा धबधबा म्हणजे सीताखाईचा वस्त्रालंकार वाटतो. सीताखाईला लागूनच एक तलाव आहे. या तलावात सर्वत्र
कमळाची फुलं दिसतात. आपण विनंती केली तर इथली आदिवासी बालकं आनंदाने, अत्यंत चपळाईने तलावात शिरून कमळाची फुलं आपल्याला आणून देतात.मावळत्या सूर्याचं लोभस दर्शन ही एक तोरणमाळची खासियत आहे. मावळताना इथला सूर्य अक्षरश: हसरा असतो, असं म्हटलं जातं. इथला पाऊस अनुभवणं, हाही एक अविस्मरणीय अनुभव असतो. खडकी व आमदरी ही विशेष उल्लेखनीय सौंदर्यस्थळं आहे. इथून आगपेटीच्या आकाराच्या झोपडया आणि माणसांच्या मुंग्यांप्रमाणे हालचाली दृष्टीस पडतात. तोरणमाळला जाताना चार किलोमीटर अगोदर सातपायरीघाट लागतो. घाटवळणाच्या अतिशय शेवटच्या उंच टोकावरून या घाटाकडे पाहिलं तर एकाखाली एक, असे रस्त्यांचे सात पदर दृष्टीस पडतात. जणू या हिरव्यागार झाडीची मलमली शाल पांघरलेल्या डोंगराने सात फे-यांची माळ परिधान केली आहे, असा आभास होतो. किल्ल्याच्या तोरणावरील
रस्त्यांची माळ, या अर्थानेही ‘तोरणमाळ’ हे नाव या प्रदेशाला पडलं असावं व ते सयुक्तिकही वाटतं. थोडा वेळ थांबून या घाटाचं सौंदर्य पाहणं ही अनेक आनंददायी आश्चर्याची अनुभूती असते. निसर्गाच्या सौंदर्यात मानवी कौशल्यांची भर पडली तर घाटातही सुंदरतेचा आभास निर्माण करता येतो, हे शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अभियंत्यांनी इथे सिद्ध करून दाखवलं आहे. सातपायरी रस्त्याच्या कडेला डोंगराच्या कपारीत एक लेणी आहे. तिला मंदिराचं स्वरूप प्राप्त झालं आहे. ही लेणी रस्त्यापेक्षा बरीच खोल आहे. तिचं प्रवेशद्वार कोरलेलं असून त्यावर नक्षीकाम असलेली ललाटपट्टी आहे. समोरचं चौकोनी दालन आता गाभारा बनला आहे. भिंतीवर पुरुषभर उंचीची, पाठीमागे सदाफणा नागाचं छत्र असलेली समभंगातील पारसनाथाची उभी मूर्ती आहे.
या मूर्तीच्या डाव्या बाजूला गज आणि अश्व उभे आहेत, तर उजव्या बाजूस यक्षिणी बसलेल्या आहेत. हे जैन लेणं पारसनाथ किंवा नागार्जुन या नावाने प्रचलित आहे. आदिवासी बांधव तोरणमाळचे मूळ रहिवासी आहेत. प्राचीन काळापासून अगदी मांडू राजा व युवनाश्व राजाच्या काळातही इथं आदिवासी राहत असल्याचे संदर्भ सापडतात. शहरी जीवनाच्या एकूण प्रवाहापासून ही माणसं अलिप्त आहेत. सर्वत्र कालबाह्य झालेली वस्तू विनिमयाची पद्धत (वस्तूच्या मोबदल्यात वस्तूंची देवाणघेवाण) प्लॅस्टिक मनीच्या आजच्या युगातही दिसून येते. पारदर्शकता इथल्या आदिवासींमध्ये ओतप्रोत भरलेली आहे. तोरणमाळला संरक्षित वनाचा दर्जा आहे. वन्यपक्षी, प्राणीही इथं वास्तव्याला आहेत. अस्वलांचं प्रमाण जास्त आहे. मध्यंतरी वाघानेही इथं आपलं दर्शन दिल्याचं सांगितलं
जातं. तोरणमाळ हे ठिकाण दुर्गम आणि खडतर असल्यामुळे त्याठिकाणी फारशी वर्दळ नसते. वर्दळीचा अभाव हेच तोरणमाळच्या सौंदर्याचं गुपित आहे. नियोजनबद्धरीतीने या पर्यटनस्थळाचा विकास केला तर इथे ऐतिहासिक, नसर्गिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि साहसी पर्यटनाच्या अमर्याद शक्यता एकवटलेल्या आहेत. महाराष्ट्र राज्य पर्यटन विकास महामंडळाने तिथे ‘तोरणमाळ हिल रिसॉर्ट’ सुरू केलं आहे. खानदेशातील या एकमेव हिल स्टेशनला दोन-तीन दिवस मुक्काम करून समाधान होत नाही. इथला कोपरान् कोपरा अदभुत सौंदर्याने नटला आहे. वळणावळणाचे रस्ते, दूरवर जाणा- या पाऊलवाटा, दाट आणि कुठे कुठे विरळ असलेली आदिवासी बांधवांची घरं आपल्या भोगवादी संस्कृतीपासून कितीतरी अलिप्त आहेत. शहाद्याहून तोरणमाळला जाताना लेघापाणी सोडल्यानंतर कालापाणी येथील दरीत कोसळणारे जलप्रपात मंत्रमुग्ध करतात. अत्यंत आवेगाने खोल दरीत कोसळणारे हे धबधबे फक्त पर्जन्यकाळातच दिसतात. हिरव्यागार अशा या जंगलात विविध वृक्ष, विविध पक्षी विलक्षण नेत्रसुख देत असतात आणि पर्यटक या सृष्टीसौंदर्याच्या पाशात अडकतो. सातपायरींचे दृश्य तर अलौकीक सौंदर्याचाच आनंद देते.
वळणावळणाने जेव्हा सात पायऱ्या चढत आपण व्ह्य़ू पॉईंटवर जातो त्यावेळी गुहेतील नागार्जुन मंदीर पाहणे हा एक आगळाच आनंद म्हटला पाहिजे. ११४३ मीटर उंचीवर असलेल्या या व्ह्य़ू पॉईंन्टवरून पर्यटक येतो तेव्हा थक्क व्हायला होते. एवढा अवघड पर्वत आपण कसा पार केला, याचे आश्चर्य तर वाटतेच पण त्याच बरोबर नागमोडी वळणाच्या सातपायऱ्यांच्या घाटही अचंबित करतो. ते नयम मनोहर दृष्य डोळ्यास पुन्हा पुन्हा साठवावेसे वाटते. सातपुडा पर्वतावरील एवढय़ा उंचीवरील यशवंत तलाव पर्यटकाला पुन्हा विस्मयचकीत करतो. सभोवतालच्या वृक्षवेलींनी नटलेला हा तलाव सृष्टीच्या चमत्काराची एक सुखद अनुभूती देतो. सीता खाईकडे जात असताना वाटेत लागणारा कमळ तलाव, त्यातील सुरेख कमळाची फुले, काठावर सतत पहारा देणारे महाकाय वटवृक्ष जणू साखळी करून उभे असलेले दिसतात, या वृक्षांच्या वयाचा अंदाज करणेही अवघड असल्याचे जाणवते. आणि नंतर समोरच दिसती ती महाकाय दरी, सीताखाई ! या सीताखाईच्या डोंगरावरून अलगदरित्या उडी घेणारा आणि खाईत धो- धो कोसळणारा धबधबा पुन्हा पर्यटकाला भूलोकावरील सौंदर्याचा दृष्टान्त देतो. हे अतिरम्य भिरभिरणारे काळे पांढरे जलोद बिलगतांना पाहून मन मोहून टाकते. भुरळ घालणाऱ्या सृष्टी सौंदर्याच्या पाशातून विलग होणे अवघड होऊन बसते. कितीतरी काळ पर्यटक हे निसर्गसौंदर्य न्याहाळीत असतो.
त्यातच तरूण पर्यटकांनी आवाज दिला, तर निरव वातावरणात त्यांचे शब्द डोंगर दऱ्यातून घुमतच राहतात. एकदा-दोनदा नव्हे तर पाचदा. सीताखाईच्या हा प्रतिध्वनी पॉइन्टवर पर्यटकांना हर्षोल्हासित करतो. खडकी पॉईन्टवरही असाच आनंद लाभतो. आडवा-तिडवा पहुडलेला सातपुडा आणि त्याने परिधान केलेला हिरवा शालू, त्यातच पुन्हा गिरकी घेणारे ढग, त्यांनी दऱ्या खोऱ्यात कडय़ा-कपारांना, उंच उंच सुळक्यांना घातलेले आलिंगन किंवा ढगांची दंगामस्ती हे सारे सौंदर्य लुब्ध करीत असते. सूर्योदय किंवा सूर्यास्त पॉइन्टवरही अशीच अनुभूती मिळते. सध्या ढगाळ वातावरण आणि रिमझिम पाऊस यामुळे सूर्यदर्शन होत नाही, तरी आपला आनंद तसूभरही कमी होत नाही. बऱ्याच अवधीनंतर आपल्याला जाणीव होते की आपण स्वत:ही ढगातच आहोत. ढगांनी आपल्यालाही अलिंगन दिले आहे. ढग आपल्याशीही मस्ती करीत आहेत. ते आपल्याजवळ धिंगाणा घालीत आहेत. तेव्हा मात्र परिपूर्ण आनंदाची खरी जाणीव होत असते.

स्त्री भ्रूण ह्त्या थांबवा

लेख वाचविण्यासाठी धडपडणारे सर्वोदय मंडळ 
स्त्री भ्रूण ह्त्या एक सामाजिक कलंक, लेख वाचवा- बेटी बचाव, स्त्री भ्रूण ह्त्या थांबवा या ज्वलंत विषयावर स्वयंचलीत देखावा तळोद्यातील सर्वोदय गणेश मित्र मंडळाने साकारून वंशाचा दिवा म्हणजे मुलगीच आहे, पणती नसेल तर दिवा कसा लागणार, आता तरी विचार करा,
चला सज्ज होऊ या स्त्री भ्रूण ह्त्या थांबवु या, अशा घोषवाक्यानी जनजागृती करण्याचे काम केले आहे. तळोदा शहरातील ठाणेदार गल्लीत सर्वोदय गणेश मित्र मंडळाची स्थापना २० वर्षापासून करण्यात येत आहे. यापुर्वी कारगिल युद्धातील शहीदाना श्रदांजली, बारा ज्योतिर्लिंग दर्शन गुफा, बाल कामगार रोखणे, भुत महल, शहिद भगतसिंग, राजगुरू, सुखदेव, यांचा स्वातंत्र्यसंग्रामातील यशोगाथा, धार्मिक, पौ राणिक, देशभक्तीपर स्वंयमचलित देखावे सादर करण्यात आले आहेत. हे मंडळ अनेकदा प्रथम, द्वितीय, तृतीय पारितोषिकांचे मानकरी ठरले आहे. भारत भूमीत स्त्री शक्तीच्या रुपात आदिशक्ती जगदंबेचे पूजन केले जाते. पण त्याच भुमीत नतभ्रष्ट भ्रूण हत्येचे महापाप करतात. त्यामुळे मंडळाने जनजागृती स्त्री भ्रूण ह्त्या एक सामाजिक कलंक हां ज्वलंत विषय घेवुन आरास सादर केली आहे. एक गृहस्थ आपल्या पत्नीला गर्भजल तपासणी करण्याकरिता डॉक्टरांच्या क्लिनीकमधे आणतो. डॉक्टर मला माझ्या पत्नीच्या गर्भजल तपासणी करायची आहे हो, मला मुलगी नको, मुलगा हवा, असे ते डॉक्टराना सांगतात तेव्हा डॉक्टर यास नकार देतात. तेवढ्यात आईला गर्भातील भ्रूणाची आर्त हाक ऐकू येते. माँ, अभी तो भगवानने मेरे हातो में किस्मत की लकीर भी नहीं बनाई और ईसके पहले ही आपणे तकदीर का फैसला सूना दिया, मुझे जीने दो माँ, अशी आर्त हाक त्या मातेच्या कानी पड़ते, अशी भावनात्मक आरास साकारण्यात आली आहे. सर्वोदय गणेश मित्र मंडळाचे अध्यक्ष दिपक चौधरी, सचिव किरण ठाकरे, सह मंडळाचे पदाधिकारीनी परिश्रम घेतले.