आमचे आधारवड आप्पा साहेब लक्ष्मणराव बबनराव माळी हे अत्यंत उदार, दिलदार, मातीशी जोडलेले रांगडे व्यक्तिमत्व आहे. त्यांच्या स्वभावातील माणुसकी, साधेपणा आणि प्रेमळपणा यामुळे ते प्रत्येकाच्या मनात आदराचे आणि आपुलकीचे स्थान मिळवून आहेत. त्यांची आध्यात्मिक वृत्ती म्हणजे देवावर अढळ श्रद्धा, मनःशांती, संयम, सेवा, नम्रता आणि जीवनाला दिशा देणारी सकारात्मक ऊर्जा आहे. ते नियमित देवपूजा करतात आणि देवावर त्यांची अढळ श्रद्धा आहे. देवावरचे त्यांचे निस्सीम प्रेम त्यांच्या जीवनाला योग्य दिशा देत आले असल्याचे ते नेहमी म्हणतात.
नेतृत्वगुण असलेले आप्पा साहेब पी. ई. सोसायटीचे अध्यक्ष म्हणून प्रामाणिकपणे आणि जबाबदारीने काम करत आहेत. संस्था चालक म्हणून त्यांनी दिलेले योगदान खरोखरच मोलाचे आहे. त्यांच्या मेहनतीमुळे अनेक लोक घडले, अनेकांचे जीवन बदलले आणि संस्था अधिक सक्षम झाली. त्यांच्या मार्गदर्शनामुळेच आम्हाला आज पुढे जाण्याची संधी मिळाली आहे.
औपचारिक शिक्षणाच्या कागदी पदव्या कमी असल्या तरी जीवनातील अनुभव, व्यवहारज्ञान आणि शहाणपण यामुळे ते खऱ्या अर्थाने आमचे मार्गदर्शक आहेत. संयम, सातत्य, कुटुंबावरचे प्रेम आणि कुटुंबप्रमुख म्हणून निभावलेली जबाबदारी ही त्यांच्या व्यक्तिमत्वाची खास ओळख आहे.
ते कुटुंबावर, समाजावर आणि तरुण पिढीवर मनापासून प्रेम करतात. कठीण परिस्थितीतही त्यांनी कधी हार मानली नाही. असंख्य संकटांना सामोरे जात त्यांनी नेहमीच योग्य मार्ग शोधला.
माझ्यासारख्या अनेकांना त्यांनी आधार दिला आणि तरुणांची साथ कधीही सोडली नाही. समाजाला चांगली दिशा देणारे आप्पा साहेब हे खरोखरच आदर्श आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. त्यांच्यासारखा मार्गदर्शक आणि आधार मिळणे हे आमच्यासाठी अभिमानाची आणि आनंदाची बाब आहे.
खरे आप्पा ओळखायचे असतील तर आप्पा साहेबांचा सहवास आवश्यक आहे. सहवासात मिळते अनुभवाची शिदोरी, जी कित्येक पुस्तके वाचूनही सापडणार नाही. असंख्य माणसे वाचलेला माणूस, आमची आभाळमाया - कधीमधी चिडणारे, पण लगेच विसरून त्याहीपेक्षा अधिक प्रेम करणारे, साधे, भोळे, दिलदार आणि मनाचा राजा असलेले आप्पासाहेबाना वाढदिवसाच्या सप्तरंगी शुभेच्छा.
आप्पा साहेब, तुम जिओ हजारो साल, साल के दिन हो पचास हजार!
कोणत्याही टिप्पण्या नाहीत:
टिप्पणी पोस्ट करा