Breking News

शुक्रवार, २६ जून, २०२६

आकाशाला गवसणी घालणारा दिवचा अविस्मरणीय प्रवास

दिनांक २६ जून २०२६...     
   अनेक दिवसांपासून वाट पाहत असलेला दिवस अखेर उजाडला. आम्ही दहा मित्रांनी केंद्रशासित प्रदेश दिव येथे विमानाने प्रवास करण्याचा बेत आखला होता. प्रत्येकाच्या मनात उत्सुकता, आनंद आणि नव्या अनुभवाची ओढ होती. मात्र, प्रवासाला निघण्यापूर्वीच एक दुःखद बातमी आली. आमचा मित्र विशाल सूर्यवंशी याच्या काकूंचे दुःखद निधन झाल्यामुळे त्याला या सहलीला येणे शक्य झाले नाही. त्याची उणीव आम्हा सर्वांना सतत जाणवत होती.
       पहाटेपासूनच प्रत्येकाची लगबग सुरू झाली होती. सामानाची आवराआवर, वेळेचे नियोजन आणि मित्रांच्या सततच्या फोनमुळे वातावरण उत्साहाने भरून गेले होते. प्रवासाच्या सुरुवातीला पावसाची शक्यता लक्षात घेऊन अनेक चर्चा रंगल्या. नंदुरबारपर्यंत चारचाकीने जायचे की दुचाकीने, यावर बराच वेळ खल झाला. शेवटी आमच्या समूहातील मावळा दादाभाऊ पाटील यांनी ठामपणे सांगितले, आपण दुचाकीनेच नंदुरबारला जाऊ. सकाळची पाच वाजताची ट्रेन पकडू आणि वेळेत सुरतला पोहोचू. त्यांच्या या प्रस्तावाला सर्वांनी एकमुखाने होकार दिला. यात आमचे स्नेही असलेले राहुल व बापू यांनी मात्र बगल देत स्वतंत्र प्रवास करणे निवडले.
              ठरल्याप्रमाणे पहाटे आम्ही दुचाकींवरून नंदुरबार गाठले. तिथून बसस्थानक आणि रेल्वे स्थानकावर पोहोचेपर्यंत गप्पा, विनोद, एकमेकांची खेचाखेच आणि हास्याचा अखंड वर्षाव सुरू होता. प्रवासाचा प्रत्येक क्षण आनंदाने भरून गेला होता. अखेर आम्ही सुरतला सुखरूप पोहोचलो. आमच्या दहा जणांच्या समूहात माझा ज्ञानूचा व विशालचा यापूर्वी विमानप्रवासाचा अनुभव होता. मात्र इतर सर्व मित्रांसाठी हा आयुष्यातील पहिलाच विमानप्रवास होता. त्यामुळे प्रत्येकाच्या चेहऱ्यावर वेगळाच आनंद आणि उत्सुकता दिसत होती. कोणी विमान किती मोठे असेल याची चर्चा करत होते, तर कोणी खिडकीजवळची जागा मिळावी म्हणून प्रयत्न करत होते. प्रत्येकजण हा क्षण आपल्या मोबाईलमध्ये आणि मनात कायमचा जपून ठेवण्याचा प्रयत्न करत होता.
       सुरत विमानतळावर पोहोचल्यानंतर प्रथम सुरक्षा तपासणी, बोर्डिंग पास, ओळखपत्रांची पडताळणी अशा सर्व औपचारिक प्रक्रिया पूर्ण केल्या. विमानतळाचे भव्य आणि आधुनिक वातावरण पाहून अनेक मित्र अक्षरशः भारावून गेले. प्रत्येकजण वेगवेगळ्या ठिकाणी उभे राहून छायाचित्रे काढत होता. काहींनी सेल्फी घेतले, तर काहींनी विमानाच्या पार्श्वभूमीवर आठवणी टिपल्या. अखेर तो बहुप्रतीक्षित क्षण आला. बोर्डिंगची घोषणा होताच आम्ही सर्वजण उत्साहाने विमानात प्रवेश केला. विमानातील आसनावर बसल्यानंतर अनेकांच्या चेहऱ्यावर आनंदासोबत थोडीशी भीतीही स्पष्ट दिसत होती. सीट बेल्ट लावताना एअर होस्टेसच्या सूचना काळजीपूर्वक ऐकल्या. काही क्षणांतच विमानाने धावपट्टीवर वेग घेतला आणि एका झटक्यात आकाशात झेपावले.

       विमान जमिनीपासून उंचावत असताना खाली दिसणारी सुरत शहराची दृश्ये, लहानशा खेळण्यांसारख्या दिसणाऱ्या इमारती, नागमोडी वळण घेणारे रस्ते आणि पांढऱ्याशुभ्र ढगांमधून होणारा प्रवास हा अनुभव शब्दांत मांडणे कठीण आहे. पहिल्यांदाच विमानप्रवास करणाऱ्या मित्रांच्या चेहऱ्यावर आश्चर्य, आनंद आणि समाधान यांचा सुंदर मिलाफ दिसत होता. त्या क्षणी प्रत्येकाच्या मनात एकच भावना होती. स्वप्न प्रत्यक्षात उतरले! या अविस्मरणीय प्रवासाची ही तर केवळ सुरुवात होती. पुढे दिवच्या निसर्गसौंदर्याने, समुद्रकिनाऱ्यांनी, ऐतिहासिक वारशाने आणि मित्रांच्या सहवासाने हा प्रवास आयुष्यभरासाठी मनात कोरला जाणार होता. २६ जून २०२६ चा हा दिवस आमच्या सर्व मित्रांच्या आयुष्यातील एक अविस्मरणीय आठवण बनून कायम स्मरणात राहील.....

कोणत्याही टिप्पण्‍या नाहीत:

टिप्पणी पोस्ट करा