Breking News

मंगळवार, २० ऑगस्ट, २०२४

दीपिका नितीन शिंदे यांची स्वप्नपूर्ती – संघर्षातून उभारलेले एक घर

"आपल्या जीवनातील संघर्ष आणि आव्हाने आपल्या धैर्याची, निष्ठेची, आणि प्रेमाची खरी कसोटी पाहतात." माणसाच्या जीवनातील महत्त्वाचा भाग म्हणजे त्याच्या कुटुंबाचे रक्षण, प्रेम, आणि त्यांच्यासाठी काहीतरी करून दाखवण्याची जिद्द. कधी परिस्थिती हाताशी येते, तर कधी केवळ जिद्दीच्या जोरावर जीवनाची दिशा बदलता येते.   
    दीपिका नितीन शिंदे यांचे जीवन अशाच संघर्षांची कथा सांगते. कठीण परिस्थितीतही तिने कधी हार मानली नाही आणि आपली जबाबदारी निभावली. मात्र, कधी कधी माणसाला आपल्या कुटुंबीयांकडून किंवा जवळच्या व्यक्तीकडून आधाराची गरज असते. अशीच भूमिका मी (सुधाकर मराठे) यांने निभावली, जिथे त्यांनी केवळ आर्थिकच नव्हे तर मानसिक आधारही दिला. त्यांच्या प्रयत्नांमुळे दीपिकाच्या आयुष्यातील एक मोठे स्वप्न पूर्ण झाले – आपले हक्काचे घर! या कार्यातून फक्त घरच नव्हे, तर एका निष्ठावान, प्रेमळ नात्याची पुनर्स्थापना झाली, ज्यामुळे फक्त एका व्यक्तीचे नव्हे, तर संपूर्ण कुटुंबाचे भविष्य उजळले. ही कहाणी केवळ एक संघर्षमय प्रवास नव्हे, तर त्यातून मिळालेल्या प्रेरणांची आणि नात्यांतून उमललेल्या माणुसकीची आहे.
परिस्थिती आणि नैतिक जबाबदारी
             दीपिका नितीन शिंदे यांची आर्थिक परिस्थिती हलाखीची होती. कुटुंबाची जबाबदारी सांभाळताना त्यांनी कधीही हार मानली नाही. संकटांना तोंड देत त्यांनी आपले जीवन जगले. तिला घर बांधून देण्याचा निर्णय सुधाकर मराठे यांनी घेतला, ज्यामुळे तिच्या भविष्याला स्थैर्य मिळाले. घर बांधण्याचा निर्णय हा फक्त कर्तव्य नव्हता, तर लहान भाऊ म्हणून जपलेल्या निष्ठेचा आणि माणुसकीचा सन्मान होता.
जागा निवड व घरकुल योजना मंजुरी
          नंदूरबारमधील शिरीष कुमार नगर येथील प्लॉट, जो नितीन शिंदे यांच्या दाजींनी गुंतवून ठेवला होता, तिथे घर बांधण्याचे ठरले. 2022 साली सुधाकर मराठे यांचे मित्र, नंदूरबारचे माजी उपनगराध्यक्ष कुणाल वसावे यांच्या सहकार्याने घरकुल योजनेची मंजुरी मिळाली. पालिका कर्मचारी गौरव पाटील यांनी तातडीने पहिला हप्ता खात्यात वर्ग केल्याने कामाला गती मिळाली.
ठेकेदार आणि बांधकाम
           घर बांधण्याची जबाबदारी श्री. वासुदेव कदमबांडे यांनी घेतली. सुधाकर मराठे यांच्या व्यक्तिगत लक्षामुळे घराचा सुंदरसा प्लॅन तयार करण्यात आला. साधारण 500 चौरस फूट क्षेत्रफळ असलेल्या या घरात दोन खोल्या आणि पारस बागेसाठी जागा ठेवण्यात आली. श्री. कदमबांडे यांनी "ना नफा, ना तोटा" तत्त्वावर काम केले. कामाचे व्यवस्थापन, घराच्या लहान-मोठ्या बाबींचे बारकाईने निरीक्षण, यासाठी सुधाकर मराठे यांनी संपूर्ण वेळ दिला.
खर्च आणि बांधकाम पूर्णता
                 घर बांधण्यासाठी साधारण 8 लाख रुपये खर्च आला. घरकुल योजनेची काही रक्कम वगळता संपूर्ण खर्च सुधाकर मराठे यांनी उचलला. 2024 साली घर बांधून पूर्ण झाले आणि गृहप्रवेश सोहळा साजरा करण्यात आला. घरभरणीचे कार्य अत्यंत नियोजनबद्ध झाले, ज्यामध्ये तळोदा येथून बांधकाम कारागीर, पुट्टी व रंगकाम करणारे कारागीर आणि स्वयंपाकासाठी ब्राह्मण आणण्यात आले.
प्लॉटच्या नोंदी व शिक्षणाची जबाबदारी
            भविष्यात कोणताही वाद निर्माण होऊ नये म्हणून घर बांधलेला प्लॉट दीपिका नितीन शिंदे यांच्या नावावर केला गेला. त्यांच्या मुलीची म्हणजेच स्वामिनी नितीन शिंदे या भाचीचे शिक्षण 12 वीपर्यंत तळोदा येथेच पूर्ण करण्यात आले. यासोबतच तिच्या मुलासाठीही व्यावसायिक व्यवस्थेचा विचार करण्यात आला.
                         ही कहाणी फक्त दीपिका नितीन शिंदे यांच्या स्वप्नपूर्तिची नाही, तर संघर्षातून नातेवाईकांनी दिलेल्या पाठिंब्याने उभारलेल्या एका कुटुंबाच्या पुनरुत्थानाची आहे. सुधाकर मराठे यांचे हे कार्य त्यांच्या कुटुंबीयांसाठीच नव्हे, तर इतरांसाठीही एक आदर्श आहे.
"आपल्या कुटुंबातील गरजू व्यक्तींना मदत करणे हे आपले नैतिक कर्तव्य आहे," हा संदेश देत त्यांनी एक चिरंतन उदाहरण घालून दिले आहे.

सोमवार, २४ जून, २०२४

संघर्षातून समाजसेवेपर्यंत: योगेश मराठे यांचा प्रेरणादायी जीवनप्रवास

तळोदा : काही माणसं आपल्या आयुष्यात येतात आणि आपल्या मनात कायमची जागा मिळवतात. त्यांच्या मोकळ्या स्वभावामुळे, स्पष्टवक्तेपणामुळे, आणि त्यांच्या बोलण्यातून येणाऱ्या सहज हास्यामुळे ते कोणालाही आपलंसं करून घेतात. अशीच एक व्यक्ती म्हणजे योगेश शांताराम मराठे. त्यांचा जीवनप्रवास, त्यांची कर्तृत्व गाथा आणि समाजातील त्यांची ओळख याची नोंद घेणे हा खरं तर समाजासाठी गौरवाची गोष्ट आहे. योगेशभाईंच्या आयुष्यातील प्रत्येक टप्पा हा संघर्ष, मेहनत, आणि निस्वार्थ समाजसेवेचा उत्कृष्ट नमुना आहे. त्यांचं आयुष्य म्हणजे साधेपणा, कष्ट, आणि माणूसकीचं जिवंत उदाहरण आहे.

        योगेश मराठे यांचे मूळ गाव पारोळा तालुक्यातील देवगाव. हे गाव छोटं, पण योगेश यांचं बालपण मात्र मोठ्या संघर्षांनी भरलेलं होतं. घरची परिस्थिती तशी बेताची होती. लहान वयातच गरिबीचे चटके सोसावे लागले. घरातील अडचणी, आर्थिक अडसर, आणि जीवनातील कठीण परिस्थिती यांच्याशी त्यांनी लहान वयातच सामना करायला सुरुवात केली. पण या अडचणींनी त्यांना कधीच मोडून टाकलं नाही. उलट, या सगळ्या संकटांनी त्यांना अधिक कणखर, अधिक जिद्दी बनवलं. लहान वयातच मेहनतीची किंमत कळली. त्यातूनच पुढे त्यांनी स्वतःचं वेगळं स्थान निर्माण केलं. त्यांना मिळालेलं शिक्षण मर्यादित होतं, पण जीवनानं त्यांना शिकवलं ते जगण्याचं खरे धडे.

         योगेश भाऊंनी विविध व्यवसायात आपले हात आजमावले. सुरुवातीला छोट्या-मोठ्या उद्योगांतून स्वतःला आर्थिकदृष्ट्या उभं करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी किरकोळ व्यापार, छोटे-छोटे व्यवसाय, आणि अनेक धंद्यांमध्ये नशीब आजमावले. प्रत्येक व्यवसायातून नवा अनुभव घेत, अडचणींचा सामना करत, त्यांनी आपली वाटचाल सुरु ठेवली. व्यवसाय करताना त्यांना अनेकदा अपयशही मिळालं, पण कधीच हार मानली नाही. मनात अपार जिद्द आणि प्रचंड मेहनतीची तयारी होती. त्या जोरावर ते पुढे जात राहिले. जीवनातला हा संघर्ष त्यांना नेहमीच अधिक मजबूत करत राहिला. अनेकदा नशिबाने पाठ फिरवली, पण त्यांनी नशिबावर कधी विश्वास ठेवला नाही, काहीतरी करत रहावे प्रयत्न सुरू ठेवावे काहींना काही मार्ग निघताच असे ते नेहमी म्हणत, 

        तळोदा शहरातील माजी नगराध्यक्ष भरतभाई माळी यांच्या नेतृत्वात आणि संजय माळी यांच्या मार्गदर्शनात, योगेशभाईंनी 'गणेश सोशल ग्रुप'च्या माध्यमातून समाजकार्यास सुरुवात केली. प्रारंभी हा एक छोटा प्रयत्न होता, पण हळूहळू त्यांनी समाजकार्यात आपलं संपूर्ण लक्ष केंद्रित केलं. या ग्रुपच्या माध्यमातून त्यांनी अनेक सामाजिक उपक्रम राबवले. गरजूंसाठी मदत, सांस्कृतिक कार्यक्रम, आरोग्य शिबिरं, आणि समाजातील विविध घटकांसाठी उपयुक्त उपक्रम राबवून त्यांनी तळोदा शहरात आपली वेगळी ओळख निर्माण केली. त्यांच्या कामाची दखल घेत अनेक लोक त्यांच्यासोबत जोडले गेले. त्यांच्या विनम्रतेने आणि मनमिळावूपणाने त्यांची लोकप्रियता वाढत गेली.

     समाजकार्यासोबतच योगेश मराठे यांना राजकारणाची ओढ निर्माण झाली. त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. सुरुवातीला विधानसभा समन्वयक म्हणून जबाबदारी पार पाडली. त्यानंतर शहर अध्यक्ष म्हणून काम करताना त्यांनी पक्ष संघटना बळकट केली. काँग्रेस पक्षात कार्यरत असताना त्यांनी अनेक स्थानिक प्रश्न उचलले. शहरातील नागरिकांच्या समस्या सोडवण्यावर भर दिला. त्यांच्या कार्यक्षमतेमुळे त्यांना पक्षात आणि समाजात दोन्हीकडे मान मिळाला. त्यांनी पक्षासाठी झोकून देऊन काम केलं आणि लोकांमध्ये आपली जागा पक्की केली.

       योगेशभाईंच्या राजकीय प्रवासात त्यांचे जिवलग मित्र हितेंद्र क्षत्रिय आणि संदीप परदेशी यांची मोलाची साथ मिळाली. या त्रिकुटाने पुढे माजी आमदार उदेसिंग पाडवी यांच्या नेतृत्वात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला. या तिघांनी मिळून जिल्ह्यात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढवली. स्थानिक पातळीवर पक्षाला नवी ओळख मिळवून दिली. विशेष म्हणजे त्यांनी राजकीय व सामाजिक कार्य करताना कधीही मतभेदांच्या राजकारणात स्वतःला गुंतवलं नाही. त्यांची काम करण्याची पद्धत कायम सकारात्मक, लोकाभिमुख, आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारी होती. पक्ष बदलला तरी त्यांची लोकांसाठी झटण्याची वृत्ती मात्र कायम आहे.

        योगेश मराठे यांच्या व्यक्तिमत्त्वाचा खरा गाभा म्हणजे समाजासाठी त्यांची निस्वार्थ भावना. ते कोणालाही मदत करताना कधीही मोठेपणा दाखवत नाहीत. त्यांच्या मदतीमुळे अनेक गरजूंचे प्रश्न सोडवले गेले. मराठा समाजाचे तळोदा शहरातील युवा नेतृत्व, छत्रपती शिवाजी महाराज शिव स्मारक समितीचे अध्यक्ष पदी आहेत. विशेषत: त्यांची एक प्रेरणादायी परंपरा म्हणजे गेल्या पाच वर्षांपासून दर वाढदिवसाला ११,००० रुपयांची देणगी समाजकार्याकरिता देणं. काही लोक वाढदिवस साजरे करतात, पण योगेशभाई वाढदिवस समाजासाठी काहीतरी देण्याची संधी मानतात. हा त्यांचा उपक्रम गेल्या पाच वर्षांपासून अखंडित सुरू आहे. याशिवाय आमदार राजेश पाडवी यांच्या वाढदिवसानिमित्त योगेश मराठे यांच्या पुढाकाराने तळोद्यात समाजोपयोगी वस्तूंचे वाटप करण्यात आले. चर्मकार समाजाला १० खुर्च्या व २ मॅट, मातंग समाजाला १० खुर्च्या व २ मॅट तसेच कुकरमुंडा येथील इस्कॉन मंदिराला गाद्या व मॅट प्रदान करण्यात आले. खर्च टाळत समाजासाठी उपयुक्त वस्तू देत मराठे यांनी समाजसेवेची आदर्श दिशा दिली. यातून त्यांची समाजाबद्दलची बांधिलकी, जबाबदारी आणि निस्वार्थीपणा दिसून येतो. 
        योगेश मराठे यांनी केवळ समाजासाठीच नव्हे, तर आपल्या कुटुंबासाठीदेखील मोलाची भूमिका बजावली आहे. त्यांच्या भाऊ सुधाकर मराठे यांना नोकरी मिळवून देण्यात त्यांचे मोठे सहकार्य आहे. सुधाकर यास योग्य मार्गदर्शन, आधार आणि संधी मिळवून देत त्यांनी कुटुंबाला आर्थिक स्थैर्य मिळवून दिलं. आज सुधाकर मराठे यांची ओळख समाजात चांगली आहे, याचं श्रेय योगेशभाईंना मोठ्या प्रमाणात जातं. त्यांनी संपूर्ण कुटुंबाला सावरण्यात मोलाचा वाटा उचलला आहे. त्यांनी कुटुंबातील प्रत्येक सदस्याला मदतीचा हात दिला आहे आणि आज त्यांच्या कुटुंबाची प्रगती साधली आहे.. 
        आज योगेशभाई आम. राजेश पाडवी यांच्या नेतृत्वात भारतीय जनता पक्षात सक्रिय राजकारण करत आहेत. पक्ष बदलला, पण समाजकार्याची दिशा आणि लोकांसाठी काम करण्याची वृत्ती तशीच आहे. पक्षीय राजकारण कितीही असलं तरी योगेशभाईंसाठी माणूस महत्त्वाचा आहे. ते राजकारणाच्या माध्यमातून समाजसेवा करणं हेच आपलं कर्तव्य मानतात. पक्ष बदलला पण माणसं जोडण्याची आणि त्यांच्यासाठी निस्वार्थ झटण्याची वृत्ती कायम राहिली आहे. ते आजही तळोदा परिसरात आपली वेगळी ओळख जपून आहेत.
       योगेशभाई जे मनात असतं तेच थेट बोलतात. त्यांच्या बोलण्यात नेहमीच हास्य मिसळलेलं असतं. कठीण परिस्थितीतसुद्धा ते हलकंफुलकं वातावरण निर्माण करतात. त्यांचं मन अत्यंत निस्वार्थी, साधं आणि कोणताही दिखावा न करणारा आहे. कुटुंबासाठी त्यांनी नेहमी खंबीर पाठींबा दिला आहे. राजकारण, समाजकारण, किंवा व्यक्तिगत नातं – ते माणसं जोडतात, तोडत नाहीत. योगेश मराठे यांचा संपूर्ण जीवनप्रवास हा संघर्ष, मेहनत, निस्वार्थ समाजसेवा आणि राजकीय प्रामाणिकपणाचं उत्तम उदाहरण आहे. ते आज ज्या ठिकाणी पोहोचले आहेत, ते त्यांच्या अपार मेहनतीचा आणि लोकांना दिलेल्या निस्वार्थ प्रेमाचा परिणाम आहे.        
  योगेशभाईंसारख्या निस्वार्थी व्यक्तिमत्त्वाची उपस्थिती म्हणजे एक सकारात्मक आशेचा किरण आहे. ईश्वरचरणी प्रार्थना की त्यांना उत्तम आरोग्य, दीर्घायुष्य, आणि समाजसेवेची अजून मोठी संधी लाभो. वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा योगेशभाई!....

सोमवार, १० जून, २०२४

आमचे घर : आठवणींचा ठेवा, कष्टांचा वारसा आणि जीवनप्रवासाचा साक्षीदार

                  हे खरं तर आम्ही आमच्या मामाचे घर म्हणतो; पण आम्हाला मामा नव्हते. हे घर आमच्या आजी स्व. नबाबाई संपत मराठे यांचे होते. त्यामुळे या घराशी आमच्या कुटुंबाचे अतूट नाते जोडले गेले. आमची आई आशाबाई शांताराम मराठे ही स्व.संपत मराठे व स्व.नाबाबाई मराठे यांची नवसाची एकुलती एक मुलगी होती. आमचे आजोबा स्व. संपत मराठे यांचे निधन झाले तेव्हा त्या काळात संपर्काची साधने कमी होती. मुलीला ही दुःखद बातमी वेळेवर मिळाली नाही. तब्बल दहा दिवसांनी तिला ही गोष्ट कळली. त्या प्रसंगामुळे आजीने आपल्या मुलीला, म्हणजेच आमच्या आईला, कायम आपल्या जवळ ठेवण्याचा निर्णय घेतला.  
      आमचे मूळ गाव पारोळा तालुक्यातील देवगाव. तेथे आमची वडिलोपार्जित शेती होती. त्या काळी ग्रामीण भागात उद्योगधंदे किंवा रोजगाराच्या संधी फारशा नव्हत्या. शेतीवरच आमचा उदरनिर्वाह चालत होता. मात्र काहीतरी नवीन करण्याच्या उद्देशाने माझे वडील शांताराम वेडू मराठे आणि आई सौ. आशाबाई मराठे यांनी तळोदा येथे येऊन संसाराची नवी सुरुवात केली..
           याठिकाणी सुरुवातीचे दिवस अत्यंत कष्टाचे होते. वडिलांनी लॉरीवर भाजीपाल्या विक्री करून पाहिली, त्यानंतर ते गल्लोगल्ली फिरून बर्फाचा गोला विकू लागले. मी लहान असताना त्यांच्या लॉरीवर बसून "गोला वाले, भाजी वाले!" अशी आरोळी मारत फिरलो आहे. त्यामुळे त्यांच्या कष्टाची जाण आहे. सकाळी गोला किंवा भाजलेल्या आणि सायंकाळी बाफलेल्या शेंगा विकणे, ती आठवण आजही मनात ताजी आहे.
           फक्त वडीलच नव्हे तर आईनेही संसार उभा करण्यासाठी खूप मेहनत घेतली. वडिलांना मदत करणेसोबतच बाजारात मठ आणि पापडी विकणे अशा अनेक कामांमध्ये तिने सहभाग घेतला. आमची आजी देखील जिल्हा परिषद शाळेवर गोळ्या बिस्कीट विक्री करत होती त्यांच्या सर्वांच्या कष्टामुळेच आमचा संसार हळूहळू मार्गी लागला.      
          या सर्व काळात आमची आजी आमच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहिली. तिच्यामुळे आम्हाला राहण्यासाठी हे जुने घर मिळाले. हे घर फक्त विटा आणि मातीचे बांधकाम नव्हते; ते आमच्या आयुष्याचा आधार होते. या घरात आणखी एक वाटा होता तो म्हणजे आमचे आजोबा आजीचे लहान बंधू स्व.ओंकार शंकर मराठे यांचा त्यांनी ही मरणापूर्वीच आपण ही जागा माझ्याकडून घ्या असे म्हणून प्रेम व्यक्त केले.
         या घरात आमच्या असंख्य आठवणी दडलेल्या आहेत. चार भावंडे, आई-वडील आणि आजी अशा मोठ्या कुटुंबाचा आनंद, गप्पा, हशा, सण-उत्सव आणि लहानसहान भांडणे या सर्वांचे हे घर साक्षीदार आहे. आमच्या बालपणातील प्रत्येक क्षण या घराच्या भिंतींमध्ये आजही जिवंत आहे.
            विशेष म्हणजे आमच्या चारही भावंडांचे विवाह याच घरातून झाले. त्यामुळे या घराचे आमच्या आयुष्यातील स्थान आणखी मोठे आहे. काळ बदलला, परिस्थिती बदलली, घरे बदलली; पण या घराशी जोडलेल्या आठवणी मात्र आजही तितक्याच जिवंत आहेत.
        आज जेव्हा या जुन्या घराकडे पाहतो, तेव्हा आजीचे प्रेम, आई-वडिलांचे अथक कष्ट आणि आमच्या बालपणातील सुंदर क्षण डोळ्यांसमोर उभे राहतात. म्हणूनच हे घर आमच्यासाठी केवळ एक वास्तू नसून आमच्या कुटुंबाच्या संघर्ष, प्रेम, त्याग आणि जिव्हाळ्याचे जिवंत स्मारक आहे. हे घर आमच्या आठवणींचा अमूल्य ठेवा आहे. 
          कालांतराने आई-वडिलांच्या अथक परिश्रमातून या जुन्या कवलारू घराचे रूपांतर पत्र्याच्या घरात झाले. संसाराची घडी हळूहळू स्थिरावत गेली आणि घरालाही नवे रूप मिळाले. पुढे मला देखील या घरासाठी काहीतरी करण्याची संधी मिळत आहे. मी या घराचे रूपांतर दुमजली, टुमदार आणि सुबक अशा घरात करण्याचा निर्णय घेतला आहे. घराचा चेहरामोहरा पूर्णपणे बदलणार आहे. नवीन बांधकाम, नवीन सुविधा आणि नवीन स्वरूप प्राप्त होणार आहे.
       मात्र घराचे रूप बदलणार असले तरी त्याच्या जुन्या आठवणी मात्र ताज्याच राहतील यात शंका नाही, त्या मातीच्या भिंती, कौलारू छप्पर, अंगणातील खेळ, आई-वडिलांचे कष्ट, आजीचे प्रेम, भावंडांबरोबर घालवलेले आनंदाचे क्षण आणि घरभर घुमणारा हशा आजही मनात जिवंत आहे. नवीन घर उभे राहील, काळ पुढे जाईल, पण जुन्या घराने दिलेली ऊब, आपुलकी आणि संघर्षातून उभ्या राहिलेल्या आयुष्याच्या आठवणी कधीही विसरता येणार नाहीत.
       आज या घराकडे पाहताना अभिमान वाटतो की आई-वडिलांनी कष्टाने सुरू केलेला प्रवास पुढे नेण्याचे भाग्य मला लाभले. परंतु या सुंदर घराच्या पायात जुन्या घराच्या आठवणींचीच मजबूत वीट रचलेली आहे. म्हणूनच हे घर आमच्यासाठी केवळ निवारा नसून, आमच्या कुटुंबाच्या संघर्ष, जिद्द, प्रेम आणि एकोप्याची जिवंत कहाणी आहे.... 

शुक्रवार, १५ डिसेंबर, २०२३

स्वकर्तृत्वावर उभारलेला व्यवसाय आणि दुर्लक्षित राजकीय कार्यकर्ता: गोकुळ पवार

15 डिसेंबर 2023
           

स्वतःच्या मेहनतीने आणि चिकाटीने यशस्वी व्यवसायिक बनलेला गोकुळ पवार हा एक उद्यमशील व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या प्रवासाची सुरुवात वडिलांकडून चालविल्या जाणाऱ्या सुतारकामाच्या पारंपरिक व्यवसायापासून झाली. शिक्षण अर्धवट ठेवून गोकुळने वडिलांचा व्यवसाय पुढे नेण्यासाठी रंधा हातात घेतला. प्रामाणिक मेहनत, कामाशी प्रचंड निष्ठा आणि हळव्या स्वभावामुळे गोकुळने या व्यवसायात आपले वेगळे स्थान निर्माण केले.
क्रिकेटमधील सुरुवात

९० च्या दशकात गोकुळ क्रिकेटमुळे परिसरात ओळखला जाऊ लागला. शनिगल्लीतील "जय महाराष्ट्र" संघ आणि "त्रिमूर्ती क्रिकेट संघात" खेळणाऱ्या गोकुळने आपल्या दमदार खेळाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले. खेळातला लढवय्या स्वभाव आणि स्वभावातील विनोदबुद्धीमुळे तो सगळ्यांचा लाडका बनला.

व्यवसायिक यश

लाकडी सुतारकामाच्या पलीकडे पाहत, गोकुळने ॲल्युमिनियम सेक्शनमध्ये नशीब आजमावले आणि या क्षेत्रात यशस्वी ठरला. त्याने नंतर ग्लासच्या कामाकडेही वळण घेतले आणि आपल्या मेहनतीच्या जोरावर तालुक्यातील एक प्रतिष्ठित व्यवसायिक म्हणून स्वतःची ओळख निर्माण केली.

राजकारणातील प्रामाणिक कार्यकर्ता

प्रखर हिंदुत्ववादी विचारसरणी असलेला गोकुळ सुरुवातीपासूनच शिवसेना-भाजपचा निष्ठावंत कार्यकर्ता राहिला आहे. २०१७ च्या सार्वत्रिक निवडणुकीत उमेदवारीची अपेक्षा असतानाही वरिष्ठांच्या आदेशामुळे त्याला अर्ज मागे घ्यावा लागला. त्याच्या प्रामाणिकतेचा सन्मान म्हणून दरवर्षी स्वीकृत नगरसेवक पद देण्याचे आश्वासन मिळाले, पण त्याची पूर्तता झाली नाही. भाजपमधील एकनिष्ठ पण दुर्लक्षित कार्यकर्त्यांमध्ये गोकुळचे नाव आवर्जून घेतले जाते. भोळा आणि आपलेपणाने वागणाऱ्या गोकुळने गरिबीतून उभारी घेत कुटुंबाला यशस्वीपणे सक्षम केले आहे.

मस्तीखोर आणि आनंदी व्यक्तिमत्त्व

          गोकुळ पवार हे नाव जसे त्यांच्या व्यवसायिक कर्तृत्वासाठी परिचित आहे, तसेच त्यांच्या मस्तीखोर आणि आनंदी स्वभावासाठीही ते साऱ्यांच्या हृदयात खास जागा निर्माण करतात. स्वतः हसत राहणे आणि इतरांना हसवत ठेवणे हा त्यांचा स्वभावच, ज्यामुळे कुठलेही वातावरण त्यांनी आनंदी आणि जिव्हाळ्याचे बनवले आहे.

         गोकुळचा हा गुण फक्त दैनंदिन आयुष्यातच नाही, तर प्रवासातही तेवढाच ठळकपणे जाणवतो. त्यांच्या सोबत अमरनाथ यात्रा, केदारनाथ-बद्रीनाथ अशा पवित्र तीर्थयात्रा केल्या, ज्यामध्ये त्यांनी आपल्या मस्तीखोर स्वभावाने आणि विनोदबुद्धीने संपूर्ण प्रवास स्मरणीय बनवला. थकवा, अडचणी यांसारख्या गोष्टी त्यांच्या सोबत राहून कुणालाच जाणवल्या नाहीत. त्यांचा हास्यविनोद, गमतीदार किस्से आणि इतरांना आनंदी ठेवण्यासाठी लढवलेल्या विविध क्लृप्त्या या प्रवासाला नेहमीच लक्षात राहणारे क्षण बनवून गेल्या.
             गोकुळचा हा स्वभाव म्हणजे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचा जिवंतपणा आणि समाजात ते जोडलेल्या नात्यांची साक्ष देणारा आहे. कुठल्याही प्रसंगात त्यांच्या सोबत राहिलेले लोक त्यांच्यावर खूप प्रेम करतात आणि त्यांची सोबत सतत हवीशी वाटते. गोकुळ पवार यांनी आनंद देत आणि निखळ हसत-हसवत केलेले हे क्षण आपल्या सर्वांसाठी कायम प्रेरणादायी राहतील!

            कष्टातून स्वतःचे जीवन उभारणाऱ्या आणि समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या गोकुळ पवार यांना वाढदिवसाच्या मनःपूर्वक शुभेच्छा! आपले कर्तृत्व असेच प्रेरणादायी राहो आणि राजकारणातही योग्य स्थान मिळो, हीच सदिच्छा!

शनिवार, २ डिसेंबर, २०२३

दिपक परदेशी: चप्पलविरहित कार्यकर्ता आणि भाजपाचा निष्ठावंत

दिपक परदेशी हे नाव म्हणजे ऊर्जा, आत्मविश्वास, आणि निष्ठेचे प्रतिक. त्यांच्या साध्या राहणी, परंतु प्रभावी स्वभावामुळे ते आज लोकांमध्ये चर्चेचा विषय आहेत. पायात कधीही चप्पल न घालणारा, हाप चड्डी आणि टी-शर्ट असा नेहमीचा पेहराव करणारा हा माणूस मित्रांमध्ये आणि समाजात एक वेगळा ठसा उमटवत आहे.

हिंदुत्व आणि भाजपाच्या कार्यात अग्रणी

हिंदुत्वाच्या प्रचारासाठी असो किंवा भारतीय जनता पक्षाच्या पाठराखणीसाठी, दिपक कधीच मागे हटत नाही. निवडणुकीच्या काळात भाजपाचा झेंडा हातात घेऊन तो अग्रस्थानी दिसतो. कुठलाही मतदारसंघ असो, दिपकचे काम नेहमीच पक्षासाठी उपयुक्त ठरते. पक्षाच्या विरोधकांना उत्तर देण्यासाठी वकीलपत्र घेऊन काम करण्याची त्याची तयारी नेहमीच तत्पर असते. त्याच्या "इस्की टोपी उसके सर" या कौशल्यामुळे तो नेहमीच चर्चेचा ठरतो.

सामाजिक बांधिलकी आणि जनसंपर्क

दिपकचा दांडगा जनसंपर्क हा त्याचा सर्वात मोठा गुण आहे. मित्रपरिवार असो किंवा कार्यकर्ते, दिपक नेहमी लोकांशी संपर्क ठेवतो. नवीन रेसिपी बनवून मित्रांना खाऊ घालणे हा त्याचा आवडता छंद आहे. किचनमध्ये प्रयोग करताना तो जितका आनंदी असतो, तितकाच तो मित्रांमध्ये त्याच्या स्वयंपाकाचा आस्वाद घेताना असतो. त्यामुळे दिपकचा मित्रपरिवार मोठा आहे, आणि त्याच्या या सवयीमुळे तो नेहमी सगळ्यांच्या जवळचा वाटतो.

साध्या जीवनातून प्रभावी भूमिका

पायात चप्पल न घालण्याची त्याची सवय म्हणजे त्याच्या साध्या जीवनशैलीचे प्रतीक आहे. मात्र, त्याचा साधेपणा म्हणजे कमजोरी नाही, तर त्याच्या धडाडीची साक्ष आहे. कोणत्याही कठीण प्रसंगी कुणाशीही भिडायला तो तयार असतो. त्याच्या धैर्याने आणि निष्ठेने भाजपामधील ज्येष्ठ नेतेही प्रभावित झाले आहेत.

दिपक: एक प्रेरणा

दिपक परदेशी हे नाव म्हणजे नुसतेच कार्यकर्त्याचे नाही, तर लोकांसाठी एक प्रेरणास्थान बनले आहे. त्याचे साधेपणा, जिद्द, आणि मित्रत्वाचे गुण समाजासाठी दिशादर्शक आहेत. दिपकचे हे कार्य नेहमीच भाजपाच्या यशाला चालना देणारे ठरेल यात शंका नाही.

दिपक परदेशी यांची ओळख म्हणजे संघर्ष, साधेपणा, आणि सगळ्यांना जोडणारा एक अद्वितीय दुवा. राजकीय आणि सामाजिक क्षेत्रात असे निष्ठावंत कार्यकर्ते समाजाला दिशादर्शक ठरतात.

गुरुवार, ३० नोव्हेंबर, २०२३

क्रिडा शेत्रातील एक अवलिया ; सुनिल सुर्यवंशी उर्फ कालू

21 व्या शतकातील हरवत चाललेला शब्द म्हणजे “मैदानी खेळ” यापूर्वी अनेक लोक एकत्र येऊन खेळ खेळत होते परंतु आज प्रत्येकाच एक स्वतंत्र मैदान आहे ते म्हणजे “मोबाईल” 6 इंच च्या डिस्प्ले हेच एक मैदान आजच्या पिढीचे क्रीडांगण झाले आहे. वयाच्या 4 ते 5 वयापासून पालक हे मैदान मुलांच्या हातात सोपवतात आणि याच 6 इंच च्या मैदानात मुलं आपली आयुष्य सोपवून टाकतात. दोष फक्त फक्त मुलांचा नाही अगदी पालक वर्ग देखील मैदान आणि मैदानी खेळाबाबत उदासीन झालेत. पालक सायंकाळी मैदानावर घेऊन जाणारी पिढीच संपुष्टात येत असल्याचे धोकादायक चित्र आज आहे. 
        मात्र अश्या काळात देखील विद्यार्थ्यांना दररोज मैदानाची सवय लावण्याची कामगिरी तळोदा येथील गो.हु.महाजन हायस्कूलचे क्रीडा शिक्षक सुनील सूर्यवंशी मागील दोन दशकांपासून करत आहेत. अगदी पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत केवळ मैदानावर ठाण मांडून विद्यार्थी घडवणाऱ्या एक अवलिया अशी ख्याती त्यांनी मिळवली आहे. आयुष्य जगत असताना देखील खेळाडू वृत्ती असलेले कुठल्याही खेळात मेहनतीचा व कठोर परिश्रमाचा जोरावर उत्तुंग भरारी घेणाऱ्या खेळाडूना न्याय मिळवून देण्यासाठी नेहमी धडपड करणारे अशी एक आगळी वेगळी ओळख त्यांच्या कठोर परिश्रमामुळे त्यांना प्राप्त केली आहे. खेळा बाबत असलेली आपली निष्ठा व प्रामाणिकपणा त्यांनी जोपासला आहे. त्यामुळे बऱ्याचदा संघाला त्याचे परिणाम देखील सोसावे लागले आहेत. खेळात होत असलेला लबाडी त्यांनी कधीच खपवून घेतली नाही, परिणामी जिंकत असलेला संघ त्यांनी मैदानातून काढून घेतल्याचे अनेक उदाहरणे आहेत. त्या जोरावरच शाळा, गाव, तालुका ते नाशिक विभागीय स्तरापर्यंत खेळाडू तयार करण्यात त्यांनी महत्वाची भूमिका बजावली आहे. खेळाडू प्रती असलेला त्यांचा आदर व त्यांना प्रोत्साहन मिळावे म्हणून ते कायम तत्पर असतात. स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूना गणेवेश मिळावा म्हणून गावातील प्रतिष्ठित नागरिक व माजी खेळाडू यांच्याशी संपर्क करून वेळोवेळी विविध खेळात सहभागी होणाऱ्या खेळाडूसाठी गणवेश उपलब्ध करून संघातील खेळाडू मध्ये एक वेगळा उत्साह निर्माण करतात.
       तळोदा येथील गो हू.महाजन (न्यू हायस्कूल) शाळेचे वरिष्ठ लिपिक सुरेश सूर्यवंशी यांचे ते लहान चिरींजव त्यांनी आपले शिक्षण बी.ए (इतिहास) बी.पी.एड. एम.पी.एड. जळगाव विद्यापीठातून पूर्ण केले. सुरुवातीचा काळ अतिशय संघर्षमय काढला, वीणा अनुदानित शाळेत आपले कर्तव्य बजावले त्यांच्यात असलेले परिश्रम क्षमता पाहून कालांतराने त्याच संस्थेत अनुदानित शाळेत त्यांना रुजू करून घेण्यात आले. त्यांचे आजोबा स्व.रणछोड सुर्यवंशी (गुरुजी) हे तळोद्यातील नामांकित शिक्षक होते. संपूर्ण गाव त्यांना गुरुजी नावाने ओळखत ज्यांनी तालुक्यात खेळा प्रती एक वेगळा आदर्श निर्माण केला. तळोदा शहर हे कुस्ती, मल्ल खांब, कबड्डी अश्या विविध खेळासाठी प्रसिद्ध होते.  पहेलवानाचं गाव’ म्हणून एकेकाळी तळोदा शहराची पहेचान होती. शहरात माजी नगराध्यक्ष स्व.बबनराव छगनराव माळी व स्व. संभाजी चौधरी असे नामांकित मल्ल त्यांच्या कसरतीत घडले. याशिवाय असंख्य यशस्वी व्यक्तिमत्त्व घडविण्यात त्यांचा मोलाचा वाटा आहे. त्यामुळे आजोबांच्या संस्कारात राहिलेले सुनिल सुर्यवंशी हे केवळ खेळाडू घडवत नसून समाजात आवश्यक असणारे विचार खेळाडूमध्ये निर्माण करून समाजात आदर्श तरुण घडवत आहे. 
 
          आदिवासी भागात खेळात मोठी प्रतिभा आहे. परंतू त्यांना संधी उपलब्ध होत नाही अशी खंत मनात असताना त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देण्यासाठी मागील अडीच दशकांपासून वर्षापासून पहाटे व सायंकाळी शालेय विद्यार्थ्यांना शालेय मैदानात खेळाडू सोबत घाम गाळत हँडबॉल या खेळाचे ते क्रीडा प्रशिक्षण देत आहेत. त्यांची सुरुवात दिवंगत क्रीडा मार्गदर्शक  व  त्यांचे गुरू प्रा.पी.पी.भोगे यांनी संघ क्रीडा मार्गदर्शक (कोच) म्हणून  वरिष्ठ व कनिष्ठ महाविद्यालय. चा  संघाची जबाबदारी टाकली त्यांचा मार्गदर्शनात क्रिकेट व हँडबॉल संघाला 1999 -2000 साली वरिष्ठ महावि्यालयीन संघ हँडबॉल आणि क्रिकेट या दोघे संघाने अंतर महाविद्यालयीन स्पर्धेत अजिंक्य पद पटकाविले. राजकारण विरहित असणाऱ्या अध्यापक शिक्षक  मंडळ संस्थेत संस्थेच्या अध्यक्षा मंगलाताई अरुण कुमार महाजन यांच्या व कॉलेज ट्रस्ट चे संचालक श्री अरुण कुमार महाजन दिवंगत प्रा पी.पी.भोगे संस्थेचे सचिव रमेश सूर्यवंशी यांनी क्रीडा क्षेत्रात शाळा व संस्थे मधील खेळाडूंना वाव मिळावा म्हणून त्यांची म्हणून नेमणूक केली. २००१ पासून शाळेचे क्रीडा संघ तयार करत आहेत. अनेक खेळ असले तरी त्यांनी त्यांचा आवडता खेळ हँडबॉल चे संघ तयार केले. पहिल्याच वर्षी १७ वर्षाचा संघ विभाग पातळीवर २००१ साली श्री गणेश केला. शाळा व संस्था त्यांना नेहमीच प्रोत्साहन देत आहे.आज शाळेचे प्राचार्य अमरदिप महाजन त्यांना सतत क्रीडा स्पर्धा बाबत सदैव उत्साह वाढवितात २००१ पासून हँडबॉल खेळ क्रीडा प्रकारात १४ वर्ष मुले मुली, १७ वर्ष मुले मुली, १९ वर्ष मुले मुली क्रीडा स्पर्धेत वर्चस्व राहिले आहे. नुकत्याच राज्य स्तरीय निवड समितीत  त्यांच्या संघातील ३ खेळाडूंची चाचणी घेण्यात आली. दुर्दैवाने त्यांची निवड झाली नसली तरी आगामी काळात त्यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थी निवड समिती समोर चांगली कामगिरी करतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आजही सुनील सुर्यवंशी विद्यार्थ्यांना क्रीडा स्पर्धेकरिता प्रोत्साहन देत असून क्रीडांगण हेच माझे विश्व आहे, असे मोठ्या अभिमानाने ते सांगतात. 

        विद्यार्थी व शिक्षकांचे नाते केवळ पुस्तकापर्यंत मर्यादित नाही. एक साधा शिक्षक मनात ठरवून कामाला झपाटले तर क्रीडा प्रशिक्षकाला जे सहज साध्य होत नाही ते अत्यंत कठीण काम करू शकतो हे त्यांच्या अथक परिश्रमातून दिसते. त्यामुळेच त्यांच्या कार्याची दखल घेत नाशिक येथे क्रीडा साधना व के.एन.डी. बहुउद्देशीय मंडळाच्या संयुक्त विद्यमाने घेण्यात आलेल्या उत्तर महाराष्ट्रस्तरीय गुणवंत क्रीडा शिक्षक तसेच क्रीडा महासंघ महारष्ट्र यांचा आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार
तसेच मालती बाई नामदेव आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार त्यांना मिळाले आहेत.
*शालेय आवारात तयार केले दर्जेदार मैदान*
          शालेय आवारात हँडबॉल खेळण्यासाठी मैदान होते मात्र ते उंच सखल होते. परिणामी विद्यार्थ्यांना दुखापत होईल या भीतीने हँडबॉल मैदान तयार करण्यासाठी मदत मिळावी  म्हणून त्यांनी तत्कालीन आमदार उदेसिंग पाडवी यांच्याकडे मदतीची अपेक्षा बोलून दाखवली होती. पाडवी हे देखील पैसे देवू करत होते. मात्र पैसे न घेता लागणारे साहित्य उपलब्ध करून द्या अशी स्पष्ट भूमिका घेवून त्यांनी मैदान बनविण्यासाठी लागणारे मुरूम, विट, माती, विटाचा भुगा असे साहित्य मिळवून घेतले व प्रत्यक्ष मैदानावर घाम गाळून त्यांनी दिवस रात्र करून मैदान तयार केले.. त्यानंतर २०१७ साली  तत्कालीन आमदार उदेसींग पाडवी यांच्या हस्ते या मैदानाचे लोकार्पण करून आमंत्रित संघांच्या हँडबॉल स्पर्धा आयोजित केल्या होत्या.

*रणछोड बाबा क्रीडा मंडळ नावाने स्पोर्ट्स क्लबची केली स्थापना*
        आजोबा स्व.रणछोड सुर्यवंशी यांचा नावाने रणछोड बाबा क्रीडा मंडळ या स्पोर्ट्स क्लबची स्थापना केली असून या माध्यमातून दरवर्षी बॅटमिंटन, हॉली बॉल या खेळासह अन्य विविध खेळाचा क्रीडा स्पर्धा दरवर्षी भरवल्या जातात. उन्हाळ्याच्या सुट्टीत खेळाडूसाठी विनामूल्य उन्हाळी क्रीडा शिबिराचे देखील आयोजन करण्यात येते.

*आफ्टर ४० क्रिकेट लीगची केली सुरुवात*
          ९० चे दशक गाजवणाऱ्या सर्व खेडाळूना पुन्हा एकदा मैदानावर आणण्यासाठी क्रिडा शिक्षक सुनिल सुरेश सुर्यवंशी यांनी पुढाकार घेतला, सोशल मीडियावर समूह तयार करून  खेडाळूना एकत्रित केले. स्वतः मैदानावर उतरून मैदान आखणे, खेळ पट्टी तयार करणे त्यावर पाणी मारणे, रोलिंग करण्याचे कामे हाती घेतले, ७० खेडाळूनी या स्पर्धेत सहभाग नोंदवला. वेळोवेळी बैठका घेवून स्पर्धेचे नियोजन करून ६ संघ तयार करून खुल्या टेनिस बॉल वर ही स्पर्धा खेळवली. तळोदा शहर व तालुक्यातील असंख्य खेळाडू घडविणारे दिवंगत क्रीडा मार्गदर्शक प्रा.पी.पी.भोगे सरांचा स्मृती प्रित्यर्थ या स्पर्धेला त्यांचे नाव देण्यात आले. याशिवाय ६ संघाना भारतीय क्रिकेट संघाचे ज्येष्ठ खेळाडूंचे नावे देण्यात आले.

सोमवार, १७ जुलै, २०२३

सर्व सामान्यांचा जिंदादील नेता ; अजयभय्या परदेशी

सुधाकर मराठे: 
 काही व्यक्ती ह्या कितीही उंच, मोठ्या पदावर गेल्या तरी त्यांच्या सर्वसामान्यांशी असलेली नात घट्ट जुळलेली असते. त्यांच्यातील असणारा सामान्यपणा ते कधीही सोडत नाही आणि त्यांचा मोठेपणा ते समजला जातो.त्यांचा या सर्वसामान्य वागणूकीतून ते सर्वांना आपले वाटतात. त्यातूनच त्यांची लोकप्रियता दिवसागणिक वाढत जाते.तळोदा शहरातील असच एक लोकप्रिय व्यक्तिमत्त्व म्हणजे लोकनियुक्त नगराध्यक्ष अजयभैय्या परदेशी. त्यांचा आज ......वा वाढदिवस.... अजयभैय्या यांच्या जन्म 17 जुलै 1973 मध्ये झाला. समाजकारण, राजकारण यांचा वारसा त्यांना घरातून लाभला. त्यांचे वडील स्व.छबुलाल ताराचंद परदेशी यांनी नेहमीच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळवून देण्यासाठी संघर्ष उभा केला होता. त्यांच्या आई प्रमिलाबाई परदेशी 1984 मध्ये नगरसेविका म्हणून निवडून आल्या होत्या. त्यानंतर त्यांचे वडील छबुलाल परदेशी हे सलग दोन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले.काही काळ त्यांनी तळोदा शहराचे उपनगराध्यक्षपदी देखील भूषवले आहे. आई-वडिलांकडून मिळालेला हा वारसा अजयभैय्या यांनी पुढे जपत आपल्या सामाजिक-राजकिय जीवनाची सुरुवात केली.


 1997 मध्ये अजयभैय्या यांच्या खांद्यावरभाजप युवा मोर्चा अध्यक्ष म्हणून भाजपने जबाबदारी सोपविली. कमी कालावधीत त्यांच्याकडे तळोदा शहरातील लोकप्रिय युवा नेता म्हणून बघितले जाऊ लागले.सर्वसामान्य जनतेशी जुळून असलेली परदेशी कुटुंबाची नाळ व लोकांचा विश्वास म्हणून अजयभैय्या 2012 पावेतो सलग तीन वेळा नगरसेवक म्हणून निवडून आले.2017 पर्यत नगरसेवक होते. 2009 भाजपा शहराध्यक्ष, 2012 साली विधानसभा क्षेत्र प्रमुख, 2015 भाजपा जिल्हा सरचिटणीस, अशी जिल्ह्याचे महत्वपूर्ण पदांची जबाबदारी त्यांनी पार पाडली आहे. 2006  सामाजिक उपक्रम राबवण्यासाठी श्रीराम सोशल ग्रुप स्थापन केला.श्रीराम सोशल ग्रुपच्या माध्यमातून शहरात विविध सामाजिक उपक्रम राबविले जातात.सार्वजनिक रामनवमी उत्सवाची सुरुवात शहरात ग्रुपच्या माध्यमातून केली गेली.याशिवाय शहरात शव वाहिनी,स्वर्ग रथ व रुग्णवाहिका ग्रुपच्या माध्यमातून चालविण्यात येते. कोरोणाच्या पहिल्या लाटेत श्रीराम सोशल ग्रुपने भरीव योगदान दिले गुजरातमधून स्थलांतरित मजुरांना त्यांच्या गावी पोचवणे, त्यांच्या जेवणाची,शहरातील निराधार व्यक्तीना जेवण व निवासाची सोय देखील श्रीराम सोशल ग्रुपच्या वतीने सातत्याने दीड-दोन महिने करण्यात आली.  2017 मध्ये नगरपालिका निवडणूक लोकनियुक्त नगराध्यक्ष पदाच्या उमेदवारीसाठी भाजपाकडून त्यांना उमेदवारी मिळाली. त्यांना उमेदवारी मिळाल्यापासूनच त्यांचा विजय निश्चित मानला जात होता.त्यांचा जनसंपर्क त्यांच्यातील असलेल्या कणखरपणा विकास धोरण सुस्वभावी या जोरावर ते लोकनियुक्त नगराध्यक्षपदी विराजमान झाले. लोकनियुक्त नगराध्यक्षपदी विराजमान झाल्यानंतर अजयभैय्या यांनी शहरात विकासकामांचा सपाटा सुरू केला.

             शहरात विकास कामे करत असताना सुरुवातीला त्यांना तत्कालीन आमदार उदेसिंग पाडवी व विद्यमान आमदार राजेश पाडवी यांची मोलाची साथ लाभली आहे.तळोदा पालिकेत सत्ता स्थापनेपासून स्वच्छ व सुंदर शहर या मोहिमेला प्राधान्य देत आहेत. शिवाय शहरातील पायाभूत समस्या सोडवण्यावर त्यांनी भर दिला असून शहरातील रस्ते पाणी गटारीच्या समस्या पळवून शहराचा कायापालट करण्यामध्ये मोलाची भूमिका निभावली आहे शहरात प्रवेश करणारा चारही रस्त्यांना प्रवेशद्वार काम नगराध्यक्ष अजय परदेशी यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आले आहे. त्यापैकी शहादा रस्त्यावरील प्रवेशद्वाराचे काम गेल्या वर्षभरापूर्वी पूर्णत्वास आले असून त्याचे लोकार्पण केले गेले आहे. 'आप संत श्री गुलाब महाराज' यांचे नाव या प्रवेशद्वाराला देण्यात आले आहे. तर हातोडा रस्त्यावरील प्रवेशद्वाराचे काम पूर्णत्वास आले असून आज त्याचे लोकार्पण केले जाणार आहे. 'छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार' असे या प्रवेशद्वाराचे नामकरण करण्यात आले आहे. या शिवाय नेत्रग-शेवाडी राष्ट्रीय महामार्गावर अक्कलकुवाकडून तळोदा शहरात प्रवेश करणाऱ्या रस्त्यावर देखील प्रवेशद्वाराचे काम हाती घेण्यात येणार आहे. 
सन 2021-22 मध्ये तळोदा नगरपालिका हद्दीतील चाचण्या रस्त्यावरील प्रवेशद्वाराचे बांधकाम, यमुना नगर मधील मोकळी जागा विकसित करणे,तळोदा शहरातील सर्वे नंबर 373 शहादा रोड कडील दक्षिण भागात दामोदर नगर अंतर्गत रस्त्यावर गटारीत बांधकाम करणे, भगवान सीताराम नगर मध्ये रस्ते पाईप गटार बांधकाम करणे,कालभैरव मंदिरापासून नगरपालिकाहद्द पावेतो गटार बांधकाम करणे, कॉलेज रोड डांबरीकरण दुभाजक व फुटपाथ, पाईप गटार बांधणे, विद्यानगरी अंतर्गत रस्ते व काँक्रिटीकरण गटार तयार करणे, आमराईफळी जवळ खर्डी नदीवर पूल बांधकाम करणे,आंबेडकर चौक ते 150 मीटर लांबी पावेतो गटारीवर स्लॅब टाकणे ही कामे सुरू आहेत.                                                                                                                                                            
 पायाभूत सुविधांच्या बाबतीत शहराचा कायापालट झाला तळोदा शहरात विकसनशील शहर म्हणून नावारूपाला आले आहे. नगराध्यक्ष अजय भैय्या परदेसी यांच्या नेतृत्वात तळोदा शहरातील बिरसा मुंडा चौकापासून तर थेट प्रवेशद्वारापर्यंत रस्ता रुंदीकरण करण्यात आले आहे व गटारी वर स्लॅब टाकण्यात आहे.पथ मार्ग तयार केले गेले आहे. शहादा रस्त्यावर तीन छोट्या नाल्यांवर पुलाचे बांधकाम करण्यात आले आहे.मीरा कॉलनीत व प्रतापनगर येथे एक कोटी चार लाखांचा लॉन्च उभारला गेला असून अद्ययावत गार्डन याठिकाणी तयार झाले आहे. विमल नगर येथे ज्येष्ठ महिला व पुरुषांसाठी हक्काची खोली तसेच विरंगुळ्यासाठी उद्यान निर्मिती करण्यात आली आहे. देशपांडे फोटो स्टुडिओ पासून ते बिरसा मुंडा चौकापर्यंत नवीन नवीन रस्त्यांची कामे पालिकेच्यावतीने अजय भैय्या परदेशी यांच्या संकल्पनेतून करण्यात आलेले आहे. बिरसा मुंडा चौक ते चिनोदा चौफुली पर्यत रुंदीकरण व दुभाजकाचे काम केले गेले आहे.हातोडा रस्ता पासून न्यायालयापर्यंत व रुंदीकरण देखील करण्यात आलेले आहे.  महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी कार्यालय मागील रस्तापासून मरीमाता मंदिरामार्गे हातोडा रस्त्यापर्यत रस्त्याचे रुंदीकरण व गटारी वर स्लॅब टाकण्यात आलेला आहे. विमल नगर, हरकलाल नगर, शिवरामनगर, गुरुकृपा कॉलनी, विक्रम नगर, बडा दादा नगर,खटाई माता मंदिर परिसरातील रस्ते डांबरीकरण करण्यात आले आहेत व गटारी देखील तयार करण्यात आलेली आहे. याशिवाय शहरातील नागरिकांच्या सुदृढ आरोग्यासाठी ठिकाणी ओपन जिम बसवण्यात आले आहेत त्यासाठी सुरुवातीला नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी स्वखर्चातून शहरात ओपन जिम बसवली होती.शहादा रस्त्यावर मॉर्निंग व इवेनिंग वॉकसाठी येणार्‍या नागरिकांना भक्तीमय आल्हाददायक वातावरण लाभावे यासाठी रस्त्यावर बसवण्यात आलेल्या सीट लॅम्प वर साऊंड सिस्टिम देखील अजय भैय्या परदेशी यांच्या संकल्पनेतून बसवण्यात आली आहे. याशिवाय एफ एस टी पी प्रकल्प पूर्ण कार्यान्वित आहे. कचऱ्यापासून खत निर्मिती मंजुरी प्रस्तावित असून अजयभैय्या परदेशी यांच्या पुढाकाराने पालिका राज्यात 49 क्रमांकावर आली असून पहिल्या 50 शहरात तळोदा शहराचा समावेश झालेला आहे. माझी वसुंधरा योजने अंतर्गत नंदुरबार जिल्ह्यात तळोदा शहराने दुसरा क्रमांक पटकावला आहे. या योजनेत 1250 वृक्ष लागवड करण्यात आली आहे। याशिवाय इलेक्ट्रिक व्हेकल चार्गिंग पॉइंत शहरात ठिकाणी बसवण्यात येणार आहेत.शहरात स्वच्छतेसाठी सहा घंटागाडी, व्याक्युम क्लिनर,शववाहिनी, रुग्णवाहिका पालिकेच्या माध्यमातून अजय भैया यांनी  कार्यान्वित करण्यात केली आहे. कोरोना काळात सफाई कामगारांना नगरपालिकेच्या वतीने अजयभैय्या यांच्या संकल्पनेतून अन्नधान्य वाटप करण्यात आले. नवीन वसाहतीत 2018-19 ला घरपट्टी लावलेली असताना लोकांच्या मागणीनुसार पहिल्या अपिलात दहा टक्के तर नंतरच्या अपिलात 15 टक्के अशी एकूण 25 टक्‍के घरपट्टी कमी करण्यात नगराध्यक्ष अजय भैय्या परदेशी यांची महत्त्वपूर्ण भूमिका राहिली.

           राष्ट्रीय नागरिक उपजीविका अभियान अंतर्गत महिला बचत गटांना आठ लाखापर्यंत कर्ज उपलब्ध करून देण्यात आले आहे. 65 फेरीवाल्यांना पंतप्रधानपद विक्रेता निधीमधून प्रत्येकी दहा हजार रुपये कर्जाचे वाटप केले गेले आहे. प्रधानमंत्री आत्मनिर्भर निधीतून 65 लाभार्थ्यांना पंधराशे रुपये अनुदान देण्यात आले आहे. स्वयंरोजगार पत्र विक्रेता सर्वेक्षण अंतर्गत 310 पत्र विक्रेत्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात येणार आहे.विविध प्रशिक्षण योजना प्रस्तावित केलेल्या आहेत. प्रधानमंत्री आवास योजनेअंतर्गत 300 घरकुल मंजूर असून 185 शासनाकडे मंजुरीसाठी पाठवले आहेत रामकडे 167 घरकुल मंजुरीसाठी शासनाकडे पाठवलेले आहेत 280 लक्ष घरकुल अंतर्गत लाभार्थ्यांना वितरित केले आहे पुढील अनुदान 450 लाखाची मागणी केलेली आहे.
          या सर्व कामांमध्ये तळोदा शहरातील रुपये पूर्णपणे पालटले असून नगराध्यक्षांनी जर ठरवले तर शहराच्या कसा विकास होऊ शकतो याचे उदाहरण अजय भैय्या परदेशी यांनी आपल्या कार्यशैलीने सर्वांपुढे पुढे ठेवले आहे. सामान्यांच्या नेता म्हणून अजयभैय्या परदेशी यांची ओळख आहे. शहरातील कोणत्याही नागरिकाला कोणत्याही प्रश्नावर जर काही समस्या असेल तर ते थेट अजयभैय्या परदेसी यांना फोन करतात व आपली समस्या त्यांच्या पुढे मांडतात. आपला हक्काचा माणूस म्हणून अजयभैय्या यांनी आपली ओळख आहे.भैय्या देखिल ती ओळख जगण्याच्या सतत प्रयत्न करतात. व्यक्ती किती मोठा आहे, किती सामान्य आहे याला भैय्या महत्त्व देत नसून 'प्रत्येक व्यक्ती हा माझा आहे व मी त्याच्या प्रती देणे लागतो', ही अजयभैय्या यांची कामाची शैली आहे. यातून त्यांनी शहरात जिवाभावाच्या मित्रांचा गोतावळा व मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. राजकीय मतभेद कितीही असले तरी अजय भैया या नावावर शहरातील सर्व नेते,लोकप्रतिनिधी विकासासाठी एकत्र येतात हा आजवरचा अनुभव आहे. एक दिलदार व्यक्तिमत्व म्हणून अजयभैय्या परदेशी यांच्याकडे बघितले जाते.अशा या दिलदार व्यक्तिमत्वाचा आज वाढदिवस त्यानिमित्त त्यांना उदंड आयुष्याच्या मनःपूर्वक शुभेच्छा......