Breking News

शनिवार, ८ मार्च, २०२५

साधेपणात लपलेला मोठा अर्थ: प्रशांत पाटील

सुधाकर मराठे
 
       जीवनात कधीही बडेजाव न मिरवता, त्यांनी एक साधा पण प्रेरणादायी प्रवास केला आहे. निर्व्यसनी, प्रामाणिक आणि कष्टाळू स्वभावामुळे त्यांनी आपल्या मार्गातील संकटांवर मात केली आहे. गरिबीतून उभे राहून त्यांनी जिद्दीच्या बळावर आपले स्थान निर्माण केले आहे. त्यांच्या सहकार्यशील वृत्तीमुळे, ते नेहमीच समाजातील सर्वांशी सुसंवाद साधून, सर्वांना बरोबर घेऊन चालतात. प्रशांत पाटील हे एक समर्पित, प्रामाणिक आणि माणुसकी असलेले व्यक्तिमत्त्व आहे, ज्यांनी साधेपणातच महानतेचा खरा अर्थ शोधला आहे. नेहमी सर्वांना सोबत घेऊन चालणारे व्यक्तिमत्त्व आहे. त्यांच्या साधेपणातून, प्रेमळपणातून आणि सहकार्याच्या वृत्तीमुळे ते आजही लोकांच्या हृदयात स्थान टिकवून आहेत.         
         प्रशांत जीवन पाटील यांचा जन्म ८ मार्च १९८७ रोजी तळोदा, जि. नंदूरबार येथे झाला. एक गरीब कुटुंबात जन्मलेले प्रशांत यांचे जीवन अनेक आव्हानांनी भरलेले आहे. त्याचे वडील पान टपरीचा व्यवसाय करतात, ज्यामुळे घराचा आर्थिक गाडा चालवणे सोपे जात नाही. तथापि, त्यांच्या कुटुंबाने सदैव लढाईचे आत्मबल जपले आहे.

             प्रशांतच्या आजोबांचे नाव नारायण पाटील, जे हिंदू विचारधारेचे आर.एस.एस.चे कार्यकर्ते होते. त्यांनी कालांतराने तालुक्यात भाजप जिवंत ठेवण्यासाठी एकत्रित लढा दिला. त्यांच्या प्रेरणेमुळे प्रशांतने जीवन प्रवास सुरू केला, ज्यात सामाजिक आणि राजकीय परिवर्तनाचा समावेश होता.  
        शिक्षणाच्या बाबतीत प्रशांतची खूप गोडी नसली, तरी क्रिकेट खेळाची त्याला अपार आवड आहे. क्रिकेट खेळण्यामुळे त्याला मित्रपरिवार जोडण्यात विशेष सामर्थ्य मिळाले. तो नेहमी आपल्या मित्रांना वेळ देतो, त्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो. एक साधा, भोळा आणि सर्वांना घेऊन चालणारा, प्रशांत हा सर्वांसाठी एक दिलदार आणि सदाबहार मित्र आहे.प्रशांतला प्रेमाने लोट्या म्हणून ओळखले जाते. हे नाव हिंदी सिनेमातील एखाद्या डाकूसारखे वाटत असले तरी, त्याचे व्यक्तिमत्त्व त्याच्या नावाच्या विपरीत आहे. तो एक साधा, भोळा आणि सर्वांसाठी समर्पित मित्र आहे. 
          कुटुंबाची हालाखीची परिस्थिती त्याला चांगली माहिती आहे, त्यामुळे त्याने त्यावर मात करण्यासाठी प्रयत्न केले. पान टपरीवर उदरनिर्वाह भागवणे कठीण असल्याने, प्रशांतने खाजगी वाहनांवर चालक (ड्रायव्हर) म्हणून काम केलें. नाशिक येथे कुटुंबासह जाऊन भाजीपाला विक्री व्यवसाय सुरू केला. या धाडसी निर्णयात त्याला त्याची पत्नी करिष्मा पाटील याचीही साथ लाभली. त्यांच्या सहकार्यातून त्यांनी आपल्या कुटुंबाचा आर्थिक आधार मजबूत केला आहे. त्यांना एक मुलगा आणि एक मुलगी असून, हे त्यांच्या कुटुंबाच्या प्रेमाचे प्रतीक आहे.. 
           त्यांचे पहिले तत्त्व म्हणजे “शब्द दिला म्हणजे पाळला पाहिजे.” हे एक नैतिक मूल्य आहे जे प्रशांतच्या कुटुंबाने नेहमी जपले आहे. त्यांनी दिलेल्या वचनांची महत्त्वाकांक्षा जपणे, आणि तिला पूर्ण करणे याला त्यांनी आपल्या जीवनाचा आधार बनवला आहे.
             कुणाकडून पैसा घेतल्यास, तो परत करणे हे त्यांच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहे. हे व्यवहारिक नैतिकतेचे एक ठोस उदाहरण आहे. कष्टाची कदर करणे आणि कोणाचे हरामाचे खाणे हे कुटुंबात स्वीकारले जात नाही. त्यांनी त्यांच्या कष्टाचे मूल्य नेहमी जपले आहे, ज्यामुळे त्यांच्या जीवनात एक विशिष्ट स्थिरता आणि शांती आहे.
         वडिलोपार्जित जागेवर घर बांधण्यासाठी प्रशांत आणि त्यांचे कुटुंब सक्रियपणे धडपड करत आहेत. हे त्यांच्या कार्यक्षमतेचे आणि त्यांच्या कुटुंबाच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी घेतलेल्या मेहनतीचे प्रतीक आहे. प्रशांतचा या प्रक्रियेत सक्रिय सहभाग कुटुंबाच्या एकतेचे आणि एकत्रितपणे कार्य करण्याच्या क्षमतेचे दाखले देतो.

बुधवार, ५ मार्च, २०२५

*डॉ. महेंद्र चव्हाण – एक दिलदार माणूस*

जीवनात काही माणसं अशी भेटतात की त्यांचं मन इतकं मोठं असतं की ते पैशांपेक्षा नात्यांना जास्त महत्त्व देतात. अशाच एका सुसंस्कृत, दिलदार आणि माणुसकीने ओथंबलेल्या व्यक्तिमत्त्वाचा अनुभव मला डॉ. महेंद्र चव्हाण यांच्या रूपाने आला.

          जानेवारी 2021 मध्ये मी आणि माझे गुरू मित्र कालूभाऊ त्यांच्या नवीन इमारतीच्या स्लॅबवर बसून गप्पा मारत होतो. त्यांच्याच प्लॉटच्या मागच्या बाजूला डॉ. महेंद्र चव्हाण यांचा एक प्लॉट होता. सहज बोलता-बोलता प्लॉट विक्रीसंदर्भात चर्चा सुरू झाली.

       "तुम्ही हा प्लॉट विकणार आहात का?" भाऊने सहज विचारलं. "मला दिला नाही तरी चालेल, पण विकणार असाल तर चांगल्या व्यक्तीला द्या." त्यांनी त्यांची भावना बोलून दाखवली.

       डॉ. महेंद्र चव्हाण हे शांतपणे हसले आणि म्हणाले, "कालूसर, हा प्लॉट मी सुधाकरला द्यायला इच्छुक आहे. तुम्ही दोघे चांगले मित्र आहात आणि कायम सोबत राहणार. हाच माझा उद्देश आहे. एक प्लॉट गौरवला देऊ आणि एक सुधाकरला."

        त्या एका वाक्याने त्यांनी माझ्यासाठी जणू अनमोल भेट देण्याचा निर्णय घेतला होता.

         हा निर्णय झाला आणि आठवड्याभरातच मी आणि गौरवभाऊ वाणी प्रत्येकी ५०,००० रुपये घेऊन डॉ. चव्हाण यांच्याकडे गेलो.

       पण आश्चर्य म्हणजे, त्यांनी त्या रकमेतून फक्त ५०० रुपये घेतले आणि प्लॉटची फाईल आमच्या हातात दिली!
"लवकर नोंदणी करून घ्या, बाकी रक्कम मला गरज लागेल तेव्हा मागेन," असे ते हसत म्हणाले.

       मी त्यांना सांगितले, "रक्कम हातात आली तसे तसे मी परत करत जाईन."तेवढ्यावरच समाधान मानत त्यांनी प्लॉट माझ्या नावावर करण्याचा निर्णय घेतला.

          ठरल्याप्रमाणे, वेळोवेळी मी रक्कम पूर्ण केली, पण एक अर्थी हा प्लॉट मला बक्षीस म्हणूनच मिळाला!

       डॉ. महेंद्र चव्हाण यांच्या सारख्या माणसांमुळेच या जगात अजूनही विश्वास, नाती आणि माणुसकी जिवंत आहे. त्यांनी नफा- तोट्याच्या गणितात न अडकता फक्त विश्वास आणि मैत्रीच्या नात्यावर मला हा प्लॉट दिला.

       आजही मी हा प्रसंग आठवतो, तेव्हा त्यांची मोठी मनाची वृत्ती आणि माणुसकीने भारलेले व्यक्तिमत्त्व यामुळे मन अभिमानाने भरून येतं. अशा व्यक्तीमुळेच समाज सुंदर आणि सुसंस्कृत बनतो.. 

            डॉ.महेंद्र चव्हाण यांच्यासारख्या माणसांसाठी एकच शब्द – सलाम!

*आभारी कालू भाऊ आणि डॉ.चव्हाण दादा...*

शुक्रवार, २१ फेब्रुवारी, २०२५

सागर पाटील: परिस्थितीशी दोन हात करणारा एक कर्तव्यदक्ष योद्धा

दि.21 फेब्रुवारी 2025

        सागर अमृत पाटील यांचे जीवन म्हणजे एक संघर्षाची आणि कर्तृत्वाची गाथा आहे. लहानपणीच त्यांच्या वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या कुटुंबावर मोठा आघात झाला. कुटुंबाच्या आर्थिक आणि मानसिक आधाराचा अभाव असतानाही सागर यांनी आपल्या आई आणि मोठ्या भावासोबत खांद्याला खांदा लावून काम केले. त्यांची आई आणि मोठा भाऊ त्यांना आधार देत राहिले, परंतु परिस्थितीच्या आव्हानांमुळे सागर यांच्यावर कुटुंबाच्या आधारस्तंभाचे काम करणे आले.
          सागर यास लहानपणापासूनच काहीतरी विशेष करून दाखवायची जिद्द होती, मात्र कुटुंबाच्या गरजा आणि जबाबदाऱ्या पूर्ण करण्याच्या दडपणामुळे त्यांनी व्यवसायात लक्ष केंद्रित केले. कुटुंबाला उभे करण्यासाठी त्यांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. त्यांच्या मामा यांनीही वेळोवेळी आर्थिक आणि मानसिक आधार दिला. सागर यास मामा यांच्या पाठिंब्याने आत्मविश्वास मिळाला आणि ते आपला व्यवसाय उभा करू शकले.
     शहरातील आदिवासी भागात कुटुंबीयांनी एक छोटंसं नाश्त्याचं दुकान सुरू केलं. साध्या गोष्टींपासून सुरुवात केली, परंतु त्यांच्या हाताला असलेली चव आणि मेहनत या गोष्टींमुळे ग्राहकांची संख्या वाढू लागली. त्यांच्या दुकानात दररोज गर्दी असायची. आदिवासी भागात अशा प्रकारचा व्यवसाय मोठ्या मेहनतीचा असतो, पण त्यांनी ही आव्हानं आनंदाने स्वीकारली. त्यांच्या दुकानात मिळणाऱ्या नाश्त्याची चव इतकी विशेष होती की लोकांनी त्याला मनापासून स्वीकारलं. हे दुकानच त्यांच्या कुटुंबाच्या गरजा पूर्ण करण्याचं मुख्य साधन बनलं.   
    सागर यास मित्रपरिवाराचा आणि नातेवाईकांचा मोठा गोतावळा आहे. तो नेहमीच आपल्या मित्रांना आणि कुटुंबीयांना सोबत घेऊन चालण्याचा प्रयत्न करतो. त्याच्या जीवनात आणखी एक मोठा आघात तेव्हा आला, जेव्हा त्यांच्या मोठ्या बहिणीचा विवाह सुरत येथे झाला तिच्या आयुष्यात अनेक अडचणी आल्या. तिच्या मुलाला मोठ्या मानसिक आणि आर्थिक संकटाला सामोरे जावे लागले. अशा परिस्थितीत सागर यांनी बहिणीला आणि तिच्या मुलीना आधार देण्याची जबाबदारी स्वतःवर घेतली. त्यांनी बहिणीला आर्थिक आणि मानसिक आधार दिला.
           त्यांच्या या कर्तृत्वामुळे आणि कुटुंबासाठी त्यांनी घेतलेल्या जबाबदारीमुळे सागर यास कुटुंबात विशेष मान आहे. त्यांनी आपल्या आई-वडिलांनी दिलेल्या संस्कारांना जपले आणि संपूर्ण कुटुंबासाठी एक आदर्श ठरले. 

        त्याच्या विवाह शिरपूर तालुक्यातील सोनल हिच्याशी झाला असून त्या दोघांना एक ओम नावाचे एक गोंडस बाळ आहे.

शनिवार, १८ जानेवारी, २०२५

पंकज राणे: एक साधा पण प्रभावी समाजसेवक

१८ जानेवारी २०२५

        पंकज भालचंद्र राणे हे एक प्रगल्भ आणि प्रेरणादायी व्यक्तिमत्व आहेत. १८ जानेवारी १९७६ रोजी जन्मलेले पंकज राणे, आपल्या कार्यक्षमतेने आणि सेवाभावाने समाजात एक अनोखी ओळख निर्माण केली आहे. त्यांचा जीवनप्रवास विविध क्षेत्रांतिल योगदानासाठी वळण घेतो, ज्यामध्ये राजकारण, समाजकार्य आणि शैक्षणिक क्षेत्रातील कारकीर्द सामील आहे.

 पंकज राणे यांनी शालेय शिक्षण शेठ के. डी. हायस्कूल आणि तळोदा महाविद्यालयात घेतले. पुढे त्यांनी बी.एड. पदवी प्राप्त केली आणि शिक्षणक्षेत्रात कळकळीने काम करण्यास सुरुवात केली. त्यांच्या कार्याची एक विशेषता म्हणजे त्यांनी नेहमीच गोरगरीबांच्या मदतीसाठी पुढाकार घेतला. रेशन व्यवसायाच्या माध्यमातून त्यांनी अनेक गरिबांना मोफत रेशन दिले, आणि समाजाच्या विविध स्तरांशी सहज स्नेहपूर्ण नाते निर्माण केले.

२००० मध्ये बँक क्षेत्रात सेवा सुरू केल्यावर पंकज राणे यांनी ११ वर्षे प्रामाणिकपणे काम केले. त्यानंतर, त्यांनी शिक्षकी पेशाला अवलंबले, परंतु संस्थेतील वादामुळे त्यांना न्यायालयाचे दरवाजे ठोठवावे लागले. समाजकार्याचा ध्यास घेत त्यांनी राजकारणात पदार्पण केले. २०१५ मध्ये त्यांनी नगरसेवक म्हणून निवडणूक लढवली आणि विजयी झाले. त्यांच्या कार्यकाळात अनेक महत्त्वाचे प्रकल्प, जसे की रस्ते बांधकाम, पाणीपुरवठा, शौचालय योजना, खर्डी नदी पूल आणि कंजरवाडा परिसरातील पाईपलाइन समस्येवर उपाय योजना यांचा समावेश होता.

२०१७ मध्ये पुन्हा निवडणूक लढवली, परंतु त्या वेळी प्रभाग बदलल्यामुळे आणि मोदी लाटेच्या प्रभावामुळे त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. तरीदेखील, पंकज राणे यांनी समाजाची नाळ कधीही तुटू दिली नाही आणि सामाजिक योगदानाच्या माध्यमातून काम सुरू ठेवले.

पंकज राणे हे एक आदर्श व्यक्तिमत्व आहेत, जे नेहमीच समाजाच्या भल्यासाठी कार्यरत राहतात. त्यांच्या कामामुळे तरुण पीढीला समाजसेवेचा मार्ग दाखवला आहे. शाळेत आणि समाजात त्यांनी बनवलेल्या संबंधांचे उदाहरण आहे, की समाजाच्या सर्व स्तरांत त्यांनी एक सकारात्मक बदल घडवला आहे.

सोमवार, ६ जानेवारी, २०२५

दीपमाला मॅडम: विद्यार्थ्यांच्या आयुष्याला आकार देणाऱ्या शिक्षिका

06 जानेवारी 2024
        शिक्षक हा विद्यार्थ्यांच्या जीवनाचा महत्त्वाचा आधारस्तंभ असतो. शिक्षण फक्त पुस्तकी ज्ञान देण्यापुरतं मर्यादित नसून त्यामध्ये विद्यार्थ्यांच्या भावनांना समजून घेण्याची, त्यांचं आत्मविश्वास निर्माण करण्याची आणि त्यांना योग्य दिशादर्शन करण्याची जबाबदारी शिक्षकांवर असते. याचाच एक सुंदर उदाहरण म्हणजे नंदुरबार येथील के.आर. पब्लिक स्कूलच्या दीपमाला वळवी मॅडम.

        आमचा यथार्थ जेव्हा पहिलीत प्रवेश घेतला तेव्हा त्याचं वय अवघं ७ वर्षं होतं. नवीन शाळा, नवीन वातावरण यामुळे तो खूप घाबरला होता. दररोज 25 किमीचा प्रवास, नवीन मित्र, कुटुंबापासून लांब राहवे लागत असल्याने वर्गात रडणं, शाळेत न जाण्यासाठी हट्ट करणं यामुळे आम्ही पालक म्हणून चिंतेत पडलो होतो. त्याला समजावण्याचा आम्ही प्रयत्न केला पण काही फरक पडत नव्हता. त्या वेळी दीपमाला मॅडमनी या परिस्थितीला अत्यंत संयमाने आणि ममतेने हाताळलं.

            त्यांनी यथार्थशी संवाद वाढवला, त्याच्या मनातील भीती समजून घेतली आणि त्याला आधार दिला. त्यांनी केवळ अध्यापनाचं काम केलं नाही तर त्याच्याशी मैत्री केली. एवढंच नाही, तर त्याचा शारीरिक व मानसिक थकवा दूर करण्यासाठी त्याच्या हातपाय दाबून त्याला दिलासा दिला. हळूहळू त्याचं रडणं थांबलं आणि त्याचा आत्मविश्वास वाढला. दीपमाला मॅडमच्या या संवेदनशीलतेने आणि मायेने यथार्थच्या जीवनात सकारात्मक बदल घडवला.

        शाळेत शिक्षक खूप असतात, पण दीपमाला मॅडमनी यथार्थशी पर्सनल टच निर्माण केला. त्यांनी फक्त त्याच्या अडचणी जाणून घेतल्या नाहीत, तर त्या सोडवण्यासाठी पुढाकार घेतला. विद्यार्थ्यांच्या भावनिक गरजा समजून घेणाऱ्या आणि त्यांना योग्य मार्गदर्शन देणाऱ्या दीपमाला मॅडम यांचं योगदान अतुलनीय आहे.

        आपल्या वाढदिवशी आम्ही आपले मनःपूर्वक आभार मानतो आणि वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा देतो. आपले पुढील आयुष्य आनंदाने, आरोग्याने आणि विद्यार्थ्यांच्या प्रेमाने भरलेलं असावं, आमच्या यथार्थ बाबतचे प्रेम असेच तेवत राहावे हीच प्रार्थना!

              दीपमाला मॅडम, तुमच्या शिक्षण क्षेत्रातील या अमूल्य योगदानाबद्दल आम्हा सर्व पालकांची मनःपूर्वक कृतज्ञता आहे...

रविवार, ८ डिसेंबर, २०२४

दिपक परदेशी: चप्पल हरवलेला कार्यकर्ता

०५ डिसेंबर २०२४
तळोदा : दिपक परदेशी नाव ऐकले की डोळ्यांसमोर येतो एक साधा-सुधा माणूस, ज्याच्या पायांना चप्पलांनी कधीच स्पर्श केलेला नाही. चप्पलविरहित जीवनशैली त्याने एवढ्या अभिमानाने स्वीकारली आहे की, गावातील चप्पल विक्रेत्यांनी त्याच्यावर बहिष्कार टाकला आहे.

फॅशन आयकॉन: हाप चड्डी आणि टी-शर्ट

सुटला तर बुटाचा एक तरी फोटो शोधायला लागतो, पण दिपकच्या बाबतीत असं नाही. हाप चड्डी आणि टी-शर्ट हाच त्याचा ओळख पटवणारा युनिफॉर्म. गावात कुणाला फॅशनच्या टिप्स हव्या असतील, तर तो पहिल्यांदा दिपककडे जातो. कारण फॅशनमध्ये 'राहणीला आराम महत्त्वाचा' हा सिद्धांत त्याने जगाला शिकवला आहे.

भाजपासाठी ‘सुपरहिरो’

दिपक परदेशी हे नाव म्हणजे भाजपाचा ‘लोकल सुपरहिरो.’ त्याला झेंडा दिला की तो गावभर असा फिरतो, जणू काही कारगिल युद्धातील सर्वात उत्साही सैनिकाचा सन्मान मिळाला आहे. विरोधकांची मिटिंग असो किंवा मोर्चा, दिपक नेहमी तयार असतो. "कुणाशीही भिडू, पण झेंडा सोडू नको," हा त्याचा बाणा!

इस्की टोपी उसके सर

दिपकची खासियत म्हणजे ‘इस्की टोपी उसके सर.’ गावातल्या पंधरापैकी पंचवीस प्रकरणं तो अशा प्रकारे हाताळतो की, लोकं शेवटी त्यालाच पंच मानून प्रकरण मिटवतात. गावातल्या लोकांनी ‘टोपी मॅनेजमेंट’ हा विषय शिकायचा असेल, तर दिपकला गुरु मानायला सुरुवात केली आहे.

चप्पल आणि दिपक यांचं वाकडं नातं

गावकऱ्यांनी विचारलं, "दिपक, तू चप्पल का घालत नाहीस?" तर उत्तर आलं, "मी चप्पल घातली तर लोकं माझं जमीनवरचं नातं विसरतील!" त्याचा साधेपणा इतका टोकाचा आहे की चप्पल विक्रेत्यांनी त्याला 'आदर्श ग्राहक' म्हणून सन्मानित केलंय - फक्त कधीही काहीही खरेदी न केल्याबद्दल.

दिपकचा जनसंपर्क: डोळा आणि कटाक्ष

दिपकचा जनसंपर्क इतका तगडा आहे की, त्याच्या एका कटाक्षाने लोकं कामाला लागतात. गावातील पोहेवाल्या काकांकडे तो चहा मागतो, तर पोहे, चहा, आणि एका प्लेट उपमा अशी ऑर्डर पूर्ण होऊनच राहते. राजकारणापासून क्रिकेटपर्यंत त्याचा अभ्यास आहे.

दिपक परदेशी: गावाचं कमेडी आयकॉन
दिपकच्या साधेपणात एक मोठं विनोदाचं गाठोडं आहे. गावात कुणाचंही वादळं येवो, दिपक तिथे हजर असतो, मग वाद मिटवायला किंवा वाद वाढवायला. लोक त्याला ‘चप्पलविरहित स्वराज्याचा ब्रँड अॅम्बेसेडर’ म्हणतात. त्याचा प्रत्येक संवाद हा विनोदाचं पीक असतो.

दिपक परदेशी: चप्पलविरहित, साधा, पण गावाचं हृदय जिंकणारा कार्यकर्ता.

वरील लेख हा केवळ विरंगुळा म्हणून लिहला आहे. 

रविवार, १ डिसेंबर, २०२४

"नात्यांचे महत्त्व उलगडणाऱ्या संगीता काकूंना अखेरचा निरोप"

"आपुलकीचा अविरत प्रवास: संगीता काकूंना आदरांजली"

०१ डिसेंबर २०२४
            मध्य प्रदेशातील जाहूर गावातील संगीता मराठे यांचे जीवन एक आदर्श कुटुंबवत्सल स्त्री म्हणून ओळखले जाते. त्यांचा विवाह पारोळा तालुक्यातील देवगाव येथील गणेश मराठे यांच्यासोबत झाला. हा संसार एका सुखसमृद्ध आणि सुसंस्कृत कुटुंबात सुरू झाला. स्व. विरभान मराठे मास्टर यांच्या मार्गदर्शनाखाली या कुटुंबाने परंपरेचा वारसा जोपासला, ज्यामध्ये सुसंस्कृतता, प्रेम, आणि एकोप्याचा संगम दिसून येतो. संगीता मराठे यांचा स्वभाव हा अतिशय प्रेमळ, नम्र, आणि मनमिळाऊ होता. त्या प्रत्येकाला आपलेसे करणाऱ्या होत्या. परिस्थिती कितीही कठीण असो, त्यांनी कधीही धैर्य सोडले नाही. त्या एक आदर्श गृहिणी, प्रेमळ आई, आणि कुटुंबाचा आधार होत्या.

         त्यांचा वैवाहिक जीवनाची सुरुवात ही अत्यंत संपन्न आणि समाधानकारक परिस्थितीत झाली. त्या कुटुंबाची मुळं मजबूत होती, आणि त्यामध्ये सौहार्द, समजूतदारपणा, आणि नात्यांचा आदर यांचा सुंदर मिलाफ होता. संगीता यांनी आपल्या स्वभावाने आणि कौशल्याने या कुटुंबाला अधिक मजबुती दिली.

          संगीता आणि गणेश मराठे यांच्या संसारात दोन मुलांच्या आगमनाने कुटुंबाचा विस्तार झाला. मोठा मुलगा अमोल आणि नंतर पंकज उर्फ काल्याच्या जन्माने त्यांच्या कुटुंबाचा आनंद द्विगुणित झाला. त्यांनी मुलांच्या संगोपनासाठी आणि शिक्षणासाठी अथक परिश्रम घेतले. पुढे, दोघा मुलांची लग्न थाटामाटात झाली. या नात्यांमध्ये त्यांनी सासू आणि आजी म्हणूनही आपले स्थान कायम राखले. नातवंडांनी त्यांच्या जीवनात आणखी गोडवा भरला.

           परिस्थिती कायम एकसारखी राहत नाही. गणेश आणि संगीता यांच्या आयुष्यातही आर्थिक अडचणींनी प्रवेश केला. कुटुंबाने या कठीण काळाचा एकत्रितपणे सामना केला. संगीता यांनी अशा काळातही कधीही आपल्या जबाबदाऱ्या टाळल्या नाहीत. त्याचबरोबर, त्यांच्या प्रकृतीने काही आव्हाने उभी केली. दीर्घकालीन आजारामुळे त्यांना उपचारांसाठी विविध ठिकाणी जावे लागले. गणेश मराठे यांनी त्यांच्या आरोग्यासाठी शक्य ते सर्व प्रयत्न केले. यामुळे काही काळासाठी त्यांच्या प्रकृतीत सुधारणा झाली, परंतु नंतरचा काळ अधिक कठीण ठरला.

        1 डिसेंबर 2024 रोजी संगीता काकू यांनी जगाचा निरोप घेतला. त्यांच्या अचानक जाण्याने कुटुंबीयांसाठी हा धक्का होता. त्यांनी मागे दोन मुले, सुना, नातवंडे, आणि आठवणींचा एक मोठा ठेवा सोडला. संगीता मराठे यांच्या जाण्याने एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे. त्यांची गोड स्मृती आणि दिलासा देणारा स्वभाव कायमच त्यांच्या परिवारासाठी प्रेरणादायी ठरेल.

           काकूंच्या निधनाने कुटुंबासाठी एक मोठी हानी झाली आहे. त्या फक्त कुटुंबातील सदस्य नव्हत्या, तर सर्वांच्या आधारस्तंभ होत्या. त्यांच्या मृदू स्वभावाने, सहकार्याने आणि आपुलकीने त्यांनी प्रत्येक नात्याला अधिक मजबूत केले होते.
            त्यांचा एक प्रसंग आयुष्यभर स्मरणात राहील तो म्हणजे भडगाव येथील आमचे मोठे काका गोविंद मराठे यांच्या निधनानंतर, आमच्या वडिलांची प्रकृती बिघडली होती त्यांना तब्येतीची बातमी कळताच, काकूंची तळमळ, प्रेम, आणि आपुलकी दिसून आली. क्षणाचाही विचार न करता त्या व पुष्पा काकू तळोदा येथे आमच्या सोबत पोहोचल्या. त्यांच्या दिवसभराच्या सहवासाने आणि प्रेमळ स्वभावाने संपूर्ण कुटुंबाला आधार मिळाला. हा दिवस फक्त त्यांच्या सहवेदनेचा नव्हे, तर त्यांच्या नात्यांप्रती असलेल्या प्रामाणिकतेचा ठेवा ठरला.

      त्यांनी आमच्याबद्दल उद्गारलेले शब्द " सुर्यवंशी वाड्यात तुम्ही दोघे भावासारखे भाऊ नाहीत, पैसा कमावण्यापेक्षा खर्च करण्याची धमक तुमच्यात आहे," तुमची सहर कुणालाही येणार नाही. या त्यांच्या शब्दांतून त्यांच्या निस्वार्थ स्वभावाचा प्रत्यय येतो. या वाक्याने त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची सखोलता स्पष्ट केली आहे.

        काकू या प्रत्येकासाठी आपुलकीने वागणाऱ्या होत्या. कुटुंबातील प्रत्येक समस्या आणि संकटाच्या वेळी त्या धैर्याने उभ्या राहत. त्यांच्या जाण्याने केवळ भावनिकच नाही, तर कुटुंबाला आधार देणारा महत्त्वाचा स्तंभ हरपला आहे. त्यांचा जाणे ही कधीही भरून न येणारी पोकळी आहे. त्यांची आठवण कुटुंबासाठी सदैव प्रेरणादायी ठरेल. त्यांच्या कृतीतून, शब्दांतून, आणि वागणुकीतून त्यांनी कुटुंबासाठी कायमचा वारसा तयार केला आहे.

      "स्व.संगीता काकू, तुमच्या आठवणींनी आमचे मन सदैव भरून राहील. तुमच्या कुटुंबासाठी दिलेले प्रेम आणि आधार आम्ही कधीही विसरू शकत नाही. तुमची जागा कोणीही घेऊ शकणार नाही. आपणास भावपूर्ण श्रद्धांजली."..

शुक्रवार, २९ नोव्हेंबर, २०२४

कर्तबगार, दिलखुलास, दिलदार अन् सदाबहार मित्र ; मनोज ढोले

सुधाकर मराठे
        मनोज अशोक ढोले हा एक असा मित्र आहे, ज्याने आपल्या कठीण परिस्थितीतही खंबीरपणे उभे राहत, कुटुंबासाठी मोठा आधार निर्माण केला आहे. शिक्षणात विशेष गोडी नसली तरी मनोजला मित्रमंडळ, क्रिकेट, आणि व्यवसायात नेहमीच रस होता. लहानपणापासूनच त्याची निरागसता आणि मदतीची वृत्ती यामुळे तो सर्वांचा लाडका बनला. अभ्यासात मागे असला तरी त्याच्या मैत्रीतील आणि खेळातील समर्पणाने त्याला स्थानिक पातळीवर लोकप्रिय केले होते. 
        क्रिकेटमधील त्याच्या उत्कृष्ट खेळामुळे त्याचे नाव रायझिंग स्टार क्रिकेट संघ व भोईराज संघात विशेष ओळखले जाते. त्याचे ताकदवान षटकार आणि आक्रमक खेळ पाहण्याची मज्जाच वेगळी होती. लहानपणी त्याला तोंडात चार आणे ठेवून चघळण्याची सवय जडली होती, जी मजेशीर वाटत असली तरी घरच्यांकडून व मित्र परिवाराकडून त्याला या सवयीबद्दल ओरडा बसायचा. परंतु, हळूहळू त्याने अन्य विविध बाबींकडे लक्ष केंद्रित करून त्या सवयीवर नियंत्रण मिळवले.
          घरच्या अडचणींमुळे, मनोजने १० वी पावेतो शिक्षण घेतले त्यानंतर त्याने शाळा सोडली आणि आपल्या कुटुंबाच्या भाजीपाला व्यवसायात लक्ष घालायला सुरुवात केली. दररोज रात्री बेरात्री उठून भाजी खरेदीसाठी  नंदुरबार येथे जिल्ह्याच्या ठिकाणी जाणे आणि दिवसभर आई-वडिलांना दुकानात मदत करणे, हा त्याचा दिनक्रम झाला. त्याच्या मेहनतीमुळे तळोदा शहरातील त्यांचे भाजीपाला दुकान एक नामांकित ठिकाण बनले आहे. मनोजच्या अथक परिश्रम, प्रामाणिकपणा आणि कुटुंबाबद्दलच्या प्रेमामुळे त्याच्या दुकानाला स्थानिक पातळीवर प्रतिष्ठा मिळाली आहे, आणि तो एक आदर्श युवक म्हणून ओळखला जातो.
        मनोजच्या आई-वडिलांनी त्याला लहानपणापासून मेहनतीचे महत्त्व शिकवले. त्यांनी नेहमी सांगितले की, "आई-वडिलांची साथ नेहमी सोबत असावी, वाईट व्यसनांना जाऊ नकोस, मेहनत करून खा आणि लबाडी करू नकोस." या शिकवणीतून मनोजने जीवनातले वास्तविक मूल्य समजून घेतले. मित्र परीवाराच्या कुटुंबातील कुठलेही कार्य असो मनोज पूर्ण वेळ त्याठिकाणी देत असल्यामुळे कार्यक्रम अगदी सहज पार पडत.

          त्याच्या आई-वडिलांच्या पाठिंबामुळे त्याने कठोर परिश्रम करण्याची आणि प्रामाणिकपणे जगण्याची शिकवण घेतली. त्यांनी त्याला प्रामाणिकपणा आणि मेहनतीच्या आधारावर यश मिळवण्याचे महत्त्व समजावून सांगितले. या मूल्यांमुळे मनोजने वाईट मार्गाला लागण्याऐवजी आपल्या कुटुंबाच्या व्यवसायात कार्यरत राहणे आणि समाजाच्या भल्यासाठी मदत करणे पसंत केले.
       मनोजच्या या शिकवणीमुळे तो एक प्रगतीशील युवक बनला आहे, जो आपल्या कुटुंबाच्या कष्टाची कदर करतो आणि सर्वांच्या मदतीसाठी नेहमी तत्पर असतो.
          मनोजला खऱ्या अर्थाने साथ लाभली ती त्याच्या लहान भाऊ मुकेशची, मुकेशने नेहमीच मनोजच्या कठीण काळात त्याला आधार दिला आहे. दोन्ही भाऊ एकमेकांचे सहायक बनून एकत्रितपणे कुटुंबाच्या भाजीपाला व्यवसायात कार्यरत आहेत. मुकेशच्या समर्थनामुळे मनोजने अनेक आव्हानांचा सामना केला आहे. मुकेश त्याच्या भावाला प्रेरित करत असतो, जेव्हा तो थोडा हताश असतो. त्यांनी एकमेकांच्या गुणांची कदर केली असून, एकत्रित मेहनत केल्याने त्यांचा व्यवसाय यशस्वी झाला आहे.
        भाऊ म्हणून मुकेशने जो विश्वास, प्रोत्साहन, आणि सहयोग दिला आहे, त्यामुळे मनोजच्या जीवनातील अनेक अडथळे पार करण्यात त्याला मदत झाली आहे. एकत्र काम करून आणि एकमेकांना आधार देऊन त्यांनी जीवनातील संकटांना सामोरे जाण्याचा आदर्श उदाहरण निर्माण केला आहे. त्यांच्या यशात आणि व्यवसायाच्या वाढीत मुकेशची भूमिका खूप महत्त्वाची आहे, ज्यामुळे मनोज आपल्या ध्येयांच्या दिशेने अधिक निर्धाराने चालत राहतो...
                  सोज्वळ पत्नीसह मनोजला हर्षल व कृष्णा असे दोन मुले आहेत, आणि त्याचा परिवार खूप सुखी आहे. त्याने आपल्या कुटुंबासोबत एक आनंदी आणि प्रेमळ वातावरण निर्माण केले आहे. आपल्या मुलांना चांगले शिक्षण देणे आणि त्यांना योग्य मार्गदर्शन करणे याकडे तो विशेष लक्ष देतो.....


गुरुवार, २१ नोव्हेंबर, २०२४

महिलांनी मतदान केंद्रांवर रांगा लावल्या; भाजप की काँग्रेसला फायदा?

२० नोव्हेंबर २०२४
तळोदा : यंदाच्या निवडणुकीत महिलांच्या प्रचंड उत्साहाने मतदान केंद्रांवर रेकॉर्डब्रेक गर्दी पाहायला मिळाली. "लाडकी बहीण योजना", महिलांचे आरक्षण, आणि महिला सक्षमीकरणाच्या मुद्यांवर दोन्ही प्रमुख पक्षांनी भर दिला होता. या पार्श्वभूमीवर महिलांच्या मतदानाचा कल कोणत्या पक्षाच्या बाजूने झुकला आहे, यावर सगळ्यांचे लक्ष केंद्रित झाले आहे.

        महिलांचा उत्स्फूर्त सहभाग
ग्रामीण आणि शहरी भागांतील महिलांनी सकाळपासूनच मतदान केंद्रांवर रांगा लावल्या. काही ठिकाणी मतदानासाठी दोन-तीन तास प्रतीक्षा केल्याचे दिसून आले. महिला मतदारांनी सामाजिक आणि आर्थिक मुद्द्यांवर विचार करून मतदान केल्याचे मत व्यक्त केले.

भाजपला फायदा?
महिलांसाठी "लाडकी बहीण योजना", गॅस सिलिंडरवर सबसिडी, आणि "प्रधानमंत्री आवास योजना" यांसारख्या योजनांनी भाजपला मोठा आधार मिळाला आहे. ग्रामीण भागातील अनेक महिलांनी भाजपला मतदान केल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.

काँग्रेसची पकड?
दुसरीकडे, काँग्रेसच्या "गृहलक्ष्मी योजना", महिला रोजगारासाठी नव्या योजना, आणि महागाईविरोधी धोरणांमुळे महिलांमध्ये काँग्रेसच्या बाजूनेही मोठा कल असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. काँग्रेसने महागाईवर कडक टीका करून महिला मतदारांना आकर्षित करण्याचा प्रयत्न केला आहे.

महिला मतदारांपैकी काहींनी भाजप सरकारच्या योजना स्तुत्य असल्याचे सांगितले, तर काहींनी काँग्रेसच्या महागाईविरोधी उपाययोजनांना पसंती दर्शवली. "भाजपने गॅस सबसिडी दिली, पण महागाईवर उपाय केला नाही. यामुळे आम्ही परिवर्तनाचा विचार करत असल्याचे काही म्हणाले.

कौन पुढे?
       सर्व्हे आणि मतदान केंद्रांवरील पाहणीवरून महिलांच्या मतदानाचा कल स्पष्ट होण्यासाठी मतमोजणीची वाट पहावी लागेल. त्यामुळे महिलांचे निर्णायक मतदान दोन्ही पक्षांच्या विजयासाठी महत्त्वाचे ठरेल.

      महिलांच्या सहभागाने या निवडणुकीचे गणित अधिकच गुंतागुंतीचे बनवले आहे. महिलांचा कल भाजप किंवा काँग्रेसकडे किती प्रमाणात आहे, याचा अंतिम निर्णय निकालानंतरच स्पष्ट होईल.

नंदुरबार जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीसाठी मतदारांनी मोठ्या संख्येने मतदानाचा हक्क बजावला. जिल्ह्यातील मतदानाच्या आकडेवारीवरून महिलांनी या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात सहभाग घेतल्याचे स्पष्ट दिसत आहे. चार विधानसभा मतदारसंघांमध्ये महिलांच्या मतदानाचा टक्का पुरुषांच्या तुलनेत जास्त असल्याचे दिसून आले.

महत्वाची आकडेवारी:
1. अक्कलकुवा विधानसभा मतदारसंघ:

एकूण महिला मतदार: 1,59,319

मतदान केलेल्या महिला: 96,024 (60.27%)

महिलांचा मतदानाचा टक्का पुरुषांपेक्षा अधिक.

2. शहादा विधानसभा मतदारसंघ:

एकूण महिला मतदार: 1,77,588

मतदान केलेल्या महिला: 1,17,295 (66.05%)

पुरुषांच्या तुलनेत महिलांचा सहभाग अधिक.

3. नंदुरबार विधानसभा मतदारसंघ:

एकूण महिला मतदार: 1,77,212

मतदान केलेल्या महिला: 1,01,959 (57.54%)

महिला मतदारांचा टक्का लक्षणीय.

4. नवापूर विधानसभा मतदारसंघ:

एकूण महिला मतदार: 1,53,098

मतदान केलेल्या महिला: 1,14,051 (74.50%)

नवापूरमध्ये महिलांनी सर्वाधिक उत्साह दाखवला.


जिल्ह्याचा एकूण मतदानाचा टक्का:

पुरुष: 63.08%

महिला: 64.35%

इतर: 23.08%

एकूण मतदान: 63.72%

महिलांचा निर्णायक सहभाग:

         महिलांचा सहभाग पुरुषांपेक्षा जास्त असल्याने यंदाच्या निवडणुकीत महिलांचे मत पक्षांच्या विजयासाठी निर्णायक ठरणार आहे. महिलांच्या आरक्षण, योजना, आणि सक्षमीकरणाच्या मुद्द्यांवर प्रचार केला गेल्याने महिला मतदारांकडून चांगला प्रतिसाद मिळाल्याचे दिसून येते. जिल्हाधिकारी डॉ. मिताली सेठी यांनी मतदान प्रक्रियेत सहभाग घेतलेल्या सर्व मतदारांचे अभिनंदन केले असून, शांततापूर्ण वातावरणात निवडणूक पार पाडल्याचे समाधान व्यक्त केले आहे.
         महिलांचा वाढलेला मतदान टक्का कोणत्या पक्षाला फायदा करून देईल, हे निकालानंतरच स्पष्ट होईल. पण महिलांचा वाढता सहभाग लोकशाहीसाठी एक सकारात्मक पाऊल ठरतो आहे.

रविवार, १७ नोव्हेंबर, २०२४

हिमाचल टूरचा चुरशीचा प्रसंग: नियमांवरील विजय

०७ नोव्हेंबर २०२४
         सुधाकर व त्याच्या मित्रांच्या समूहाने ३ लाख १५ हजार रुपयांचे हिमाचल पॅकेज एका कंपनीकडून बुक केले होते. आधीच ठरल्याप्रमाणे टप्प्याटप्प्याने पैसे देण्याचा करार होता. मात्र, टूरच्या दुसऱ्या दिवशीच कंपनीकडून पूर्ण रक्कम तातडीने भरण्याचा आग्रह होऊ लागला. या प्रसंगामुळे प्रवासाच्या उत्साहावर विरजण पडले, मात्र समूहाच्या धैर्याने आणि ऐक्याने हा वाद चुरशीने हाताळण्यात आला.. यात लेखी करणार देताना नियम पूर्णपणे दिले होते मात्र शब्द देताना वेगळे देत होते याबाबत त्यांच्याशी त्याच वेळी चर्चा करून लेखी नमूद करण्याची विनंती केली होती. त्यांनी विश्वास दर्शवला होता. मात्र ऐनवेळी रक्कम मागण्यास सुरुवात केल्यामुळे समूहाने नकार दिला.    
    सुरुवातीला कंपनीने नियमांकडे कानाडोळा करून, ठरलेल्या अटींना डावलून, समूहावर रक्कम पूर्ण देण्याचा दबाव टाकला. कंपनीचा मॅनेजर थेट धमकीच्या सुरात म्हणाला, "जर पैसे भरले नाहीत तर रात्रीच तुम्हाला चेक-आउट करावे लागेल." या वक्तव्यामुळे समूहात तणाव निर्माण झाला, पण सुधाकरने शांतपणे परिस्थिती हाताळली. त्यांना ठामपणे सांगितले की, “आम्ही ठरलेल्या अटींप्रमाणेच वागू.” समूहातील इतर दहा जणांनी सुधाकरच्या मताला पाठिंबा दिला. त्यांनी मॅनेजरला स्पष्ट केले, “सुधाकर जे म्हणत आहेत, तेच योग्य आहे. आम्ही एकत्र आहोत.”

      मॅनेजरचा दबाव वाढत असताना, सुधाकरने ठाम भूमिका घेतली. त्याने सांगितले, "जर परिस्थिती अशीच राहिली तर आम्ही पोलीस ठाणे गाठू. गरज पडल्यास आंदोलन छेडू." हा निर्णय कंपनीला अडचणीत आणणारा ठरला. रात्री १२ वाजता थेट कंपनीचा मालक शिमला येथे आला.
       मालकाने सुधाकर व समूहाशी चर्चा केली. समूहाच्या ठाम भूमिकेमुळे आणि नियमांच्या आधारावर बोलल्यामुळे शेवटी कंपनीने मध्यस्थी केली. रक्कम कमी करण्यात आली, आणि समूहाच्या अटींनुसार उर्वरित रक्कम टप्प्याटप्प्याने घेण्यास कंपनी तयार झाली. व त्यानंतर मिळणाऱ्या सुविधाही उत्तम मिळाल्या, हा प्रसंग समूहाच्या विजयाचा ठरला. यामुळे न केवल प्रवासाचा आनंद कायम राहिला, तर समूहाने एकीची ताकद काय असते हे दाखवून दिले. हा संघर्ष फक्त कंपनीच्या चुकीच्या धोरणांविरुद्धच नव्हे, तर प्रवाशांच्या हक्कांसाठी उभा राहण्याचा आदर्श ठरला.
      या प्रसंगातून एक गोष्ट स्पष्ट झाली - नियमांना डावलून काम करणाऱ्यांविरुद्ध ठाम राहिल्यास यश मिळतेच. समूहाच्या संयमाने आणि एकजुटीने नियमांवर विश्वास ठेवणाऱ्यांचा विजय झाला..

दै.पुण्यनगरीचे निष्ठावंत सेवक: सुरज पाटील यांचे अल्पायुष्य जीवन ; भावपूर्ण श्रध्दांजली

१७ नोव्हेंबर २०२४
साध्या पण कर्तृत्वशाली व्यक्तिमत्त्वाचे धनी सुरज पंडित पाटील यांचे केवळ ४० व्या वर्षी झालेले आकस्मिक निधन मनाला चटका लावणारे आहे. दै. पुण्यनगरी कार्यालयात ऑपरेटर म्हणून कार्यरत असलेल्या सुरजने आपल्या समर्पित वृत्तीने आणि निष्ठेने संस्थेतील प्रत्येक सदस्याच्या मनात आपले स्थान निर्माण केले होते.

      सुरज पाटील हे नाव म्हणजे कामाप्रती निष्ठेचा आदर्श. जाहिराती सेटअप करणे, बातम्या सुसूत्र करणे यांसारख्या तांत्रिक बाबींमध्ये त्याचा हातखंडा होता. संस्थेच्या छोट्या-मोठ्या कामांसाठी तो नेहमी तत्पर असायचा. जाहिरातीचे आर.ओ. भरण्यापासून जाहिरातीचे उत्पन्न मिळवण्यासाठी व बँकेत जाऊन भरण्या करणे पावेतो प्रतिनिधींसोबत काम करण्यापर्यंत, त्याने कार्यालयातील विविध भूमिका प्रामाणिकपणे पार पाडल्या.

     सुरजचा स्वभाव मनमिळाऊ होता. त्याने कधीही संताप व्यक्त केला नाही, कुणालाही दुखावले नाही. त्याच्यात सर्वांना धरून चालण्याची असामान्य कला होती. त्याचा चेहरा नेहमी हसरा असायचा, आणि त्याच्या सकारात्मक उर्जेमुळे कार्यालयाचे वातावरण नेहमी प्रसन्न असे,
     अवघ्या कमी वयात, जीवनाचा उत्कर्ष गाठण्याच्या टप्प्यावर त्याला आजाराशी सामना करावा लागला. त्या संघर्षाने त्याला खूप थकवले, पण त्याने कधीही स्वतःला खचू दिले नाही. दुर्दैवाने, ४० व्या वर्षी त्याच्या या सुंदर प्रवासाचा अंत झाला, ज्यामुळे त्याचे कुटुंब, मित्र, सहकारी आणि परिचित हळहळले.

     सुरजच्या आठवणींमध्ये त्याचे हसरे रूप, काम करण्याची लगन, आणि सर्वांशी केलेले आपुलकीचे वागणे नेहमीच जिवंत राहील. त्याचा संघर्ष, त्याची मेहनत, आणि त्याचा साधेपणा यामुळे तो कायम लोकांच्या हृदयात राहील.

      सुरजभाऊ यांचे अकाली जाणे हे त्यांच्या कुटुंबासाठी, सहकाऱ्यांसाठी, आणि संस्थेसाठी मोठी हानी आहे. त्यांच्या निष्ठेचे, साधेपणाचे आणि सकारात्मकतेचे उदाहरण आपल्यासाठी कायम प्रेरणादायी ठरेल. सुरज, तुमच्या आठवणी आणि कार्याची सावली आमच्यासोबत नेहमी राहील. दैनिक पुण्यनगरीतील एक सहकारी अश्या अचानक गेल्याचे आयुष्यभर दुःख असेल. तुला भावपूर्ण श्रद्धांजली!

सुधाकर मराठे
 तळोदा प्रतिनिधी

शनिवार, १६ नोव्हेंबर, २०२४

"रेल्वे प्रवासातील अडचणी आणि आनंदाचा प्रवास"

१६ नोव्हेंबर २०२४
प्रवास हा नेहमीच आठवणींचा ठेवा असतो, पण कधी कधी तो आठवणींसोबत संकटांनाही घेऊन येतो. दक्षिण भारताच्या प्रवासातील शेवटच्या दिवशी आमचे तिकीट हरवले होते. त्या गोंधळात, फक्त प्रवास पूर्ण करण्यासाठी आम्हाला टीसीला दंड भरावा लागला. ती रक्कम कमी नव्हती, पण त्यावेळी दुसरा पर्यायच नव्हता. तो प्रसंग जसा अवघड होता, तसाच पुढे जाण्याचा अनुभवही देणारा होता. तर हिमाचल हिंडून आल्यानंतर सुरतहून नंदूरबार जाण्यासाठी सुरत भुसावळला पॅसेंजर रेल्वेचे आरक्षित तिकीट न मिळाल्यामुळे आम्ही काऊंटरवरून तात्पुरती तिकिटे काढली. 
प्रवासाची सुरुवातच आव्हानात्मक होती.   ट्रेन प्लॅटफॉर्मवर आली, मात्र तिच्या प्रत्येक डब्यात पाय ठेवण्यासही जागा नव्हती. ही परिस्थिती पाहून सर्व बायका घाबरल्या. मुलांसोबत गडबड गोंधळ उडाला. महिला आणि लहान मुले गर्दीच्या त्या दृश्याने घाबरली होती. काही मुले रडायला लागली, तर काहींनी घाबरून आईच्या कुशीत आसरा घेतला. गोंधळात सर्वांचा संयम तुटत चालला होता. जागा मिळवणे अशक्य होतं, पण पुढील रेल्वे सकाळी पाच वाजता असल्याने या ट्रेननेच प्रवास करणे गरजेचे होते.

                           रात्र असल्याने पुढील रेल्वे सकाळी पाच वाजता होती. मात्र, त्यावेळी प्रवास करणे कठीण होईल, असे वाटल्याने आम्ही या भरगच्च ट्रेनमध्येच जागा मिळवण्याचा निर्धार केला. सर्व पुरुष मंडळींनी बायकांना व मुलांना सुरक्षित ठेवण्याचे ठरवले. "टीसी आला, तर त्याला मॅनेज करायचे," असेही ठरले.
गर्दीच्या त्या धकाधकीत, कुठेतरी एक कोपरा मिळवून आम्ही थोडासा विसावा घेतला. व्यारा स्थानकावर ट्रेन थांबली, तेव्हा टीसी समोर आला. त्याने आम्हाला पाहिले, आणि प्रत्येकी ५० रुपये घेतले. यानंतर आमच्यासाठी थोडीशी मोकळी जागा उपलब्ध करून दिली. हा सगळा प्रसंग इतका अनोखा आणि मजेशीर वाटला की शेवटी आम्ही सगळेच हसत राहिलो.
हा प्रवास आमच्यासाठी फक्त मार्गक्रमण नव्हता, तर एक अनुभव होता - एका आव्हानाचा, जिद्दीचा आणि परिस्थितीला जुळवून घेण्याचा. ही रात्र आम्हाला खूप काही शिकवून गेली - संकटांमध्ये एकत्र राहणे, संयम राखणे आणि जिद्दीने पुढे जाणे. हा प्रवास जितका कठीण होता, तितकाच आयुष्यभर लक्षात राहणारा ठरला.
 
        या प्रवासात शेवटच्या दिवशी सुरत-भुसावळ पॅसेंजर ट्रेनमध्ये मिळालेला अनुभव व दक्षिण भारतीय सहली दरम्यान हरवलेले तिकिटे या दोन्ही अनुभवांनी एक गोष्ट मात्र शिकवली - प्रवासात संकटे येत असली तरी ती सहनशीलता, एकमेकांना आधार, आणि प्रसंगावधानाच्या जोरावर पार करता येतात. गमावलेले तिकीट असो किंवा जागा, संकटे कधीही येऊ शकतात, पण शेवटपर्यंत प्रयत्न सोडले नाहीत, तर प्रवास कायम लक्षात राहतो..