Breking News

मंगळवार, ७ मे, २०१९

घोटभर पाण्यासाठी जीव होई कासावीस... तहानेसाठी भटकंती रातन्दिस कैफियत :

तळोद्यातील तिघा गावांना टंचाईच्या झळा; स्वातंत्र्याची सत्तरी उलटूनही रस्ता नाही
  शिक्षण, आरोग्य, रोजगार, वीज, पाणी, निवारा या सारख्या मुलभूत सुविधांपासून स्वातंत्र्याची सत्तरी उलटल्यानंतरही तळोदा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील रहिवासी वंचितच आहेत. किमान माणूस म्हणून जगण्यासाठी असणाऱ्या गरजा पूर्ण व्हाव्यात यासाठी येथील रहिवाश्यांचा संघर्ष आजही कायम आहे. समस्यांचा पाढा तर संपता संपत नाही. तळोदा तालुक्यातील कोयलीडाबर, गोरामाळ व चिडीमाळ या गावांना जाण्यासाठी आजही पक्का रस्ता नसल्याने पायवाटेनेच जावे लागते. यामुळेच की काय ही गावे विकासापासून आऊट ऑफ कव्हरेज आहेत. असो, पण किमान पिण्याचे पाणी तरी मिळावे, रहदारीसाठीचा रस्ता तरी व्हावा, अशी आस येथील रहिवाश्यांना आहे. पाण्याची तहान भागविण्यासाठी खोल विहीरीत उतरून रानावनातील भटकंतीचे येथील दाहक वास्तव मनाला चटका लावुन जाणारे असले तरी याची दखल मात्र कोणीही घेत नसल्याने आता संघर्षाबरोबर हक्कासाठी
आंदोलनच उभारायचे असा निर्धार येथील रहिवाश्यांनी केला आहे.. गावात वीज पुरवठा करण्यासाठी येथील रहिवाश्यांनी सुमारे पाच ते सहा कि.मी.अंतरापर्यंत वीजेचे पोल व विद्युत रोहित्र अक्षरक्ष: दोर बांधुन ओढून आणले. परंतू अद्यापही त्यांना याची मजूरी अदा करण्यात आली नाही. संतप्त ग्रामस्थांसह लोकसंघर्ष मोर्चाने याची तक्रार तळोदा गटविकास अधिकाऱ्यांकडे केली आहे. यावेळी कोयलीडाबर, चिडीमाळ व गोरामाळ या गावात पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात यावी, गुरांसाठी चारा छावणी सुरू करावी, रस्त्याचे काम युध्द पातळीवर सुरू करावे, मुलभूत सुविधा पुरवाव्यात अशा मागण्याही करण्यात आल्या आहेत. याची दखल न घेतल्यास आंदोलन छेडण्याचा इशाराही देण्यात आला आहे. दुष्काळाच्या झळा आता ग्रामीण व आदिवासी क्षेत्रासह सर्वत्रच तीव्र होवु लागल्या आहेत. दिवसेंदिवस परिस्थिती गंभीर होत आहे. मात्र याकडे लोकप्रतिनिधींसह प्रशासन दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप तळोदा तालुक्यातील अतिदुर्गम भागातील कोयलीडाबर, गोरामाळ व चिडीमाळ येथील रहिवाश्यांनी केला आहे.
तळोदा शहरापासून अवघ्या २० ते २५ कि.मी. अंतरावर असणाऱ्या या गावांना जाण्यासाठी स्वातंत्र्याच्या सत्तरीनंतर अजूनही रस्त्याची प्रतिक्षाच आहे. पायवाट तुडवित येथील रहिवासी मार्गक्रमण करतात. यामुळे देश विकसनशील कडून विकसित राष्ट्राकडे वाटचाल करीत असला तरी येथील रहिवाश्यांच्या समस्या मात्र जैसे थे आहे. कोयलीडाबर गावाला पाणी पुरवठा करण्यासाठी दोन विहीरी बांधण्यात आले असल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात येते. असे असले तरी यातील एक विहीर अर्धवट बांधकाम असून तिला पाणी आलेच नाही. तरीही येथे सौर ऊर्जेवरचा पंप व मशिन बसवुन काम पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले. तर दुसऱ्या विहीरीने कधीच तळ गाठला आहे. यामुळे तहान भागविण्यासाठी येथील रहिवाश्यांना खोल विहीरीत उतरून झिऱ्यांमधून पाणी भरून तहान भागवावी लागते. हंडाभर पाण्यासाठी रात्र जागून काढावी लागते. येथे माणसाच्याच पिण्याच्या पाण्याचे हाल आहेत तर जनावरांच्या तहानेसाठी होणारे हाल समस्यांमध्ये अधिकच भर टाकतात. चिडीमाळ व गोरामाळच्या पाड्यात यापेक्षा वेगळी स्थिती नाही. गावात रस्ताच नसल्याने टँकरने पाणी पुरवठा होत नाही. यामुळे तहान भागविण्यासाठी रानोवनी करावी लागणारी भटकंती येथील रहिवाश्यांच्या पाचवीला पूजलेली आहे. लोकप्रतिनिधींसह प्रशासनाने याची दखल घेवून येथील रहिवाश्यंाची तहान तरी भागवावी, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे..




गुरुवार, १० जानेवारी, २०१९

तळोद्यात सफाई कामगारांना मास्क वाटप

शहरातील सफाई कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्­यात येण्याच्या शक्यतेने प्रभाग क्र.२ मधील नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय व संदीप परदेशी यांनी सफाई कर्मचाऱ्यांना मास्क वाटप केले. . तळोदा शहरात दररोज घरोघरी कचरा गोळा करण्यासाठी घंटागाडी येते. नागरिक रोजच्या-रोज कचरा टाकत नसून तो घरात साठवून ठेवतात. त्यामध्ये, शरीराला घातक किडे, मुंग्या, अळ्या, माश्­या तयार होतात. कर्मचारी मोजे किंवा मास्क न घालताच हॉटेल व्यवसायिक तसेच नागरिकांनी दिलेला कचरा वाहनांमध्ये बसून वेगळा करतात. शहरात अनेकवेळा कुत्रे,डुक्करे आदी प्राणी मृत्यूमुखी पडून कुजतात. दरम्यान कचऱ्यामध्ये काम करतांना कामगारांनी सुरक्षा साधने वापरणे बंधनकारक असते. परंतु ठेकेदारांकडून अशीे साधने उपलब्ध केली जात नसल्याने प्रभाग क्र.२ चे नगरसेवक हितेंद्र क्षत्रिय, अनिता परदेशी व त्यांचे पती युवा जिल्हा उपाध्यक्ष संदीप परदेशी यांनी सफाई कामगारांच्या आरोग्याबाबत चिंता व्यक्त करत त्यांना मास्क वाटप केले. तर यापूर्वी सफाई कर्मचाऱ्यांना सुविधा पुरविण्यात आल्या होत्या. मात्र कर्मचारी ते वापरत नसल्याचे आढळून आले आहे. सदर बाब आरोग्याच्या दृष्टीने घ.ातक असल्याबाबत त्यांचे प्रबोधन करणे गरजेचे आहे. कचरा गोळा करणाऱ्या कर्मचाऱ्यांना आरोग्यविषयक सुविधा पुरवित नसल्याने ठेकेदारावर कारवाईची मागणी होत आहे. .

अटी शर्ती प्रमाणे कामे करणे मक्तेदारावर बंधनकारक आहे. आरोग्याच्या दृष्टीने सफाई कर्मचाऱ्यांना हातमोजे व मास्क पुरविणे बंधनकारक आहे. संबधित ठेकेदाराला याबाबतचे पत्र देण्यात आले आहे.. -जनार्दन पवार, मुख्याधिकारी. 

आणि फसवणूक होता होता टळली!

सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांनी मॅग्नेटिक ्ट्रिरप असलेले जूने एटीएम कार्ड कालबाह्य ठरवून त्याऐवजी नवीन चिप एटीएम कार्ड ग्राहकांना बंधनकारक केले आहे. याचा फायदा चोरटे घेत असून नागरिकांना बँकेतून बोलत असल्याचे सांगून त्यांच्याकडून जुन्या, नवीन एटीएम कार्ड वरील सोळा डीजीट क्रमांक व पिनकोड मागून ऑनलाईन आर्थिक फसवणूकीचा प्रयत्न करीत आहे. काल एका मुख्याध्यापकाच्या सतर्कतेमुळे भामट्याचा प्रयत्न फसला असून याबाबत तळोदा पोलिसात तक्रार दाखल करण्यात आली आहे. . राष्ट्रीयकृत बँकांना जूने एटीएम कार्ड बदलून नवीन चीप एटीएम कार्ड बँक खातेदारांना बंधनकारक केले आहे. त्यामुळे ३१ डिसेंबर २०१८ पासून जुने एटीएम कार्ड पूर्णपणे बंद झालेले आहे. सध्या नवीन चीप बेस्ड एटीएम कार्डसाठी बँकाकडे मोठ्या प्रमाणात अर्ज आलेले आहेत. जुने एटीएम कार्ड बंद होणार असल्यामुळे हजारो खातेदार नवीन कार्डसाठी बँकांमध्ये गर्दी करत आहेत. नेमकी हीच बाब काही भामट्यांनी हेरली असून बँक खातेदारांना मोबाईल फोन करून बँकेतून अधिकारी बोलत असल्याच्या भूलथापा देऊन तुमचे जुने एटीएम कार्ड आता रद्द होणार आहे. नवीन चिप बेस्ड एटीएम कार्ड घ्यावे लागणार आहे. त्यासाठी तुमच्या १६ अंकी डिजिट नंबर आणि कोड सांगा अशी विचारणा करीत आहेत. बँकांनी नवीन चिप बेस्ड एटीएम कार्ड अनिवार्य केल्यामुळे नागरिकही त्या भामट्याने बोलण्यावर विश्वास देऊन गोपनीय माहिती देऊन टाकतात. यातच फसवणुकीचे प्रकार घडत आहेत. तळोदा येथील शेठ के.डी. हायस्कूलचे मुख्यध्यापक दिलीप गिरनार यांना काल बँकेतून बोलत असल्याचा फोन आला आणि संबंधिताने भूलथापा देऊन माहिती मागितली. मात्र आपली फसवणूक होत असल्याचे गिरणार यांना समजले व त्यांनी त्या भामट्यास पोलिसांत तक्रार दाखल करण्याची धमकी देताच त्याने फोन कट केला. याबाबत गिरणार यांनी तळोदा पोलिसात तक्रारी अर्ज दिला आहे..

शनिवार, ५ जानेवारी, २०१९

अवजड वाहनांमुळे तळोदा शहरात अपघाताचा धोका वाढला

सूरळीत वाहतुकीसाठी बायपास मार्ग अवलंबावा ; पोलिसांनी वाहतूक शिस्तीसाठी पावले उचलणे गरजेचे
तळोदा शहराची बेशिस्त वाहतूक व्यवस्था चर्चेत आली आहे. याबाबत दै.पुण्यनगरीच्या माध्यमातून वेळोवेळी परिस्थिती सहचित्र मांडण्यात येत आहे. यानंतर पोलिस प्रशासनाकडून वाहतूक शिस्तीसाठी थातूरमातूर कारवाई करण्यात आली.त्या कारवाईतही दुजाभाव केला जात असल्याचा आरोप वाहनधारक करीत आहेत. वहतूकीच्या उपाययोजनेबाबत पोलिस प्रशासन अजूनही फारसे गंभीर दिसून येत नाही. आजही शहरात फॅन्सी नंबर प्लेट असलेले वाहने सुसाट धावत आहेत. बेशिस्त वाहनधारक वाहने भर रस्त्यात उभी करत आहेत. ट्रिपल सीट्स वाहने हाकण्यास जणू पोलिसांनीच परवाना दिला आहे. अल्पवयीन मुले बिनधास्त वाहतुकीचे नियम पायदळी तुडवत वाहने हाकत आहेत. सध्या ऊस तोडीचा हंगाम सुरू आहे. ऊस वाहतूक करणारी ट्रॅक्टर ट्रॉली व बैलगाड्यांची वर्दळ शहरात वाढली आहे. ऊस वाहतूक करणारी वाहने शहरातूनच जात असल्याने वाहतुकीचा बोजवारा उडत असून अपघाताची शक्यता वाढली आहे. बऱ्याचदा रस्त्यावरील गतिरोधक ओलांडताना उसाने भरलेली वाहने अक्षरश: उभी राहतात. जीवघेणी कसरत करत वाहने शहरातून नेली जात आहेत. परिणामी भरलेले वाहने पडण्याची शक्यता निर्माण होत असून ट्रॉलीतून रस्त्यावर ऊसाच्या मुळ्या पडणे, रस्त्यावर पंक्चर होणे यासारखे प्रकार घडत आहेत. ट्रॅक्टरला एकच हेडलाईट असल्याने अपघाताची शक्यता अधिक वाढते. अनेक ट्रॅक्टरला नंबर नसणे, नवीन ट्राली आरटीओकडे नोंदणी न करता वाहतुकीसाठी खुलेआमपणे वापरली जात आहेत. काही वाहनांना तर परवाना नसतो. या नियमबाह्य बाबींकडे पोलिस प्रशासनासह आरटीओंचे देखील दर्लक्ष आहे. यामुळे कसलीच तमा न बाळगता वाहने वेगात चालवणे, रस्त्यावर कुठेही कधीही, कशीही उभे करणे असे प्रकार होताना दिसून येत आहेत. त्यामुळे इतर वाहनधारक, प्रवाशांना मोठा मनस्ताप सहन करण्याची वेळ आली आहे. वाहतुकीला शिस्त लागण्याबरोबरच चालकांनी सतर्क राहणे गरजेचे बनले आहे. वाहनाला रिफ्लेक्टर लावले आहेत का, वेग मर्यादेचे उल्लंघन करीत मोठ्या प्रमाणात कर्कश आवाज वाढवत आहे का ? यासारख्या बाबींचीही तपासणी करणे गरजेचे झाले आहे. यामुळे वाहतूक शिस्त आजच्या घडीला वाहतूक पोलिसांपुढे मोठे आव्हान निर्माण झाले असून ठोण पावले उचलणे गरजेचे झाले आहे..

शुक्रवार, ४ जानेवारी, २०१९

नवीन वर्षाचे औचित्य साधत आ.पाडवींची डॉ.वाणींशी दिलजमाई

तळोदा पालिका निवडणूकीप्रसंगी भाजपामध्ये आपापसांत राजकीय मतभेद निर्माण होवून आ.उदेसिंग पाडवी डॉ.शशिकांत वाणी यांच्यात काहीसा दूरावा निर्माण झाल्याची चर्चा होती. मात्र नवीन वर्षाच्या शुभेच्छा देण्यासाठी आ.उदेसिंग पाडवी यांनी थेट डॉ.शशिकांत वाणी यांचे निवासस्थान गाठून शुभेच्छा दिल्याने मतभेदाची चर्चा थांबली असून यावर पडदा पडला आहे. याबाबत राजकीय वर्तुळात खमंग चर्चा होत आहे.. भाजपाच्या सत्ता स्थापनेसाठी खांद्याला खांदा लावून तळोदा-शहादा विधानसभा निवडणुकीत भाजपचा झेंडा रोवणारे दोघा दिग्गज नेत्यांमध्ये डिसेंबरमध्ये झालेल्या तळोदा पालिकेच्या निवडणूकीपासून काहीसा दूरावा निर्माण झाला होता. पालिका निवडणुकीत डॉ.शशिकांत वाणी यांची लोकनियुक्त नगराध्यक्ष पदासाठी उमेदवारी निश्चित मानली जात होती. परंतु ऐनवेळी डॉ.वाणी यांना उमेदवारी नाकारण्यात आली. तसेच डॉ.वाणींचे समर्थक असणाऱ्यांनाही उमेदवारी नाकारण्यात आली होती. यावेळी डॉ.वाणी पालिका निवडणूकीपासून दूर राहिले होते. भाजपाच्या जुन्या कार्यकर्त्यांना उमेदवारीसाठी डावलण्यात आल्याने डॉ.वाणींची नाराजी होती. डॉ.वाणी यांच्या गटाची नाराजी व निवडणुकीत तटस्थ राहण्याच्या पार्श्वभूमीवर आ.उदेसिंग पाडवी यांनी तळोदा पालिकेत भाजपची सत्ता आली नाही तर या पुढे कोणतीही निवडणूक लढणार नाही अशी प्रतिज्ञा केली होती. तळोदा पालिकेवर भाजपचा झेंडा फडकवत एकहाती सत्तांतर घडवून आणले होते. तेव्हापासून तळोदा भाजपमध्ये डॉ.वाणी व आ.उदेसिंग पाडवी यांचे वेगवेगळे गट निर्माण झाले होते. डॉ.वाणी हे मार्केट कमिटीच्या सतत तीन बैठकांना गैरहजर असल्याचे कारण देऊन त्यांना कारणे दाखवा नोटीस बजाविण्यात आली होती. नोटीसचे प्रतिउत्तर न दिल्याने त्यांचे संचालक पद रद्द करण्याचा ठराव सभापती तथा आ.पाडवी यांनी केला होता.. त्याचे उत्तर देत डॉ.वाणी यांनी पत्रकार परिषद घेऊन कायदेशीर संधी न देता पूर्वग्रहदूषित व आकसापोटी कारवाई केल्याने तळोदा कृऊबा समितीचा अर्ज फेटाळल्याबाबत माहिती दिली होती. अश्या विविध कारणांमुळे दूरावा वाढत जावुन दोन गट निर्माण झाले होते. वरिष्ठांनी हा वाद मिटवण्याचा प्रयत्न केला होता. मात्र त्यांना त्यावेळी यश आले नाही. मात्र भाजपा तालुका अध्यक्ष श्याम राजपूत व शहादा तालुका अध्यक्ष किशोर पाटील यांच्या शिष्टाईने केलेल्या सतत प्रयत्नाने दोघे गटांमध्ये समेट घालण्यात यश आले. दरम्यान नवीन वर्षानिमित्त शुभेच्छा देण्याकरिता व वाणी समाजरत्न पुरस्कारानंतर शुभेच्छा देण्यासाठी चक्क आ.पाडवी यांनी त्यांच्या सहकाऱ्यांसमवेत डॉ.वाणींचे निवासस्थान गाठले व शुभेच्छा दिल्या. यावेळी आनंद सोनार, विश्वनाथ कलाल, महेंद्र गाढे आदी उपस्थित होते. आता मात्र नवीन वर्षाचे औचित्य साधून स्वत: आमदारांनी एक पाऊल पुढे टाकत हा दुरावा दूर करण्यासाठी हात पुढे केला आहे. यामुळे आगामी काळात ही सदिच्छा भेट येणाऱ्या वर्षात पक्षासाठी संघटन म्हणून किती उपयुक्त ठरते हे जाणून घेणे औत्सुक्याचे ठरणार आहे..


मंगळवार, १ जानेवारी, २०१९

क्षयरूग्णांची संख्या दोन वर्षात नऊशेने वाढली

२०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त उद्दिष्टावर प्रश्नचिन्ह ; गांभीर्य लक्षात घेऊन उपाययोजना आवश्यक
 क्षयरोग निर्मूलनासाठी शासनाकडून विविध उपाययोजना केल्या जात आहेत. विशेष म्हणजे २०२५ पर्यंत क्षयरोगमुक्त भारताचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. शासन यासाठी पराकोटीचे प्रयत्न करित आहे. असे असले तरी नंदुरबार जिल्ह्यात मात्र क्षयरोगावर नियंत्रण मिळवणे कठीण झाल्याचे चित्र आहे. गेल्या दोन वर्षात अपूर्ण मनुष्यबळ, व सोयीसुविधांचा अभावामुळे जिल्ह्यात क्षयरूग्णांची संख्या तब्बल नऊशेने वाढली आहे.एकीकडे रूग्णसंख्या वाढत असतांना उपचार करून घेणाऱ्यांच्या प्रमाणात मात्र कमालीची घट झाली आहे.. नंदुरबार जिल्ह्यात क्षयरोग असणाऱ्यांचे प्रमाण वाढत असून यामुळे क्षयरोग रोखण्यासाठी अपेक्षित यश मिळत नसल्याचे यातून दिसून येत आहे. भौगोलिक परिस्थिती, अपूर्ण मनुष्यबळ व अत्याधुनिक सुविधांअभावी क्षयरोग नियंत्रणात आणण्यासाठी सेवा देण्यात अनेक अडचणी येत आहेत. आदिवासी समाजामध्ये क्षयरोग होण्याचा धोका सर्वात जास्त आहे. डोंगराळ भाग आणि गरिबीमुळे उपचार करण्यात अडचणी निर्माण होतात. अश्या विविध कारणांमुळे क्षयरोगावर नियंत्रण आणणे अवघड ठरत आहे. सन २०१६ मध्ये शासकीय आकडेवारीनुसार २०१४ क्षयरुग्ण, सन २०१७ मध्ये २०३० तर हेच प्रमाण तब्बल नऊशेने वाढून सन २०१८ मध्ये यंदा खाजगी व शासकीय रुग्णालयातील आकडेवारी नुसार २ हजार ९०३ इतके झाले आहे. सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रातून सर्वेक्षणनंतर नंदुरबार २९६, शहादा ३३०, तळोदा २८४, धडगाव १४७, खांडबारा २९९, अक्कलकुवा १९६, नवापूर २४५, मोलगी १०९ मिळून जिल्ह्यात शासकीय आकडेवारी १ हजार ९०६ तर खाजगी रुग्णालयातील ९९७ एवढी असून जिल्ह्यात एकूण २ हजार ९०३ एवढे क्षयरोगाचे रुग्ण आहेत. २०१२ पासून ते आजपावेतो २१० क्षयरोग रुग्ण हे उपचाराला दाद देत नसल्याचे आढळले असून त्यापैकी ५४ रुग्ण बरे झाले आहेत व ६४ रुग्ण सद्य:स्थितीत उपचार घेत आहेत. दरवर्षी रोजगारासाठी होणारे स्थलांतर यामुळे अनेक रुग्ण उपचार अर्धवट सोडून रोजगारासाठी गुजरातला जातात. आरोग्य विभागाकडून वेळोवेळी क्षयरोगाच्या निर्मूलनासाठी कार्यक्रम राबविताना त्यांना मोफत औषध उपचार उपलब्ध करून दिला जात आहे. दोन उपचार पध्दतीने दर सहा महिन्यांनी रुग्णांची तपासणी केली जाते. तीन महिन्यांत पुन्हा रुग्णांची स्थितीची माहिती घेतली जाते. गावागावात असणाऱ्या परिचारिकांमार्फत सर्वेक्षण कार्यक्रम सुरू असतो. मात्र अपूर्ण मनुष्यबळ, एक्स-रे तंत्रज्ञाचा अभाव, स्वतंत्र इमारत नाही, नादुरुस्त एक्सरे मशीन, आदीं बाबींकडे वरिष्ठांनी लक्ष देणे गरजेचे झाले आहे.. क्षयरोगावर नियंत्रण मिळविण्यासाठी येणाऱ्या समस्या. जिल्हा निर्मितीपासून ते आजपर्यंत जिल्हा सेवा केंद्रासाठी स्वतंत्र इमारत व स्वतंत्र एक्स-रे मशीन नाहीत, इमारतीसाठी प्रस्ताव तयार केला असून डीपीडीसी अंतर्गत मान्यतेसाठी कार्यवाही सुरू असल्याचे वारंवार सांगण्यात येते, अनेक सरकारी रुग्णालयात एक्सरे तंत्रज्ञानाचे पद रिक्त असल्याने आठवड्यात फक्त दोन ते तीन दिवस एक्सरे काढले जातात. त्यासाठी मोबाईल एक्सरे व्हॅनची व्यवस्था करण्यासाठी उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे.सुधारीत राष्ट्रीय क्षयरोग कार्यक्रमाअंतर्गत ३१ पदे मंजूर असून २९ पदे भरलेली आहेत. सदर सर्व पदे कंत्राटी पध्दतीने भरण्यात आलेली आहेत. त्यापैकी मोलगी क्षयरोग उपचार पथकासाठी एक प्रयोगशाळा पर्यवेक्षक व जिल्ह्यासाठी चार क्षयरोग प्रयोगशाळा तंत्रज्ञानाची आवश्यकता आहे. सदर कर्मचारी अत्यंत तोकड्या मानधनावर गेल्या १८ वर्षापासून काम करीत असून त्यांना कोणता ही विमा संरक्षण दिले जात नाही.. खाजगी व शासकीय रुग्णालयात निष्पन्न झालेल्या रुग्णांना १०० टक्के उपचाराखाली घेत असून सर्वांना शासकीय योजनेचा लाभ उपलब्ध करून दिला जात आहे. अत्याधुनिक क्षयरुग्ण निष्पन्नासाठी २ मशीने उपलब्ध करून देण्यात आली आहेत. २०२५ पर्यंत भारत क्षयरोगमुक्त होणार आहे. यासाठी प्रयत्न सुरू आहेत.. डॉ. अभिजित गोल्हार. जिल्हा क्षयरोग अधिकारी, नंदुरबार.


बुधवार, २६ डिसेंबर, २०१८

मद्यधुंद बसचालकाची अनकंट्रोल ड्रायव्हिंग

आमलाडजवळ बस फरशी पूलावर आदळल्याने फुटले तीन टायर; प्रवाशांचा थरकाप, कारवाईची मागणी
मद्याने चिंगाट झालेल्या बसचालकाने झिंगाट होवून भरधाव वेगाने सुसाट बस पळविली. प्रवाशी आमचे दैवत असे ब्रीद मिरविणाऱ्या परिवहन महामंडळाच्या या चालकाने वाहन चालविण्याच्या या चित्तथरारक सर्कसमुळे बसमधील सुमारे ४५ प्रवाशांचा जीव भांड्यात पडला. सरळ महामार्गावरही नागमोडी घिरट्या घालणारी बस शेवटी आमलाडजवळील एका पूलावर आदळली अन बसचे एक-दोन नव्हे तर तीन टायर फुटल.ेमात्र तरीही मद्यधुंद चालकाची शुध्द हरपलेलीच. बऱ्हाणपूर-अक्कलकुवा बसने प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी शहादा ते तळोदा प्रवासादरम्यान हा थरार अनुभवला. काहींनी तर चक्क मृत्यूच समोर पाहिल्याचे सांगितले. यामुळे प्रवाशांचा जीव धोक्यात घालणाऱ्या या मद्यप्रिय बसचालकावर कारवाईची मागणी करण्यात येत आहे.. महाराष्ट्र परिवहन महामंडळाच्या काही वाहनचालकांचे कारनामे बऱ्याचदा ऐकण्यात येतात. काहीसा असाच प्रकार गुरूवारी घडला. बऱ्हाणपूर-अक्कलकुवा बसच्या चालकाने मद्य प्राशन करून प्रवाशांच्या जीवाशी खेळ केला. शहादा येथून तळोदा येथे सदर वाहन येत असताना त्या वाहनात साधारण ४० ते ५० प्रवाशी बसले होते. दरम्यान आमलाड नजीक तोल जाऊन फरशी पुलाच्या कठड्यावर एसटी आदळली. त्यात या वाहनांचे ३ टायर जागीच फाटले तर एका चाकाची अक्षरश रिंग बाहेर आली. कसेबसे करत
 वाहनांवर नियंत्रण मिळविले मात्र तोपर्यंत प्रवाशांचा जीव भांड्यात पडला होता. प्रवाशांचा थरकाप उडाला. सुदैवाने जीवितहानी टळली. दरम्यान याबाबत वाहन चालकाला विचारणा केली असता एस टी पंक्चर झाल्याचे कारण सांगत अरेरावीदेखील केल्याचे प्रवाशांनी सांगितले. शहादा ते तळोदा दरम्यान २ ते ३ ठिकाणी या बसचा अपघात होता होता वाचला. अक्कलकुवा आगाराच्या वाहन चालकाकडून प्रवश्यांशी अरेरावी करण्याबाबत वेळोवेळी तक्रारी येतात. मात्र आगार प्रशासनाकडून बेशिस्त व बेजबाबदार चालकांवर कारवाई होत नसल्याने या प्रकारात वाढ होत आहे. तर अक्कलकुवा आगाराच्या बसेस खरंच सुरक्षित आहेत का? असा सवाल उपस्थित केला जात आहे. तर रस्त्याची झालेली दुुरावस्था त्यावर मद्यपान करून बेजबाबदारपणे वाहन हाकणाऱ्या त्या वाहन चालकांवर कारवाई करावी अशी एकच मागणी यावेळी प्रवाशांकडून करण्यात आली..

शनिवार, २२ डिसेंबर, २०१८

बोरदला घरफोडी ; दागिन्यांसह पावणे नऊ लाखाचा ऐवज लांबविला

 ग्रामीण भागातील वाढत्या चोऱ्या पोलिसांपुढे ठरताय आव्हान 21 Nov 2018FrontpageImage ViewPrintMailClose Button AAA बोरद तालुक्यातील सर्वात मोठे गाव आहे. गावात पोलिस दुरक्षेत्र असून ३८ लहान-मोठे गावे जोडली आहेत. केवळ ४ पोलिस कर्मचाऱ्यांवर दुरक्षेत्राची जबाबदारी आहे. त्यापैकी अनेकदा काहींना काही कारणास्तव ते रजेवर राहत आहेत. पोलिस नियमित दुरक्षेत्रावर उपस्थित राहत नसल्याच्या फायदा चोरटे घेत आहेत. गावात दुकाने फोडणे, घरफोडी, व्यापारी लुटीच्या घटना, शेतातील मोटारी, केबल चोरी होणे, वाहने चोरी होणे आदीं घटनांमध्ये वाढ झाली आहे. वरिष्ठांना याबाबत कल्पना देऊनही पोलिस कर्मचारी हजर राहत नसल्याने ग्रामस्थांकडून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे. चोरांनी सध्या ग्रामीण भागाला लक्ष केले असून सातत्याने ग्रामीण भागात होत असलेल्या चोऱ्या पोलिसांपुढे आव्हान ठरत आहेत.. बोरद : तळोदा तालुक्यातील बोरद येथील लक्ष्मण पाटील यांच्या घरात प्रवेश करुन कपाटात ठेवलेले तब्बल ८ लाख किंमतीचे २६ तोळे सोन्याचे दागिने व ७५ हजार रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरुन नेल्याची घटना घडली आहे. चोरीच्या घटनेनंतर गावात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून ग्रामीण भागातील वाढत्या चोऱ्या पोलिसांपुढे आव्हान ठरल्या आहेत. . तळोदा तालुक्यातील बोरद गावात कुंभार गल्लीत राहणाऱ्या लक्ष्मण यशवंत पाटील हे आपल्या पत्नीला सुरत येथे दवाखान्यात तपासणीसाठी घेऊन गेले होते.चोरट्यांनी संधी साधत दि.२० रोजी पहाटे २ ते ४ च्या सुमारास घराचा दरवाजाला लावलेले कुलूप टॉमीने तोडून आत प्रवेश केला. कपाटात ठेवलेले ११ तोळे सोन्याच्या बांगड्या, ५ तोळ्याचा राणी हार, अडीच तोळे वजनाच्याअंगठ्या, ३ तोळे बाजूबंद, अडीच तोळे वजनाची सोनसाखळी, २ तोळे कानातील दागिने, ३० भार चांदी असे दागिने व कापूस विक्रीतून आलेले ७५ हजार रुपये इतकी रोख रक्कम चोरट्यांनी लंपास केली आहे. सकाळी शेजारील महिला तुळसीला पाणी घालत असतांना लक्षात आल्याने घरमालकास माहिती दिली. सुरतहून परत आल्याने पोलिस स्टेशन गाठले. काल रात्री पोलिसात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. ठसे तज्ञ व श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. श्वानने घरापासून तळोदा रस्त्यावर महादेव मंदिर पर्यंत रस्ता दाखविला..


पूर्वसूचना न देता अतिक्रमण काढण्यावरून वाद.

पूर्वसूचना न देता अचानक बुलडोझर लावून अतिक्रमण काढण्यावरून अतिक्रमण धारक
 व अतिक्रमण काढण्यासाठी आलेल्या अधिकाऱ्यांमध्ये धकाबुकीं झाल्याचा प्रकार घडला, वाद विकोपाला जाऊ नये याकरिता लोकप्रतिनिधी पोलीस अधिकारी यांच्या समनव्याने वाद मिटवण्यात यश आले. तळोदा शहरात अतिक्रमण वाढत आहे. परिणामी समस्येत वाढ होत आहे. नगराध्यक्ष अजय परदेशी यांनी येत्या जानेवारी पावेतो पालिकेचा कारभार जुन्या इमारतीतून नवीन इमारतीत होणार असल्याचा आश्वासन वजा दावा केला आहे. सध्या पालिकेच्या इमारतीचे काम अंतिम टप्यात आले आहे. मात्र या भागात येणाऱ्या रामगड या परिसरात अतिक्रमनात वाढ होत आहे. याबाबत स्थानिक रहवाश्यकडून उदभवनाऱ्या समस्यांबाबत तक्रारी करण्यात येत आहेत. यावर मार्ग काढण्यासाठी पालिकेचे कर्मचाऱ्यांनी दोन ते तीनवेळा सम्बधित अतिक्रमण धारकास तोंडी सूचना केल्या मात्र या सूचनां झुगारून लावण्यात आले. 2011 नंतरच्या अतिक्रमनांवर हातोडा चालविण्याचा शासकीय आदेशंव्ये व मुख्याधिकारी यांना प्रक्षेपण, अतिक्रमण किंवा अडथडा नोटीस न देता अतिक्रमण काढून टाकण्याचा अधिकारांव्ये सकाळी 10 वाजे दरम्यान जेसीबी आणून पूर्व सूचना न देता पालिकेडकून अतिक्रमण काढण्यास सुरुवात केली. याठिकाणी अतिक्रमण करून राहत असलेल्या इम्रान निसार अन्सारी यांच्या घरावर जेसीबी लावून पत्र्याचे शेड जमीन
 दोस्त करण्यास सुरुवात केली. अचानक करण्यात आलेल्या या कारवाईमुळे त्या जागेवर राहणाऱ्या कुटुंबिय बेघर झाल्याच्या भीतीने त्यांनी पालिका कर्मचाऱ्याचा विरोध केला विरोध झुगारून लावण्याच्या प्रयत्नात अतिक्रमन धारक कुटुंबीय व अधिकाऱ्यांनी शाब्दिक चकमक होऊन त्याचे पर्यावसान हातापाईत झाले. दरम्यान रामगडमध्ये केवळ आमच्याच घरावर कारवाई का असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला असता सर्वच अतिक्रमण धारकांचे अतिक्रमण काढणार असल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले. त्यावेळी रामगड उठवण्यात येत असल्याची अफवा पसरवून बेघर होण्याच्या भीतीने स्थानिक महिला अधिकाऱ्यांच्या अंगावर चाल करून आल्याची घटना घडली. अचानक केलेल्या कारवाईबद्दल या भागातील रहवाशीकडून रोष प्रगट केला. तर अतिक्रमित जागेवरील अतिक्रमण काढण्यासाठी नोटीस देणे बंधनकारक नसल्याचा दावा मुख्याधिकारी जनार्दन पवार व पथकातील अधिकाऱ्यांनी यावेळी केला. दरम्यान अतिक्रमण धारक व पालिका प्रशासन या दोघांनी एकमेकांविरोधात पोलीसात धाव घेतली. यावेळी आजी माजी नगरसेवक, व पोलीस प्रशासनाच्या मध्यस्थितीने पोलीस ठाण्यात बैठक घेवुन वाद संपुष्टात आणण्यात यश आले. यावेळी मुख्याधिकारी जनार्दन पवार, बांधकाम विभाग अभियंता गावित, नारायण चौधरी, पोलीस निरीक्षक नितीन चव्हाण, नगरसेवक अमानोदीन शेख, रामानंद ठाकरे, माजी नगरसेवक कलु अन्सारी, योगेश चौधरी, कलु अन्सारी, आदी उपस्थित होते. दरम्यान रामगड परिसरातील महिलांनी घेतलेल्या आक्रमक पवित्र्यामुळे पालिकेला नमते घावे लागल्याचे समजते.. *चौकट* सार्वत्रिक निवडणूका 2018 च्या वाचनाम्यात रामगड भागात पालिकेच्या मालकी जागेवर झोपडी वजा घरे असणाऱ्या कुटुंबियांना हक्काचे घरे उपलब्ध करून देण्यासंदर्भात भाजपच्या वचन नाम्यात रामगडचा मुद्दा ठडक होता त्यामुळे आता वचनपूर्ती करत असताना सत्ताधाऱ्यांना येणाऱ्या काळात अतिक्रमण सारख्या विषयावरून विरोधाचा सामना करावा लागणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान आमदार उदेसिंग पाडवी नगराध्यक्ष अजय परदेशी उपनगराध्यक्ष भाग्यश्री चौधरी यांच्या प्रयत्नातून त्याठिकाणी घरकुल सारख्या योजनेतून अतिक्रमण धारकांना हक्काचे घर मिळण्यासाठी नगरविकास खात्याकडे व प्रशासन पातळीवर पाठपुरावा सुरू आहे.

शुक्रवार, २१ डिसेंबर, २०१८

पोलिस कर्मचारी, राजकीय कार्यकर्त्यांना अभय का?

दुचाकी चालकांवरील कारवाईत दुजाभाव तळोद्यातील वाहतूक कारवाईचे स्वागत ;
 दै. पुण्यनगरीच्या वृत्तानंतर तळोदा पोलिसांकडून शहरात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला जात आहे. शहरभर बेशिस्त वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारणाऱ्या तळोदा पोलिसांनी आधी स्वत:च्याच कार्यालयातील सहकाऱ्यांच्या वाहनांची तपासणी करणे गरजेचे झाले आहे. कित्येक पोलिस कर्मचाऱ्यांच्या फॅन्सी नंबर प्लेट वाहतूक शिस्तीसाठीच्या या कारवाईवर प्रश्नचिन्ह निर्माण करीत आहेत. एवढेच काय तर तळोदा शहरात राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांच्या वाहनांना नंबर ऐवजी केवळ पक्षाचे चिन्ह वापरून नियमांची पायमल्ली करण्याचा प्रकार पाहवयास मिळत असल्याने पोलिसांकडून कारवाईत दुजाभाव केला जात असल्याची चर्चा रंगत आहे. . ...आणि मोबाईल घेऊन दुचाकीवरुन केला पोबारा . तळोदा येथील तलावडी रोझवा रस्त्यावरुन महत्वाचा फोन करण्याच्या बहाण्याने मोबाईल मागून फोन न करताच मोबाईल घेऊन दुचाकीवरील दोघांनी पोबारा केला. . काल सायंकाळी ७ वाजेच्या सुमारास येथील पत्रकार रमेशकुमार भाट हे नियमितपणे तलावडी रोझवा रस्त्यावर शतपावलीसाठी गेले होते. यावेळी त्यांना दुचाकीवरुन येणाऱ्या दोघांनी एक महत्वाचा फोन करायचा आहे, असे सांगून मोबाईल देण्याची विनंती केली. यावेळी रमेशकुमार भाट यांनी माणूसकी जपत दुचाकीवरील दोघांना मोबाईल दिला खरा मात्र त्यांनी कोणालाही फोन न करता सरळ दुचाकी सुरु करुन धूम ठोकली. यावेळी भाट यांनी त्यांना आरोळ्या दिल्या. मात्र दुचाकीवरील दोघेही सूसाट वेगाने मोबाईल घेऊन निघून गेले. काल रात्री उशिराने तळोदा पोलिस ठाण्यात याबाबत तक्रार दाखल करण्याचे काम सुरु होते. . रेडियम नंबर प्लेट बनविणाऱ्या व्यावसायिकांना पोलिस प्रशासनाने कायद्याचा जोर दाखवल्यास नंबर प्लेट नियमानुसार तयार केल्या जातील. तसेच फॅन्सी नंबर प्लेट असलेल्या वाहनांच्या कारवाईत सातत्य असल्यास याचे प्रमाण कमी होण्यास मदत होईल. गाडी चोरीस जाणे, दुचाकीवरून येऊन अंगावरील दागिने हिसकावून घेऊन जाणे. अश्या घटनांमध्ये फॅन्सी अथवा विनाक्रमांक असलेल्या नंबर प्लेटचे वाहने वापरलेले आढळून आली आहेत. परिणामी अश्या वाहनांचा शोध घेणे पोलिसांपुढे आव्हानं ठरते.. वाहनांचा नंबर प्लेटवर नंबर व्यतिरिक्त काहीही लिहणे हा कायद्याने गुन्हा आहे. मात्र तळोद्यात या नियमांचे सर्रास उल्लंघन केले जात आहे. कायद्याचे पाईक असणारे पोलिसच कायदा मोडीत काढत आहेत. यामुळे पोलिसांची भूमिका लोका सांगे ब्रम्हज्ञान, स्वत: मात्र कोरडे पाषाण अशी दिसू लागली आहे. शहर व ग्रामीण भागातील वाहनधारकांनी खिशाला ढिल देत नियम खिश्यात घातले आहेत. फॅन्सी नंबर प्लेट, दादा, भाऊ, आप्पा यासह वाहनांवर पोलिस व प्रेस लिहिलेले व त्या विभागाशी संबंध नसलेल्या वाहने तसेच पुढाऱ्यांचा वरदहस्त लाभलेले कार्यकर्ते वाहनांवर पक्षाच्या चिन्हासह तोऱ्यात शहरभर मिरत आहेत. कायद्याची भीती नसलेल्या वाहनधारकांनी ओन्ली माय रुल्स असे लिहून जणू पोलिसांना उघडपणे आव्हानच दिले आहे. फॅन्सी नंबरप्लेट लावणाऱ्या हौश्या नवश्याची संख्या वाढली असून त्यांना पोलिसांचा धाकच नाही. पोलिसांच्या समोरूनच ते बिनधास्तपणे सुसाट वाहने चालविताना दिसतात. पण त्यांच्यावर कठोर कारवाई होताना मात्र दिसत नाही. परिणामी अल्पवयीन व शाळकरी मुले मुली सुसाट वाहने चालवून जीव धोक्यात घालताना दिसत आहेत. कायदा पायदळी तुडवणाऱ्या वाहनचालकांवर धडक कारवाईची अपेक्षा व्यक्त होत आहे. दै. 'पुण्यनगरी'च्या वृत्तानंतर पोलिस प्रशासनाने कारवाईचा बडगा उचलला आहे. या कारवाईमुळे आजच्या घडीला तळोदा शहरातील वाहतूक बऱ्यापैकी सुरळीत झाली आहे. हातगाडीवाले, रस्त्यात पार्किंग करणाऱ्यांवर पोलिसांची करडी नजर आहे. पोलिस अधीक्षक यांनी वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कठोर कारवाईचा आदेश दिला आहे. मात्र चक्क पोलिसांकडून या नियमांची पायमल्ली होत असल्याने खंत व्यक्त करण्यात येत आहे. .

शनिवार, १५ डिसेंबर, २०१८

पोलिसांच्या दुर्लक्षामुळे तळोद्यातील वाहतुकीचे तीनतेरा

तळोदा शहरातील वाहतूक व्यवस्था कोलमडली असून वाहनचालक रस्त्याच्या मध्यभागीच वाहने उभी करीत असल्याने सामान्य नागरिकांना विविध अडचणींना तोंड द्यावे लागत आहे. तळोदा पोलिसांनी बेशिस्त वाहतुकीला लगाम लावाला अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे.. तळोदा शहर हे तालुक्याचे ठिकाण असून शहरात विविध कार्यालये असल्याने ग्रामीण भागातील ग्रामस्थ विविध कामानिमित्त व बाजार करण्यासाठी नियमित शहरात येत असतात. शहरातील स्मारक चौक, बसस्थानक परिसर, आनंद चौक, कॉलेजरोड, बँक परिसर, भाजी मंडई आदी भागात नेहमीच नागरीकांची वर्दळ असते. शहरातील वाढती वाहनांची संख्या, वाढते अतिक्रमण, बायपासचे भिजते घोंगडे, जूने अरुंद रस्त्यांमुळे वारंवार वाहतूकीचा प्रश्न निर्माण होत आहे. दरम्यान हातोडा पूल सुरु झाल्यापासून शहरातून परिवहन मंडळाचा बसेस जात असल्याने स्मारक चौक व तर वर्दळीच्या ठिकाणी वाहतूक ठप्प होत असून पोलिसांच्या माध्यस्थीशिवाय वाहतूक सुरळीत करणे शक्य होत नसल्याची सध्याची स्थिती आहे. अनेकवेळा नंदुरबारकडे जाणारी व तळोदाकडे येणारी बस एकाचवेळी येत असल्याने एकच गलका करतात. तळोदा शहराला केवळ चार वाहतूक पोलिस देण्यात आले असून ते केवळ स्मारक चौकात दिसून येतात. यामुळे वाहतूक व्यवस्थेचे तीनतेरा वाजले असून वाहनधारकांवर पोलिसांचा वचक राहिलेला नाही. बाजारपेठेत आलेले ग्राहक आपली वाहने रस्त्यावर कुठेही उभे करतात. मुख्य रस्त्यावर वारंवार वाहतूक कोंडी होत आहे. पालिकेमार्फत पार्किंगची सुविधा उपलब्ध नसल्याने हा कोंडीचा प्रश्न निर्माण होत आहे. त्यातच भाजीविक्रेते, फळ विक्रेते व इतर व्यावसायिक भर रस्त्यावर अतिक्रमण करीत आहे. परिणामी रस्ता अरुंद होऊन वाहने जाण्यास जागाच उरत नसल्याची स्थिती निर्माण होते. त्यामुळे अनेकवेळा सर्वसामान्यांना वाद-विवादांना सामोरे जावे लागत आहे. यामुळे अपघातांच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पोलिसांच्या निष्क्रीयतेने अवैद्य वाहतूकीने डोके वर केले असून शिस्त बिघडली आहे. अवैध वाहतूक करणारे वाहनचालक क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी नेत असतांना रस्त्याच्या मधोमध वाहने उभी करीत असल्याने वाहतूकीची कोंडी होत आहे. मुख्य रस्त्यावर कुठेही नो पार्किंगचा बोर्ड लावण्याची तसदीही पोलिस प्रशासन घेत नाही. पालिकेने यापूर्वी रस्त्यावर पांढऱ्या रंगाचे पट्टे मारले होते. मात्र सद्यस्थितीत ते पट्टे अदृश्य झाले आहेत. याबाबत पालिका व पोलिस प्रशासनाने वाहतूकीची समस्या सोडविण्याची मागणी करण्यात येत आहे. . सध्या ऊसतोडीचा हंगाम सुरू आहे. दिवसभरातुन उसाने भरलेले अवजड वाहने शहराबाहेरील बायपास मार्गाचा वापर न करता सरळ शहरातून जातात. रस्त्यावर असलेले गतिरोधक तसेच वळण मार्गामुळे अपघाताची शक्यता निर्माण होते. अवजड वाहनांना अंकलेश्वर-बऱ्हाणपूर (बायपास) मार्गाचा अवलंब केल्यास काही प्रमानात का असेना वाहतूक सुरळीत होण्यास मदत होईल. तर टॅक्सी चालकांना वीजवितरण कार्यालयाच्या मागील बाजूला तयार करण्यात आलेल्या रस्त्याचा वापर केल्यास वाहतूक सुरळीत होण्यास मदत होणार आहे.


शुक्रवार, ३० नोव्हेंबर, २०१८

विविध कार्यक्रमांनी ॲड.वळवींचा वाढदिवस साजरा

कार्यकर्त्यांनी केली लाडूतुला ; अभिष्टचिंतनासाठी दिवसभर चाहत्यांची गर्दी राज्याचे माजी क्रीडा मंत्री तथा जिल्ह्याचे माजी पालकमंत्री पद्माकर वळवी यांच्या वाढदिवसानिमित्त तळोदा शहर व तालुका काँग्रेस कमिटीच्यावतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. सकाळपासून जिल्हाभरातून कार्यकर्त्यांनी शुभेच्छा देण्याकरीता गर्दी केली होती. कार्यकत्यांर्च्यावतीने ॲड.वळवी यांचा भव्य सत्कार व लाडूतुला करण्यात आली.. ॲड. पद्माकर वळवी यांच्या वाढदिवसानिमित्त काल सकाळी ९ वाजता तळोदा उपजिल्हा रुग्णालयात फळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला. तसेच त्यांच्या निवासस्थानी नगरपालिका महिला कर्मचाऱ्यांना साडी वाटप करण्यात आले. सकाळी ११ वाजता हातपंप दुरुस्ती पथक व रिक्षांचे लोकार्पण करण्यात आले. शहर व तालुक्यातील प्रतिनिधी, पदाधिकारी कार्यकर्त्यांसह राजेंद्र गावित, दीपक पाटील, मकरंद पाटील, शिरीष नाईक, लक्ष्मण माळी, भरत माळी यांच्यासह जिल्ह्याभरातून नेते मंडळी व कार्यकर्ते उपस्थित होते. प्रा.विलास डामरे व कार्यकर्त्यांनी ॲड.वळवी यांची लाडूतुला केली. वजन काट्याच्या एका पारड्यात ॲड.वळवी व दुसऱ्या बाजूला त्यांच्या वजनांएवढे लाडू ठेवण्यात आले होते. यानंतर लाडू वाटप करुन वाढदिवस साजरा करण्यात आला. वाढदिवसाप्रसंगी जि.प.उपाध्यक्ष सुहास नाईक, प्रतोद संजय माळी, तालुकाध्यक्ष रोहिदास पाडवी, शहराध्यक्ष गौरव वाणी, प्रा.विलास डामरे, शहादा-तळोदा मतदार संघाचे समनव्यक योगेश मराठे, नगरसेवक सुभाष चौधरी, हितेंद्र क्षत्रिय, मोती बॅँकेचे चेअरमन निखिल तुरखिया, भाजपा प्रदेश सदस्य डॉ.शशिकांत वाणी, के.डी.पाटील, कृषी उत्पन्न बाजार समितीचे रवि राऊळ, जितेंद्र माळी, सतिवान पाडवी, शिंदखेड्याचे नगरसेवक दीपक अहिरे, आदिवासी विद्यार्थी संघटना विभागीय अध्यक्ष रोशन गावित, मंगलदास सुर्यवंशी, युवराज पवार, सुनिल सोनवणे, राजेश मालचे, सामाजिक कार्यकर्ते संदिप परदेशी, माजी सभापती आकाश वळवी, माजी उपसभापती नंदुगीर गोसावी, दिवाकर पवार, दीपक मोरे, नरहर ठाकरे, गौतम जैन, साहेबराव चव्हाण, प्रकाश ठाकरे, अनिल माळी, अरविंद पाडवी, पंकज राणे, बापू कलाल, कुणाल चौधरी, अरविंद मगरे, शांताराम पाडवी, अंबालाल चव्हाण, भाऊदादा पाडवी, अमृत पावरा, गोविंदा पाडवी, मुकुंदा गुरव, दगुलाल माळी, भागीराम पाडवी, भट्यादादा पाडवी, सईद पठाण, नरेश चौधरी, असलम पिंजारी, इस्माईल शेख, योगेश पाडवी, भगवान पाडवी, राजकुमार पाडवी, सुरेश इंद्रजीत, वेस्ता पावरा आदींसह ग्रामीण भागातील सरपंच, सदस्य व कार्यकर्ते मोठ्या संख्यने उपस्थित होते..


मंगळवार, २७ नोव्हेंबर, २०१८

२६/११ घटनेतील वीरांच्या शौर्यगाथेचे स्मरण तळोद्यातील तरुणांनी सायकल रॅली काढून वाहिली शहिदांना श्रध्दांजली

२६ नोव्हेंबर २००८ च्या मुंबई हल्ल्यातील शहिद वीर पोलिस व जवानांना आदरांजली देण्यासाठी उनपदेव ते तळोदा सायकल यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. दरम्यान शहादा येथे पोलिसांच्या वतीने वीर जवानांना आदरांजली वाहण्यात आली.. २६ नोव्हेंबर २००८ चा मुंबईवरील पाकिस्तानी दहशतवाद्यांनी केलेला एक भीषण हल्ला होता. २६ नोव्हेंबर ते २८ नोव्हेंबर दरम्यान चाललेल्या या हल्ल्यात ३४ परदेशी नागरिकांसह सुमारे १९७ जण ठार झाले. तर ८०० पेक्षा अधिक लोक जखमी झाले. मुंबईच्या इतिहासातील महाभयंकर अशा या हल्ल्यात मुंबई पोलिस व भारतीय सुरक्षा दलांनी ९ दहशतवाद्यांना कंठस्नान घातले होते. मात्र, या घटनेत १७ पोलिस व वीर जवानांना आपल्या प्राणाची आहुती द्यावी लागली होती. या शहिद वीर जवान व पोलिस यांच्या शौर्यगाथेचे स्मरण करून त्यांच्या कार्याबद्दल सहानुभूती व्यक्त करण्यासाठी तसेच त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी तळोदा
येथील भन्साली व्यापारी संकुलातील सर्व व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने २५ नोव्हेंबर रोजी सकाळी उनपदेव या तीर्थस्थळापासून ते तळोदा पर्यंत सायकल यात्रा काढली. वीर जवान अमर रहे, भारत माता की जय अशा घोषणा देण्यात आल्या. या सायकल यात्रेत डॉ.लक्ष्मीकांत गिरणार, जितेंद्र कलाल, तळोदा पत्रकार संघाचे अध्यक्ष सुधाकर मराठे, प्रकाश मराठे, अमित कलाल, निखिल केदार, राकेश मराठे, मानसिंग गिरासे, रवि मराठे, प्रमोद चौधरी, हेमंत चौधरी, विक्रांत पाटील, महेंद्र लोहार, कल्पेश पाटील, बंटी कोळी, विक्की कोळी, गजेंद्र परदेशी, शुभम जोहरी, लक्ष्मण पाटील, पारस पाटील, लखन पाटील, संदीप गुरव आदिसह २५ जण सायकल यात्रेत  सहभागी होते. रम्यान शहादा येथील तहसील कार्यालय परिसरात शहीद वीरांना कॅन्डल लावून पुष्पहार अर्पण करण्यात आला. यावेळी उपविभागीय पोलिस अधीक्षक पुंडलिक सपकाळे, मनलेश जयस्वाल, गोपाळ गांगुर्डे, बजरंग ग्रुपचे सहकारी आदीसह शहादा शहरातील मान्यवर उपस्थित होते. बोरद, म्हसावद या ठिकाणी वीर जवानांना श्रध्दांजली वाहण्यात आली. कार्यक्रमाचा समारोप तळोदा येथे स्मारक चौकात करण्यात आला. या ठिकाणी पोलिस प्रशासनाकडून शिीदांना श्रध्दांजली अर्पण करीत सायकल यात्रेकरूंचा सन्मान करण्यात आला. यावेळी पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण, नगराध्यक्ष अजय परदेशी, नगरसेवक हेमलाल मगरे, अनुप उदासी, सुनिल सुर्यवंशी आदी उपस्थित होते. यावेळी नगराध्यक्ष अजय परदेशी, पोलिस निरीक्षक नितीन चव्हाण, अक्षय कलाल यांनी मनोगत व्यक्त केले.




 
 







गुरुवार, २२ नोव्हेंबर, २०१८

पत्रकारितेचे शस्त्र समाजातील धगधगत्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी करा अनिल चव्हाण :

 तळोदा तालुका पत्रकार संघातर्फे आयोजित कार्यशाळेत मार्गदर्शन सकारात्मक
 पत्रकारिताकडे कल द्या, आपल्या सकारात्मक वृतांमुळे समाजात ऊर्जा निर्माण होते. माती अन माणसाची बातमी केल्यास ती हृदयस्पर्शी ठरते. सोशल मिडीयाच्या वाढता प्रकोप पाहता बातमीदाराने जबाबदारी लक्षात घेऊन वास्तव पत्रकारिता करण्याचा दृष्टिकोन ठेवावा, असे मत धुळे येथील एस.एस.व्ही.पी.एस महाविद्यालयातील पत्रकारिता विभाग प्रमुख तथा पत्रकार अनिल चव्हाण यांनी व्यक्त केले. . तळोदा तालुका मराठी पत्रकार संघातर्फे जिल्हास्तरीय एकदिवसीय कार्यशाळेचे आयोजन तळोदा महाविद्यालयात करण्यात आले होते. कार्यक्रमाची सुरुवात बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमा पूजनाने करण्यात आली. कार्यशाळेला प्रमुख मार्गदर्शक
 म्हणून धुळे येथील एस.एस. व्ही.पी.एस महाविद्यालयातील पत्रकारिता विभाग प्रमुख तथा जेष्ठ पत्रकार अनिल चव्हाण, इलेक्टॉनिक्स मिडीयाचे पत्रकार प्रशांत परदेशी होते. याप्रसंगी पत्रकार हिरालाल चौधरी, बळवंत बोरसे, निलेश पवार, भिकेश पाटील, धनराज माळी, जयप्रकाश डिगराळे, रमेशकुमार भाट, मंगेश पाटील आदी उपस्थित होते. यावेळी अनिल चव्हाण म्हणाले की, पत्रकारिता हे शस्त्र असून त्याचा वापर समाजातील धगधगत्या प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी करा, असे सांगत पत्रकारांची भूमिका, बातमी म्हणजे काय?
लेख, वार्तापत्र, अग्रलेख म्हणजे काय? पत्रकारांची जबाबदारी आणि त्यातील बारकावे, इलेक्ट्रॉनिक मिडीया आणि प्रिंट मिडीया यातील बदलते प्रवाह यासह विविध पत्रकारितेचे बदलते संदर्भ व इतिहास अश्या विविध विषयाबाबत त्यांनी सखोल माहिती दिली. प्रशांत परदेशी म्हणाले की, सध्याची पत्रकारिता गतिमान झाली आहे. क्षणातच ई-पेपरच्या माध्यमातून वृत्त प्रत्येकापर्यंत पोहचत आहे. अफवा असलेले वृत्त तसेच खऱ्या-खोट्या बातम्यांची शहानिशा करणे हे आव्हान पत्रकारितेत निर्माण झाले आहे. यामुळे भविष्यात पत्रकारितावर देखील आचारसंहिता लादली जाण्याची शक्यता त्यांनी वर्तवली. डिजिटल युगात संवादाची साधने वाढली असली तरी संवाद मात्र कमी झाली असल्याची खंत त्यांनी यावेळी व्यक्त केली. कार्यशाळेत शहादा, अक्कलकुवा ,नंदुरबार, दोंडाईचा, तळोदा, धडगाव तालुक्यातील व ग्रामीण भागातील पत्रकार उपस्थित होते. सुत्रसंचालन फुंदीलाल माळी यांनी केले. प्रास्ताविक सुनील सूर्यवंशी यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी संघाचे अध्यक्ष सुधाकर मराठे, सचिव सम्राट महाजन, उपाध्यक्ष नरेंद्र चौधरी, कोष्याध्यक्ष चेतन इंगळे आदींसह सदस्यांनी परिश्रम घेतले..





शनिवार, १७ नोव्हेंबर, २०१८

तळोद्याच्या भाग्यश्री मगरेला दुबईत नोकरीची संधी

तळोदा येथील मध्यमवर्गीय कुटुंबातील कन्या व मोशन इ्स्टिटट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज जळगांवची विद्यार्थिनी भाग्यश्री उल्हास मगरे हिची इंटरनॅशनल प्लेसमेंट होऊन दुबई येथील हॉस्पिटलमध्ये एच.आर.असिस्टंट मैनेजर पदावर नियुक्ती झाली आहे. . भाग्यश्री हीचे बारावी पर्यंतचे शिक्षण तळोदा येथे झाले आहे. त्यानंतर जळगांव येथुन बी.ई.बायोटेक केल्यावर उत्तर महाराष्ट्र विद्यापीठातून एम.टेकचे उच्चशिक्षण घेतले आहे. नॅशनल इ्स्टिटट्यूट ऑफ रिसर्च नागपूर येथे संशोधनाची संधी मिळाली असता तिच्या तेथील संशोधन प्रबंधला अमेरिकेतील इंटरनॅशनल सायन्स जर्नलने जगभर प्रसिद्धी देऊन गौरव केला असून सुवर्णपदक विजेती ठरली आहे. सध्या ती मोशन इ्स्टिटट्यूट ऑफ मॅनेजमेंट स्टडीज जळगांव येथे हेल्थकेअर मॅनेजमेंटचे शिक्षण घेत आहे. या निवड प्रक्रियेत पात्र होऊन संयुक्त अरब अमिरातीत दुबई स्थित प्रथितयश अश्या इंटरनॅशनल मॉडर्न हॉस्पिटल मध्ये एच.आर.असिस्टंट मॅनेजर म्हणून तिची नियुक्ती झाली आहे. तळोदा सारख्या एका लहानश्या गांवातील सर्वसामान्य कुटुंबातील मुलीची इंटरनॅशनल प्लेसमेंट होऊन तिला परदेशात नोकरीची संधी मिळाल्याबद्दल मिम्स जळगांवचे संचालक नितीन पाटील, संचालिका शैलजा पाटील तसेच तळोदा शहरातील अनेकांनी कु.भाग्यश्रीचे कौतुक केले आहे. भाग्यश्री ही तळोदा येथील दै.'पुण्यनगरी' चे प्रतिनिधी व कन्या विद्यालयात कार्यरत उल्हास मगरे व सौ .नीलिमा मगरे यांची कन्या आहे. आजोबा माजी प्राचार्य स्व.एन.सी.मगरे यांची प्रेरणा व माझ्या प्रत्येक पावलाला माझ्या आजीने, आईवडिलांनी दिलेला पाठिंबा महत्त्वाचा ठरला. त्यांनी मला कधीही इतरांच्या वाटेने जाण्याचा आग्रह केला नाही. माझी वाट मला निवडू दिली, अशी प्रतिक्रिया कु.भाग्यश्रीने दिली..

शुक्रवार, १६ नोव्हेंबर, २०१८

कपडा बॅकेत जमा झालेले वस्त्र अनाथांसाठी ठरताय आधार

तळोदा येथील युवकांचा उपक्रम; बालदिनाचे औचित्य साधत केले वस्त्र वाटप
आपल्याकडे असणारे जुने कपडे फेकुन देण्यापेक्षा कपडा बँकेत जमा केल्यास गरजूंची गरज भागणार आहे. अनेकांना आधार मिळतो. यामुळे जास्तीत जास्त कपडे जमा करण्याचे आवाहन कपडा बँकेमार्फत करण्यात आले.. बोरद : तळोदा येथील कपडा बँकेत जमा झालेले कपडे नंदुरबार येथील निराधार मुलांचे बालगृह व अनाथ निराधार मुलींचे निर्मल बालिकाश्रम केंद्रातील चिमूकल्यांसाठी आधार ठरणार आहे. बालदिनाचे औचित्य साधत तळोदा येथील कपडा बँकेचा उपक्रम राबविणाऱ्या युवकाच्या एका गृपने कपडा बँकेतील सुमारे १०० ड्रेसचे वाटप करून खऱ्या अर्थाने बालदिन साजरा केल्याचे सार्थक केले.. गरीब व गरजूंसाठी तळोद्यातील संतोष माळी, पंकज शेंडे, सुकलाल जाधव, राहुल राणे, अमोल चव्हाण, दीपक जाधव, चेतन माळी, सचिन सूर्यवंशी, कार्तिक माळी या युवकांनी तळोद्यात कपडा बँकेचा उपक्रम राबविण्यात सुरूवात केली आहे. कपडा बँकेच्या माध्यमातुन अनेकजण जुने कपडे गरजूंची गरज भागविण्यासाठी देत आहेत. सद्या मध्यमवर्गीय व गरीबांच्या महागाईच्या चटक्याने हाल सुरू आहेत. या उपेक्षित वर्गाला दिलासा देण्यासाठी तळोद्यातील या युवकांनी समाजाचे ऋण अदा करण्यासाठी सामाजिक बांधिलकीतून कपडा बँकेचा उपक्रम सुरू केला. यास उत्स्फूर्त प्रतिसाद लाभत आहे. काल बालदिनाचे औचित्य साधुन नंदुरबार येथील निराधार मुलांचे बालगृह व अनाथ निराधार मुलींचे निर्मल बालिकाश्रमात कपडा बँकेच्या माध्यमातुन सुमारे १०० ड्रेस वाटप करण्यात आले. दरम्यान हेमंत विश्वनाथ हिवरे यांनी हिवाळ्याच्या पार्श्वभूमीवर सुमारे २० चादरी वाटप केल्या. तसेच विनोद पाठक यांनीही सुमारे ५० शालेय गणवेश वाटप केले. याप्रसंगी अनाथ आश्रमाचे बालकल्याण समिती सदस्य नितीन सनेर, सुरेश पाटील, नितीन पाटील उपस्थित होते. .